आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आजच्या काळात प्रत्येक ऑफिस मग ते सरकारी असो की खाजगी कंप्युटराइज्ड झालेले आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या ऑफिसमध्ये एक तरी कंप्युटर असतोच. थोडेसे मागे जाऊन पाहिल्यास कधी काळी याच कंप्युटरच्या जागी टाइपरायटर असायचे. भारतात विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच टाइपरायटरचे आगमन झाले. त्याकाळी ब्रिटिशांना गरज होती म्हणून टाइपरायटर भारतात आणले गेले. स्वातंत्र्यानंतरही बराच काळ आपण आयात केलेलेच टाइपरायटर वापरत होतो.
स्वातंत्र्यानंतर, भारतातच टाइप रायटर बनवले पाहिजेत अशी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंचीही खूप इच्छा होती. आयात केलेले तंत्रज्ञान वापरण्यापेक्षा भारतातच हे मशीन बनवण्यासाठी १९४८ पासूनच प्रयत्न सुरु झाले होते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात लवकरच पहिली सार्वजनिक निवडणूक होणार होती. गोदरेज आणि बॉईस या कंपन्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतपेट्या बनवण्यात व्यस्त होत्या. त्यामुळे टाइपरायटर बनवण्याची कल्पना थोडी पुढे ढकलावी लागली.
भारतात भारतीय बनावटीचे टाइप रायटर वापरण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी दशकभराचा अवधी जावा लागला.
गोदरेजने १९५५ साली पहिला टाइप रायटर बनवला. टाइपरायटर बनवणारी ही देशातीलच पहिली नाही तरी संपूर्ण आशियातील पहिली कंपनी होती. भारतातील या पहिल्या टाइप रायटरचे नाव होते गोदरेज प्राईमा.
भारतासाठी तर हा टाइपरायटर म्हणजे नव्या आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीचे एक प्रतिक होता. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातील इंजिनिअर्सने स्वतःचे तंत्रज्ञान निर्माण करण्याचा हा क्षण खरोखरच असामान्य होता. गोदरेज कंपनीच्या या टाइपरायटरने स्वतंत्र भारताच्या डोळ्यात एक आशा जागवली. एक स्वप्न पूर्ण झाले होते. यातूनच पुढची स्वप्ने पाहण्याची नवी उमेद मिळाली.
संरक्षण विभागापासूनपासून ते सरकारी कार्यालयापर्यंत सगळ्याच ठिकाणी हा टाइरायटर पोहोचला होता. अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता हेही महत्त्वाचे. भारतीय बनावटीच्या या टाइपरायटरची स्पर्धा होती ऑलिव्हेटी, स्मिथ-करोना, ॲड्लर-रॉयल, ऑलिम्पिया, नाकाजिमा अशा अनेक मोठमोठ्या विदेशी ब्रँड्ससोबत. रेमिंग्टनसारखा मोठा नावाजलेला ब्रँडही यात होताच.
१९९० चा काळ तर टाइपराटरसाठी सुवर्णकाळ होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देशात अंदाजे दीड लाख मशिन्स दरवर्षी लागत असत. यातील निम्मी पूर्तता तर गोदरेजकडूनच केली जात असे. विशेष म्हणजे याकाळापर्यंत गोदरेज देशातील मागणी पूर्ण करून राहिलेल्या मशिन्स निर्यात करत असे. गोदरेजच्या या मशिन्स श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मोझांबिक, अंगोला आणि मोरोक्को येथेही जात असत.
टाइपरायटरचा खटखट होणारा आवाज तर सगळ्यांच्याच कानात बसला होता. पुढे यातील तंत्रज्ञान प्रगत होत जाईल तसतसे आवाज न करणारे टाइपरायटर देखील बाजारात आले. परदेशी कंपन्यांच्या तुलनेत गोदरेजला हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करायला थोडा वेळ लागला पण, तरीही लोकांना गोदरेजचा खटखटाट आवडत होता.
परदेशी टाइपरायटरच्या तुलनेत गोदरेज प्राईमा आवडण्यामागेही काही खास कारणे होती.
पहिले म्हणजे याच्या करड्या कलरच्या पार्श्वभूमीवर चकाकणारा स्टीलचा गोदरेजचा लोगो. गोदरेजचा सुंदर लोगो त्याकाळी आकर्षणाचा विषय होता. दुसरे म्हणजे याच्या मागचा जो रील होता तो पातळ होता आणि त्यावरून कागद पटापट पुढे सरकत असे. त्यामुळे कामाला वेग येई.
याची छपाई देखील उठावदार आणि ठळक होती. शिवाय, हा टाइपरायटर वजनाने हलका होता. त्यामुळे एका ठिकाणाहून सहजपणे दुसऱ्या ठिकाणी नेता येत असे. त्याकाळी असे मानले जायचे की, ज्या कर्मचाऱ्याला हा गोदरेजचा टाइपरायटर काम करण्यासाठी मिळेल तो कंपनीचा व्हीआयपी कर्मचारी असे.
गोदरेज टाइपरायटरशी लोकांच्या अशा अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. घरात टाइपरायटर असणे हा देखील स्टेटस सिम्बॉल होता.
टाइपरायटरचा उपयोग तसे तर तोंडी दिली जाणारी माहिती लिखित स्वरुपात रुपांतरीत करणे हेच होते. रीमिंग्टनसारख्या कंपन्यांनी असा ग्रहच करून घेतला होता की हे काम तर महिलांचे आहे. अर्थात तिथे महिलांचा सार्वजनिक वावर ही सामान्य बाब होती. भारतात अजूनतरी महिला घराबाहेर पडून कमावत नव्हत्या.
१९१०च्या दशकात अमेरिकेत ८१% टायपिस्ट महिला होत्या. त्यामुळे या कंपनीने काही असे टाइपरायटरसुद्धा बनवले होते ज्यावर फुलांची नक्षी असेल. अमेरिकेत ही कल्पना तुफान गाजली आणि या टाइपरायटरला तिथे चांगला प्रतिसाद मिळाला.
भारतात मात्र चित्र वेगळे होते. इथे टाइपरायटरला स्टेटस सिम्बॉल मानल्याने टाइपरायटर हा व्यावसायिक यशाचे प्रतिक बनला. त्याकाळी टाइपरायटर विकत घेणे मध्यमवर्गीय भारतीयांसाठी एक मोठे स्वप्न होते.
भारतीय चित्रपटातही टाइपरायटर आणि टायपिस्ट यांना एक आगळेवेगळे स्थान देण्यात आले. गुरुदत्तचा ‘श्रीमान आणि श्रीमती ५५’ या चित्रपटात टाइपरायटरमुळेच हिरो आणि हीरोईनमधले प्रेम फुलते असे दाखवण्यात आले आहे. भारतात हळूहळू स्त्रियाही टाइपिंगची कामे करू लागल्या. या मशीनमुळे त्यांनाही अर्थार्जनाची संधी मिळाली.
‘गोदरेज सर्व भारतीयांचा टाइपरायटर,’ ही गोदरेजच्या जाहिरातीत त्याकाळी दाखवली जाणारी टॅगलाईन तंतोतंत खरी होती.
२००० सालानंतर अनेक ठिकाणी कंप्युटरने अतिक्रमण केले. तरीही, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातही टाइपरायटरचा मान कमी झाला नव्हता. अनेक सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी टायपिंगचे प्रशस्तीपत्र असणे खूपच गरजेचे होते. पण, हळूहळू चित्र पालटत गेले आणि टाइपरायटर इतिहासजमा व्हायला सुरुवात झाली. गोदरेजने देखील २०११ साली आपला मुंबईतील प्रोडक्शन प्लांट कायमचा बंद केला. त्यावेळी गोदरेजचे ५०० टाइपरायटर्स शिल्लक होते.
गोदरेज टाइपरायटर हा नव्या भारताला आशेचे किरण दाखवणारा पहिला यशस्वी प्रयोग होता. गोदरेजच्या या टाइप रायटरशी अनेकांची भावनिक नाळ जोडली गेली आहे. तरुण भारताचा तेजस्वी इतिहास लिहिण्याचे काम याच मशीनने केले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.