आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बी. आर. चोप्राचे महाभारत माहीत नाही, असं कोणी भारतात शोधूनही सापडणार नाही. १९८८ ते १९९० च्या काळात ही मालिका लागली की रस्त्यावरची सगळी गर्दी घरात येऊन बसायची. कोणीच ही संधी सोडत नव्हतं. कारण दुसरीकडे कुठे बघायला तशी संधीही नव्हती. या नेटफ्लिक्स, ॲमेझोन सिरीजच्या जमान्यात पण कित्येक तरुणांच्या लॅपटॉपमध्ये महाभारतचे सगळे एपिसोड डाउनलोड करून ठेवलेले असतात.
लॉकडाऊनच्या काळात आता केंद्र शासनाने दुरदर्शनवर पुन्हा महाभारत दाखवले होते आणि त्या निर्णयाचं स्वागत सगळ्यांनीच खूप उत्साहाने केलं होतं. आज आपण या मालिकेबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.
चोप्रानंतर स्टार प्लसने काही वर्षांपूर्वी चकाचाक सिक्स पॅक असणारे मॉडेल्स घेऊन नवीन तंत्रज्ञानासह पुन्हा महाभारत बनवलं, पण त्यांना ती लोकप्रियता मिळवता आली नाही. याचं कारण काही वर्षांपूर्वी बी. आर. चोप्राच्या एका मुलाखतीत सापडतं. ते म्हणतात,
हे महाभारत बनवण्याचं कारण त्या मागची आर्थिक गणितं नसून त्या कथेबद्दल त्यांना असणारी आस्था आहे.
आणि ती आस्था ही मालिका बनवण्याच्या प्रक्रियेत दिसते. या मालिकेचं लिखाण केलं सुप्रसिद्ध लेखक राही मसुम रझा आणि पंडित नरेंद्र शर्मा यांनी. त्याकाळी राही मसूम रझा हे मुस्लिम असल्या कारणाने चोप्रा यांच्याकडे अनेक लोकांनी पत्र लिहून निषेध नोंदवला. “या भारतात महाभारत लिहायला तुम्हाला एक हिंदू सापडत नाही की काय?” असा प्रश्न सगळीकडे पसरला. पण चोप्रा या दबावात आले नाही, आणि त्यांची ही निवड योग्य ठरली. तेव्हा रझा यांना दुसरे व्यास म्हटले गेले. तेच स्वतःला गंगापुत्र म्हणवून घेत असे.
तुम्हा सगळ्यांना तो मालिका सुरू होतानाचा आवाज आठवत असेल, “मै समय हूँ”. तो आवाज आहे प्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट हरीश भिमानी यांचा. कित्येक ट्रायल घेतल्यानंतर ‘काळाचा आवाज कसा असावा’ हे शोधण्यात त्यांना यश आलं, आणि प्रेक्षकांच्या वाट्याला ती महान ओपनिंग ट्यून आली.
सुप्रसिद्ध अभिनेते, अभिनेत्री घेण्यापेक्षा त्या पात्रांना न्याय देऊ शकतील, ज्यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व असेल, ज्यांना या विषयात रस असेल अशा लोकांची निवड त्यांनी केली. ही परफेक्ट कास्टिंग करण्याचं काम होतं गुफि पेंटल यांचं. त्याकाळात त्यांनी हजारो युवक युवतीचं ऑडिशन घेतलं, पण त्या पात्राला न्याय देऊ शकेल असं कोणीतरी मिळेपर्यंत त्यांनी त्यांचा शोध थांबवला नाही.
शकुनी मामाच्या पात्रासाठी कोणी योग्य अभिनेता मिळत नव्हता तेव्हा स्वतः गुफि पेंटल यांनीच ती भूमिका करायचं ठरवलं. त्यांच्या त्या कामाचं खूप कौतुक झालं.
एका अभिनेत्याचं खरं कौशल्य असतं त्या पात्राशी एवढं एकजीव होणं की त्याच्या वैयक्तिक प्रसिद्धीपेक्षा ते पात्र जास्त प्रसिद्ध होईल. गुफि पेंटलने याबद्दल एका मुलाखतीत एक किस्सा सांगितलाय. शूटिंग संपवून मुकेश खन्ना (ज्यांनी भीष्म पितामह यांची भूमिका साकारली) आणि ते गुजरातवरून मुंबईला यायला निघाले. त्यांची बुकिंग असलेली रेल्वे त्यांच्याकडून चुकली म्हणून त्यांनी येईल त्या गाडीने जायचं ठरवलं. रात्रीची वेळ होती म्हणून जनरल डब्यातली सगळी लोकं झोपलेली होती, पण यांना बघून सगळेच उठले.
तेव्हा लोकांनी मुकेश खन्ना यांना बसायला जागा दिली, पण गुफि पेंटलला मात्र कोणीच बसा म्हणलं नाही. त्यांच्या लेखी ते अजूनही दृष्ट शकुनी मामाच होते.
मुकेश खन्नाची ओळख आपल्याला नेहमीसाठी पितामह भीष्म म्हणूनच राहिली असती पण त्यांनी त्यानंतर शक्तिमानची भूमिका साकारली आणि पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेसह घरा घरात पोहोचले. पण त्यांनी स्वतःच्या प्रोडक्शन कंपनीच नाव मात्र “भीष्म फिल्म्स” ठेवलं ते त्या महाभारतातल्या पात्राच्या आठवणीत.
पुनीत इस्सरने यात दुर्योधनाचं पात्र साकारलं तर रुपा गांगुलीने द्रौपदीचं. महाभारत मालिकेनंतर रुपा गांगुली बंगाली सिनेसृष्टीतलं महत्त्वाचं नाव बनली आणि त्यानंतर ती राजकारणातही सक्रिय झाली. १९८३ साली अमिताभ बच्चनच्या “कुली” चित्रपटात जो दुर्दैवी अपघात झाला ज्यात अमिताभला गंभीर इजा झाली, त्या अपघाताचं खापर चाहत्यांनी पुनीत इस्सरवर फोडलं होतं. बराच काळ त्यामुळे त्याला चित्रपट सृष्टीत काम मिळत नव्हतं. मात्र बी. आर. चोप्रानी त्याच्या अभिनयाची ताकद ओळखून त्याला भीमचं पात्र करण्यासाठी निवडलं. पण पुनीतने आग्रहाने जास्त अवघड असणारं दुर्योधनाचं पात्र निवडलं, आणि त्या पात्राला योग्य न्याय दिला.
पुनीत आणि रूपा यांच्यासोबतही त्यांच्या भूमिकांमुळे बरेच किस्से घडायचे. त्यातला एक असा की, क्लायमॅक्सचं शूटिंग जयपूरजवळ सुरू होतं. तिथल्या एका मोठ्या उद्योगपतीने सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं. एका मोठ्या टेबलवर सगळे जेवायला बसले होते, त्यात पुनीत (दुर्योधन) आणि रूपा (द्रौपदी) शेजारी शेजारी बसून गप्पा मारत जेवत होते. तर त्या उद्योगपतींच्या घरातल्या स्त्रिया रूपाला घेऊन बाजूला गेल्या आणि सांगितलं की “तुला दुर्योधनाच्या शेजारी बसायला शोभतं का?” आणि मग रूपाला येऊन दुसऱ्या खुर्चीत बसावं लागलं, फिरोज खानच्या (अर्जुनाच्या) शेजारी.
अर्जुनच्या पात्रासाठी फिरोज खानची निवड पण योग्य ठरली. फिरोजने मुस्लिम असताना सगळ्या हिंदू साहित्याचा नीट अभ्यास करून भाषा, औपचारिकता व्यवस्थित साकारल्या. त्याला त्या पात्राने एवढी प्रसिद्धी दिली की फक्त प्रेक्षकचं नाही तर त्याची आईसुद्धा त्याला अर्जुन म्हणू लागली. म्हणून त्याने नेहमीसाठी स्वतःचं स्क्रीनवरचं नाव अर्जुनच ठेवलं.
या मालिकेचं दिग्दर्शन बी. आर. चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केलं होतं. यश चोप्रा बी. आर. यांचा भाऊ. अशाप्रकारे या चोप्रा परिवाराने जवळ जवळ ७० वर्ष भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. पण त्या सगळ्यात महाभारत या मालिकेचं नाव सर्वप्रथम घेतलं जाईल. ही मालिका फक्त महाभारतावर आधारित होती म्हणून प्रसिद्ध झाली, या निष्कर्षाशी मी सहमत नाही. त्याआधी दूरदर्शनवर रामायण येऊन गेलं, त्यानंतर कित्येक देवांच्या मालिका आजही येतात पण भारतभर हीच मालिका एवढी का गाजली?
बऱ्याच जणांनी या मालिकेत मुख्य कथेतील बारकावे चुकीच्या पद्धतीने दाखवलेत असाही आरोप त्याकाळी केला. टेलिव्हिजनवर शिरच्छेदाचे प्रसंग दाखवण्याबद्दल पण वाद झाला. पण इतक्या क्लिष्ट मांडणीच्या ग्रंथाला चित्रभाषेत आणताना त्यातला अर्क निर्मात्यांनी नीट जपला, जो आता येत असणाऱ्या ऐतिहासिक किंवा धार्मिक चित्रपट, मालिकांमध्ये दिसत नाही. हिरोगीरीच्या भानगडीत पडण्यापेक्षा त्यांनी मूळ कथेला महत्त्व दिलं. हे महत्त्व त्याकाळी मर्यादित स्वरूपात असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना निर्माण करता आलं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.
आज कितीही जागतिक दर्जाचं ॲनिमेशन आलं तरी, त्या मालिकेतले आकाशात जाऊन भिडणारे बाण, स्वर्गातून पुष्पवृष्टी करणारे देव, हे सगळंच आजही बघायला छान वाटतं, मूळ कथानकाशी समरूप वाटतं. यातले डायलॉग, म्युजिक, फ्रेमनंतर कित्येक कलाकृतीत अक्षरशः चोरून वापरण्यात आल्या. यात कृष्ण अर्जुनाला उपदेश करत असतानाचा सिन तर कित्येक घरात फ्रेम करून लटकवला गेला. अशाप्रकारे अत्यंत सहज वाटणाऱ्या या मालिकेच्या मागे असामान्य पातळीची तांत्रिक मेहनत, आणि “महाभारता”बद्दल आस्था दडलेली आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.