आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
१९४५ सालापर्यंत दुसऱ्या महायुद्धाचा शेवट दृष्टीक्षेपात आला होता. जर्मनीच्या नाझी लोकांचा पडावं दिसत होता, एकाबाजूने ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्य होतं तर दुसऱ्या बाजूने सोव्हिएत सैन्य होतं.
सैनिकांनी शहरांचा ताबा घेत, जेलमधल्या कैद्यांची मुक्तता केली आणि सोव्हिएतने तिथल्या नागरिकांचे दमन देखील सुरु केले होते. आपला पराभव बघून अनेक जर्मन नाझीनी यांच्या प्रभुत्वापेक्षा मृत्यूचा स्वीकार करणे सोयीस्कर समजले.
हिटलर, हिमलर आणि गोबेल्स या तीन प्रमुख नेत्यांनी स्वत:ला संपवून घेतले. यांच्या पाठोपाठ अनेक नाझी अधिकाऱ्यांनी स्वतला संपवून घेतले. पण जर्मनीच्या डेमिन या शहरात यात अजून दुर्दैवी प्रकार घडला.
३० एप्रिल ते २ मे १९४५ या फक्त २ दिवसांच्या कालावधीत या शहरातील तब्बल १००० नागरिकांनी आत्महत्या केली. जर्मन राष्ट्राच्या पाडावानंतर एकट्या बर्लिन या शहरात ७००० नागरिकांनी आपले प्राण त्यागले होते.
पण डेमिनमध्ये हा प्रकार फार मोठ्या प्रमाणावर घडला होता. याची कारणं या डेमिन शहराच्या इतिहासात दडली आहेत. ती आपण समजून घेऊयात.
डेमिन शहर हे १६००० लोकवस्तीचं एक शहर होतं. या शहरात नाझीजमचा मोठा प्रभाव होता, त्यामुळे ज्यू लोकांच्या विरोधात विद्रोहाचं केंद्र बनलं. १९२० ते १९३० या काळात हे शहर उजव्या राष्ट्रवादी विचारांचं केंद्र बनले होते.
इथल्या लोकांनी ज्यू लोकांच्या व्यव्यसायावर बहिष्कार घातला. १९३८ साली या शहरातील सिनेगॉग विक्रीला काढून या लोकांनी त्या सिनेगॉगमधील जवळ जवळ बहुतांश वस्तू विकल्या होत्या. परंतु या शहरातील ज्यू लोक हे बऱ्यापैकी जागृत असल्याने त्यांनी वेळीच हे शहर सोडलं.
सोव्हिएतच्या सैनिकांना या शहराचा इतिहास ठाऊक होता आणि त्यांनी हे शहर जिंकून घेतलं. सोव्हिएतला आणि जर्मनीच्या लोकांना एकमेकांचा प्रचंड द्वेष वाटत असे.
१० पैकी ८ नाझी लोकांची हत्या सोव्हिएतच्या सैन्याने केली होती.
एकीकडे सोव्हिएत रशियात देखील फार चांगली स्थिती नव्हती. जवळजवळ २० लाख रशियन लोकांनी या युद्धात आपला जीव गमावला होता. बऱ्याच सोव्हिएत रशियाच्या सैनिकांचा विश्वास बसला होता की निष्पाप जर्मन असा काही प्रकार अस्तित्वात आहे. ‘जर तुम्ही दिवसाला एक जर्मन मारला नाही तर तुम्ही दिवस वाया घालवला.’ असं विधान ईलिया इरेंबर्ग या रशियन तत्वज्ञ महिलेने केले होते.
‘ जर एक जर्मन देखील जिवंत राहिला तर तो रशियन सैन्याला मारेल व रशियन स्त्रियांवर अत्याचार करेल. असं देखील त्या म्हणाल्या, यावरून आपल्याला काय परिस्थिती असेल हे लक्षात येईल.
युद्धाच्या काळात परिस्थिती अजून चिघळत जात आहे, जर्मन नागरिकांच्या जसं लक्षात येऊ लागलं तसं त्यांनी स्वतःला रशियन सैन्याच्या क्रूरतेचा हवाली करण्यापेक्षा मृत्यू पत्करणे सोईचे समजले. त्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. बर्लिनमध्ये तब्बल सात हजार लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. मग यापासून डेमिन कसं अलिप्त राहणार होतं?
रशियन सैनिक जर्मन लोकांमध्ये त्यांच्या क्रौर्यासाठी प्रसिद्ध होते. रशियन लोक जस जसे जर्मनीच्या ताब्यातील प्रदेश गिळंकृत करत गेले तस तसे त्यांनी तिथल्या जर्मनांच्या घरात घुसून त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. ते जर्मन बायकामुलांना देखील सोडत नव्हते.
स्त्रियांवर रशियन सैन्य बलात्कार करत होते. अत्यंत क्रूरपणे जर्मन लोकांना संपवले जात होते. जर्मन नाझी लोकांना त्यांनीच लावलेल्या झाडांची फळे मिळत होती.
डेमिनला रशियन फौजेने चारी बाजूने वेढा दिला आणि येण्या जाण्याचे सर्व रस्ते बंद करत, रशियन फौजेला रोखण्यासाठी नाझीनी नदीवरील पूल देखील उध्वस्त केले. डेमिन शहराच्या भौगोलिक रचनेमुळे त्या लोकांना बाहेर पाडण्यासाठी कुठलाच मार्ग उरला नाही. पण रशियन सैन्याची आगेकूच सुरूच होती.
डेमिनचे नाझी प्रतिकार करत होते. एका शिक्षकाने तर आपल्या बायको व मुलाला ठार केले आणि एक बॉम्ब रशियन टॅंकवर फेकला. यानंतर त्याने आत्महत्या केली.
जेव्हा डेमिनच्या लोकांना हिटलरने आत्महत्या केल्याची बातमी समजली तेव्हा त्यांच्यात घबराट पसरली. आपला सर्वोच्च नेता आणि अधिकारी गेल्याने त्यांच्यात अशांततेची लाट पसरली. अखेरीस रशियन शहरात घुसले, त्यांनी दारूच्या दुकानात प्रवेश करून मद्यपान तर केलेच सोबतच त्याचा मदतीने संपूर्ण शहराला आग लावली. रशियनांनी ८० टक्के शहर उध्वस्त केल्यावर आपला मोर्चा स्त्रियांकडे वळवला, त्यांनी डेमिनमध्ये लैंगिक अत्याचाराची परिसीमा गाठली.
या अत्याचारांमुळे डेमिनमध्ये आत्महत्यांचे सत्र सुरु झाले. डेमिनच्या लोकांनी मिळेल त्या साधनानाने आत्महत्या करायला सुरवात केली.
अनेकांनी स्वतःला रशियन सैन्याला शाप देणारा मजकूर झाडावर लिहून स्वतः ला लटकवून घेतलं तर अनेकांनी स्वतःच्या हाताची नस कापली तर अनेकांनी नदीत उडी मारून जीव दिला. हे सगळं दोन दिवसांच्या कालावधीत घडलं. हजार लोकांनी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं होतं.
अनेकांच्या मते लोकांच्या या आत्महत्यांच्या पाठी जर्मन नाझीनी चालवलेला प्रोपोगंडा होता. नाझीनी लोकांच्या मनावर यशस्वीपणे बिंबवलं होतं की तुम्हाला तुमच्या देशासाठी प्राण त्यागावे लागले तरी चालतील पण रशियनांच्या ताब्यात सापडू नका. याच विखारी राष्ट्रवादातून असंख्य जर्मनांनी आत्महत्या केल्या होत्या. संपूर्ण जर्मनीत ह्या आत्महत्यांचा आकडा दहा हजार इतका होता.
दुसरं महायुद्ध जगातलं सर्वात विनाशकारी युद्ध होतं. याचे पडसाद युद्ध संपल्यानंतर देखील जाणवत होते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.