आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सध्या सोशल नेटवर्किंगचे जाळे संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. सोशल नेटवर्क आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. व्हर्च्युअल इंटरफेस ही संकल्पना काही वर्षांपूर्वी फक्त एक काल्पनिक गोष्ट म्हणून सोडून दिली गेली असती. परंतु आज तिचा अवाढव्य विस्तार जर बघितला तर या व्हर्च्युअल जगताने आपल्या आयुष्याचा किती मोठा भाग व्यापलेला आहे याची कदाचित आपणास ही कल्पना येणार नाही.
रोज फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांच्या बरोबरीने आपले जगणे चाललेले असते. तसं बघायला गेलं तर आपण दोन आयुष्य जगतो. एक जे आपले खरोखरचे आयुष्य आणि दुसरे आपण या सोशल नेटवर्किंग साइटवरून बनवलेले स्वतःचेच एक आभासी आयुष्य.
या सोशल नेटवर्किंगचे अमाप फायदे आहेत, तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत. घरबसल्या जगभरातली माहिती मिनिटा मिनिटाच्या अंतराला आपल्या मोबाईल फोनवर या सोशल नेटवर्किंग साइटवरून अपडेट होत राहते.
या सोशल प्लॅटफॉर्मवरून लॉबी क्रीएट केली जाऊ शकते. सरकारला जाब विचारले जाऊ शकतात. अगदी मोठ्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी एखादे ट्विट किंवा फेसबुकवरची एखादी पोस्ट कमी वेळात खूप मोठा परिणाम करून जाते.
परंतु मोबाईलचे वाढलेले वॉच अवर्स, निरुद्देश दिवसभर फक्त मोबाईलवर सुरू असलेले साईट व्हिजिट्स, व्हाइट कॉलर गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण या गोष्टींसाठी देखील कधीकधी सोशल मीडियाला जबाबदार धरले जाते. अर्थात जरी यांचे स्वतःचे असे फायदे तोटे असले तरीही आज मात्र संपूर्ण जग या सोशल नेटवर्किंगच्या विळख्यात आहे हे मान्यच करावे लागते.
या सोशल नेटवर्किंगची सुरुवात करण्याचा मान फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा ट्विटरला जात नाही?
आजच्या काळातले हे सगळे सोशल मीडियाचे राजे आहेत परंतु या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती ऑर्कुटच्या साईटने.
ऑर्कुट हे जगातील पहिले व्हर्च्युअल सोशल नेटवर्क होते. हे तसं बघायला गेलं तर गुगलचे एक प्रॉडक्ट. गूगलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे, ऑर्कुट बुयुक्कॉक्टेनचे हे ब्रेन चाईल्ड. त्याच्या नावावरूनच या सोशल नेटवर्किंग साईटला ऑर्कुट हे नाव दिले गेले.
ऑर्कुटच्या डोक्यातील कल्पना अशी होती की एक व्ह्यूर्च्युअल इंटरफेस तयार करायचा, जिथे लोक आपल्या ओळखीतल्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट ठेवू शकतील, त्यांच्याशी बोलू शकतील आणि कितीही दूर राहायला असले तरी या साईटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहू शकतील.
लोकांच्या त्यावेळच्या गरजा लक्षात घेऊन या साईटची निर्मिती केली गेली. २४ जानेवारी २००४ रोजी ऑर्कुट पहिल्यांदा लाइव्ह झाले. जेव्हा ऑर्कुट जन्माला आले तेव्हा ते सगळ्या लोकांसाठी उपलब्ध नव्हते.
तुम्हाला ऑर्कुटवर खाते उघडायचे असल्यास जो माणूस अगोदर ऑर्कुटवर आहे त्याच्याकडून तुम्हाला इन्व्हीटेशन येणे बंधनकारक असायचे. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २००६ साली ऑर्कुटने ही अट काढून टाकली आणि त्यानंतर ऑर्कुट सर्वांसाठी ओपन झाले.
ऑर्कुटचा इंटरफेस बराच साधा सोपा होता. व्यक्तीचे प्रोफाइल, प्रोफाइल फोटो, फ्रेंड लिस्ट आणि बाकीची माहिती होमपेजवर असायची. या साईटवर स्क्रॅपबुक नावाचा एक अभिनव प्रकार होता.
प्रत्येक व्यक्तीचे असे स्क्रॅपबुक असायचे ज्याच्यावर त्या व्यक्तीच्या फ्रेंडलिस्टमधील व्यक्ती लिहू शकत असायच्या. हे स्क्रॅपबुक म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक आरसा असायचा.
स्क्रॅपबुकमध्ये कोणी कोणी काय काय लिहिलं आहे यावरून त्या व्यक्तीच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती काढली जायची. त्यामुळेच ऑर्कुटवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना लोक आपल्या ओळखीतल्या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट घेत असत.
एका अर्थाने जे लोक एकमेकांपासून कामाच्या निमित्ताने किंवा इतर कुठल्या कारणाच्या निमित्ताने दुरावलेले होते त्या लोकांना एकत्र आणणारा ऑर्कुट हा मोठा दुवा ठरला.
ऑर्कुटचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ऑर्कुटवर समान विचारी लोकांचे बनलेले ग्रुप देखील असायचे. ज्या व्यक्तींना साहित्यामध्ये, संगीतामध्ये, अभिजात कलांमध्ये रुची आहे, विज्ञान तंत्रज्ञानाची आवड आहे अशा लोकांचे वेगवेगळे समूह असायचे.
या समूहावर त्या त्या विषयांच्या चर्चा व्हायच्या. एकमेकांना माहीत असलेले ज्ञान शेअर केले जायचे. हळूहळू ऑर्कुटवर फक्त स्वतःच्या माहितीतल्या लोकांना ऍड न करता वेगवेगळ्या लोकांना ऍड करण्याचे प्रमाण वाढू लागले.
खऱ्या अर्थाने जगभरातील लोक एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण देखील करू लागले. याच ऑर्कुटवर त्या काळात बऱ्याच प्रेमकहाण्यादेखील फुलल्या होत्या.
ऑर्कुट त्यावेळी अमेरिका ब्राझील आणि भारत या तीन देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. आता योगायोगाची गोष्ट म्हणजे ऑर्कुट जेव्हा लॉन्च झाले होते त्याच्या नंतरच दहा बारा दिवसांनी मार्क झुकेरबर्ग या तरुणाने स्वतःची फेसबुक नावाची एक सोशल नेट्वर्किंग साईटसुद्धा ओपन केलेली होती. परंतु त्यावेळी ऑर्कुटने बाजी मारली.
लोक ऑर्कुटचे चाहते झाले. ऑर्कुटची पॅरेंटिंग कंपनी म्हणजे गुगल. आपणा सर्वांना माहीत आहेच गुगल ही इंटरनेटच्या विश्वातील जायंट कंपनी आहे. आता ज्याचा बाप इतका बलवान आहे त्याने खरंतर खूप मोठी मुसंडी मारायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवाने ऑर्कुटच्या बाबतीत दुसरा प्रकार झाला.
गुगलने ऑर्कुटला एखाद्या नावडत्या मुलाचा दर्जा दिला.
कुठलीही गोष्ट जोपर्यंत नवीन असते तोपर्यंत लोकांना भावते त्यानंतर जेंव्हा ती जुनी होते तेव्हा त्याच्यामधले स्वारस्य हळूहळू निघून जाते. हीच गोष्ट मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्टला लागू पडते.
ऑर्कुट त्याच्या जन्माच्या वेळी जेंव्हा नवीन होते तेव्हा लोकांनी एक चांगली संकल्पना म्हणून त्याला प्रचंड डोक्यावर घेतले. त्यानंतर गुगलने ऑर्कुटकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामध्ये फारसे अपडेट आले नाहीत.
वेगवेगळे फीचर्ससुद्धा त्यामध्ये इंक्लुड केले गेले नाहीत. याउलट फेसबुक हळूहळू नवीन पिढीमध्ये लोकप्रिय होऊ लागले. फेसबुकच्या निर्मात्यांनी त्याच्यामध्ये काळानुरूप अनेक बदल केले.
सतत नवनवीन गोष्टी या साईटवर ऍड होत राहिल्या. इंटरफेससुद्धा प्रत्येक वेळी बदलण्यावर भर दिला गेला. याचा परिणाम म्हणून ससा आणि कासवाच्या शर्यतीमध्ये कासवाच्या गतीने पुढे चाललेले फेसबुक नंतर अक्षरश: धावू लागले. या शर्यतीमध्ये ऑर्कुट मात्र मागे पडले.
त्यानंतर गुगलने स्वतःची दुसरी एक सोशल नेट्वर्किंग साईट आणली तिचे नाव होते गुगल प्लस. म्हणजे बाहेरची स्पर्धा काय कमी होती म्हणून ऑर्कुटला त्याच्या घरातच स्पर्धा निर्माण झाली.
हे गुगल प्लस दिसायला थोडेफार फेसबुकसारखे असले तरी पण फेसबुक सारखे देखणे नव्हते. त्यामध्ये फार जास्त वैशिष्ट्ये देखील नव्हती. ऑर्कुटपेक्षा तर ते डावेच होते. पण ऑर्कुटमध्ये सुधारणा करण्यापेक्षा गुगलने गुगल प्लसमध्ये इन्व्हेस्ट करणे सुरू केले.
ऑर्कुटवरच्या मैफिलीनंतर हळूहळू कमी झाल्या. स्क्रॅपबुकमधले स्क्रॅप्स रोडावले. फ्रेंड लिस्टला गळती लागली. लोक ऑर्कुट सोडून फेसबुकवर शिफ्ट होऊ लागले, एखादे भरले घर जसे रिकामे होईल त्याप्रमाणे २००८ नंतर ओर्कुट हळूहळू रिकामे होऊ लागले.
या सगळ्याचा परिपाक म्हणजे सप्टेंबर २०१४ मध्ये गुगलने ऑर्कुट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय ऑर्कुट युजर्ससाठी तसा धक्कादायक देखील होता आणि नव्हता देखील कारण तोपर्यंत संपूर्ण यूजर बेस हा फेसबुकवर शिफ्ट झालेला होता. लोकांनी गंमत म्हणून आपले ऑर्कुटवरचे अकाउंट देखील कायम ठेवलेले होते.
ऑर्कुटवरची मित्रमंडळी पुन्हा फेसबुकवर नव्याने एकमेकांना भेटली, नव्याने पेजेस तयार झाले. नव्याने ग्रुप देखील बनले. त्यामुळे त्या अर्थाने ऑर्कुटचे जाणे फारसे कुणाला जाणवले नाही. मात्र आजही ऑर्कुटची आठवण आल्यावर नकळतपणे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.
आजच्या सोशल मीडिया युगाचा आरंभ कोणे एकेकाळी याच ऑर्कुटवरून झाला होता परंतु आज स्वतः पायाभरणी केलेल्या जगात ऑर्कुट नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.