आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज मोबाईलशिवाय आपण एक दिवसच नाही एक तासभरही राहू शकत नाही. मोबाईल आपल्या प्रत्येक कामात आपल्याला मदत करणारा एक सहाय्यक बनला आहे. आपल्या प्रियजनांशी संपर्क साधणे, देशोदेशीच्या बातम्या मिळवणे, आपल्या अजबाजुला घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया देणे, अशा कितीतरी गोष्टीसाठी आज आपण फक्त मोबाईलवर अवलंबून आहोत.
इमेल पाठवण्यापासून ते बँकेतील अकाऊंटची माहिती तपासण्यापर्यंत, अशा व्यावहारिक गोष्टींसाठीही आज मोबाईल फारच उपयोगी ठरत आहे. आपल्या वस्तूंची मार्केटिंग करणे आणि आपल्याला हवी ती वस्तू खरेदी करणे, मोबाईलमुळे शक्य झाले आहे. तेही अगदी घरबसल्या.
अलिबाबाच्या गोष्टीतील जादूच्या गुहेचे दारच जणू मोबाईलच्या रुपात आपल्या समोर उभे आहे. ज्याला नुसते खुलजा सीम सीम म्हटले की आपल्याला हव्या त्या माहितीचा खजिनाच आपल्यासमोर उभा होतो. लहानपणी जादूच्या दिव्यातील जीनच्या गोष्टी पाहताना आपण कल्पनाही केली नव्हती की अशा एखाद्या जीनचे आपण मालक असू. पण, आपला मोबाईलही आपल्यासाठी या जीनपेक्षा काही कमी नाही.
मोबाईल येण्यापूर्वी सार्वजनिक टेलीफोन बुथवर एक फोन करण्यासाठी लोक रांगा लावून उभे राहत होते.
आज या गोष्टी कितीतरी सहज सोप्या वाटतात. पण, वीस वर्षापूर्वी लोक मोबाईल शिवायही जगत होते. मोबाईल शिवाय त्यांचे व्यवहार सुरळीत होत होते. मोबाईलशिवाय ही लोकं एकमेकांना मदत करत होते. एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होत होते. त्यांचे दैनंदिन आयुष्य निर्धोक पणे सुरु होते.
मात्र आज आपण जे काही मोबाईलमय आयुष्य जगतोय त्याचा पाया २५ वर्षापूर्वीच घातला गेला होता. ३१ जुलै १९९५ रोजी देशात पहिल्यांदा मोबाईलची रिंगटोन वाजली होती. याच दिवशी मोबाईल आणि टेलिकॉम मार्केटची सुरुवात झाली.
आज टेलिकॉम मार्केट ही जगातील एक मोठी बाजार व्यवस्था बनली आहे. ३१ जुलै रोजी देशात जेव्हा पहिल्यांदा मोबाईलची रिंग वाजली तेंव्हा हा मोबाईलवर पहिल्यांदा संवाद साधणाऱ्या व्यक्ती होत्या बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम.
मोबाईल सेवेचा शुभारंभ करत असताना तत्कालीन दूरसंचार मंत्र्यांनी पहिला फोन बंगालच्या मुख्यमंत्र्यांना लावला. मोबाईल सेवेची सुरुवात झाली तेंव्हा इनकमिंगसह आऊटगोइंग कॉलसाठीही तेंव्हा पैसे मोजावे लागत होते. आजसारखे घरोघरी फोन वापरण्याची चैन तर तेंव्हा शक्यच नव्हती.
आज मात्र घरोघरी एक नाही तर जितक्या व्यक्ती तितके फोन अशी स्थिती आहे. भारतातील हा पहिला मोबाईल कॉल आणि मोबाईल सेवेविषयी जाणून घेऊया आणखी काही मजेदार माहिती.
भारतातील पहिला कॉल बंगालचे तत्कालीन मुख्यामंत्री ज्योती बसू यांनी कलकत्त्याच्या रायटर्स बिल्डींगमधून नवी दिल्लीतील संचार भवनमधे केला होता.
भारतात मोबाईल ऑपरेटींगची सेवा देणारी पहिली कंपनी होती मोदी टेल्स्ट्रा. या कंपनीच्या सर्विसला मोबाईल नेट म्हटले जात असे.
देशातील हा पहिला कॉल याच नेटवर्कच्या माध्यमातून केला गेला होता. भारतातील मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियाच्या टेल्स्ट्रा या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन मोदी टेल्स्ट्रा ही नवी मोबाईल नेटवर्क कंपनी सुरु केली होती.
सुरुवातीला भारतात ८ कंपन्यांना सेल्युलर सर्विस पूरवण्यासाठी परवाना देण्यात आला होता. या ८ कंपन्यांमध्ये मोदी टेल्स्ट्रा या कंपनीचाही समावेश होता.
१९९५पासून आजपर्यंत भारतातील टेलिकम्युनिकेशन क्षेत्राने बरीच प्रगती केली आहे. पुढच्या पाच वर्षातच देशात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ५० लाखावर पोहोचली होती. त्या नंतर २०१५ पर्यंत टेलिफोन कनेक्शनची संख्या एक अब्जच्याही पुढे गेली होती. यानंतर आजपर्यंत या आकडा कित्येक पटीने वाढत आहे.
भारतात मोबईल सेवा सुरु झाली तेंव्हा कॉलिंगचे दर खूप होते. एका मिनिटासाठी १६ रुपये शुल्क आकारले जात होते. इनकमिंग कॉलसाठी हाच दर ८ रुपये ४० पैसे प्रती मिनिट इतका होता. सामान्य माणसांना मोबईल वापरण्याची चैन अजिबात परवडत नसे. फक्त मोठमोठे सरकारी अधिकारी, नोकरदार आणि मोठे उद्योजक यांनाच ही सेवा वापरणे शक्य होते.
त्याकाळी तर इनकमिंग कॉलसाठीही पैसे मोजावे लागत. यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागला. हळूहळू कॉल रेट कमी होऊ लागला तसेतसे लोक याकडे वळू लागले.
काही ऑफिसेसमधे जलद सेवा देण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना एसएमएसची सुविधा देणे सुरु केले. ऑफिसच्या कामानिमित्त लोकांना मोबाईल घेणे भाग पडले.
इनकमिंग मोफत झाल्यानंतर मात्र सामान्य लोकही मोबाईलकडे वळू लागले. एकएक टप्पा करत आज मोबाईल प्रत्येक घरातच नाहीतर घरातील प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचला आहे.
१९९५ मध्येच विदेश संचार निगम लिमिटेडने देशात इंटरनेट सुविधा सुरु केली. व्हीएसएनएलने देशात गेटवे इंटरनेट ऍक्सेस सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला. व्हीएसएनएलची ही इंटरनेट सेवा सुरुवातीला फक्त चार महानगरात मर्यादित होती यासाठीचे दरही खूपच महाग होते.
इंटरनेटसाठी त्यावेळी एक तास इंटरनेट वापरण्यासाठी वीस रुपये मोजावे लागत. खाजगी कंपन्यांना हाच दर ६० रुपये होता. जसजसे ग्राहक वाढत गेले हे दर कमी झाले.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तर मोबाईल अत्यंत गरजेची बाब आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आज शिक्षण देखील ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे घरातील शालेय मुलांसाठीही आज मोबाईल फोन ही एक अनिवार्य गरज बनली आहे. मोबाईल हा अनेकांच्या रोजगाराचे साधन बनला आहे.
भारतात आज मोबाईल ग्राहकांची संख्या इतकी वाढली आहे की जागतिक क्रमवारीत मोबाईल ग्राहकांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. मोबाईल सेवेचा जीडीपीतील वाटा ६.५% इतका आहे.
या क्षेत्राने देशात ३.२ कोटी इतका प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करवून दिला आहे. पंचवीस वर्षांच्या वाटचालीत भारताच्या प्रगतीत मोबाईलचा वाटा खूपच मोठा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.