आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात असे अनेक राजे होऊन गेले आहेत, जे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध होते. अशा राजांपैकी एक होते, राजा भूपिंदर सिंह!
त्यांच्या राजसी आणि आलिशान आयुष्यासाठी प्रसिद्ध असलेले भूपिंदर सिंह यांचे आयुष्य एखाद्या सामान्य श्रीमंत माणसाच्या आयुष्यापेक्षा वेगळे होते. त्यांच्या आयुष्याशी निगडित अनेक किस्से आजदेखील प्रसिद्ध आहेत.
१८९१ साली पटियालाच्या राजघराण्यात जन्माला आलेल्या भूपिंदर सिंह यांच्या हाती बालपणीच सिंहासन आले. १९०० मध्ये त्यांनी पटियालाच्या राजघराण्याची कमान हाती घेतली होती. भूपिंदर सिंह हे क्रिकेटचे मोठे चाहते होते. त्यांना फक्त क्रिकेट पाहण्याची आवड नव्हती, तर त्यांना क्रिकेट खेळायला देखील आवडत होते. त्याकाळी अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी त्यांच्या डाव्या हाताच्या फलंदाजीने लोकांची मने जिंकली होती.
असे म्हणतात की भूपिंदर क्रिकेटचे एवढे चाहते होते की ते स्वतःची एक टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर घेऊन गेले होते.
१९११ साली त्यांनी आपली टीम इंग्लंडला नेली होती. त्यांनी तिथे इंग्लंडमध्ये इतके चांगले प्रदर्शन दाखविले की तेथील अनेक क्रिकेट चाहते त्यांचे कौतुक करत होते, इतकेच नाही इंग्लिश कोचने देखील त्यांचे कौतुक केले आहे.
भारतात क्रिकेटचा प्रसार व्हावा या उद्देशाने त्यांनी मुंबई आणि अमृतसरमध्ये दोन स्टेडियमची देखील निर्मिती केली होती. इथेच त्यांनी भारतीय क्रिकेट कन्ट्रोल बोर्डाची स्थापना केली. राजकुमार रणजित यांना श्रद्धांजली देण्यासाठी भूपिंदर यांनी त्यांच्या नावाने ‘रणजी’ ट्रॉफी सुरु केली होती.
भूपिंदर सिंह यांना भारतीय क्रिकेटचा प्रणेता मानले जाते.
राजा भूपिंदर सिंह यांना रोल्स रॉईस गाडी फार पसंत होती. त्यांच्याकडे तब्बल ४४ रोल्स रॉईस गाड्यांचे कलेक्शन होते. ज्यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा निघायचा त्यावेळी नेत्रदीपक दृश्य निर्माण होत असत. इंग्रज अधिकारी त्यांची संपत्ती बघून आश्चर्यचकित व्हायचे. १९३० साली भारतात भूपिंदर सिंह वगळता एवढ्या रोल्स रॉईस गाड्या असणारे भारतात दुसरे कोणी नव्हते. साधी शिकार करण्यासाठीही भूपिंदर सिंह रोल्स रॉईस गाडीचा वापर करत होता.
असे म्हणतात की भारतातील पहिल्या खाजगी प्लेनचे ते मालक होते. ज्याकाळी सायकल देखील लोकांना माहिती नव्हती, त्यावेळी भूपिंदर यांच्याकडे स्वतःचे विमान होते. त्यांनीच पुढे पटियाला एव्हिएशन क्लबची स्थापना केली कारण त्यांना त्यांचे प्लेन उडवायचे होते.
फक्त महागड्या गाड्याच नाहीतर महागड्या दागिन्यांची देखील भूपिंदर सिंह यांना आवड होती. याच आवडीतून त्यांनी एका अशा हाराची निर्मिती केली होती, ज्याबद्दल ऐकून अनेकांना आजही धक्का बसतो. असे म्हणतात १९२६ साली पटियाला शहराच्या एका सोनाराकडे एक स्पेशल ऑर्डर आली. त्यात एक खोका भरून हिऱ्या माणिकांची मागणी करण्यात आली होती. ऑर्डर बघून दुकानदाराला आश्चर्याचा धक्का बसला होता. दुकानदाराला त्याच्या हयातीत एका माणसाकडून इतकी मोठी ऑर्डर मिळाली नव्हती. भूपिंदर सिंहने नंतर त्या दुकानदाराला हार बनवण्यास सांगितले. त्याला फक्त आपल्या ऐश्वर्याच्या प्रदर्शनसाठी हा हार पाहिजे होता.
हा हार तयार करण्यासाठी दुकानदाराला तीन वर्षांचा कालावधी लागला. अखेरीस १९२८ मध्ये हा हार भूपिंदर यांना सोपविण्यात आला.
तब्बल ९६२ कॅरेटच्या या हाराची चेन खास प्लॅटिनमने तयार करण्यात आली होती. १८ कॅरेटच्या दोन रुबीना वापरून हा हार तयार करण्यात आला होता. हा हार इतका आकर्षक होता की त्याला बघताना त्यावरून नजर हटत नव्हती. भारतात राजेशाही संपुष्टात आल्यावर हा हार पटियालाच्या शाही खजान्याचा एक भाग बनला होता.
१९४८ अचानक एके दिवशी हा हार तिथून गायब झाला. अनेक वर्ष हा हार शोधण्यात पण तो कोणालाच सापडला नाही. १९८८मध्ये भूपिंदर सिंहाचा हा हार लंडनच्या एका दुकानात आढळून आला होता. पण त्यातील हिरे मात्र त्यातून गायब करण्यात आले होते. तो फक्त एक खाली साचा म्हणून उरला होता.
राजा भूपिंदर सिंह यांची प्रत्येक गोष्ट ही आलिशान होती. त्याच्याकडे १४०० पदार्थांसाठीचा एक डिनर सेट होता, ज्याला बघून ब्रिटन देखील हैराण होता. या डिनर सेटची किंमत करोडो रुपये होती. असे म्हणतात यापूर्वी इतका मोठा डिनर सेट इंग्लंडच्या किंग एडवर्डसाठी तयार करण्यात आला होता.
१९२२ मध्ये ब्रिटिश राजे पंचम जॉर्ज भारताच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी भूपिंदर सिंह यांनी खास त्यांच्यासाठी हा शाही डिनर सेट तयार केला होता. आजदेखील या डिनर सेटल मोठी मागणी आहे, एका रशियन कलेक्टरने याला २ मिलियन ब्रिटिश पौंड देऊन विकत घेतले होते.
भूपिंदर सिंह खऱ्या अर्थाने भारतातील राजेशाहीचे प्रतीक असून त्यांच्या ऐश्वर्याने इंग्रजांना देखील तोंडात बोटे घालायला लावली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.