आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन या वाहिनीवर शार्क टॅंक इंडिया नावाचा कार्यक्रम फारच लोकप्रिय झाला. कोरोनामुळे बेरोजगारी वाढलेली असताना तरुण पिढीतील उद्योजक पुढे यावेत व त्यांच्या कल्पनांना वाव मिळावा हा या कार्यक्रमाचा हेतू. पण शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमातला अशनीर ग्रोव्हर, त्याच्या आणि कंपनी भारतपे यांच्यात चालू असलेल्या भांडणामुळे प्रकाशझोतात आला. तर अशनीर ग्रोव्हर आणि भारतपे यांच्यात नेमका काय वाद सुरू आहे तो जाणून घेऊ.
अशनीर ग्रोव्हर याने आय.आय.टी. दिल्लीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. नंतर त्याने आय.आय.एम अहमदाबादमधून व्यवस्थापन शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. कोटक इन्व्हेस्टमेंट बँकेत त्याने त्याच्या करिअरची सुरुवात केली. नंतर चीफ फिनांन्शियल ऑफिसर म्हणून ग्रोफर्स या कंपनीत काम केले. २०१८ साली भारतपे नावाची कंपनी स्थापन केली. हा झाला अशनीर ग्रोव्हरचा थोडक्यात परिचय.
आता अशनीर ग्रोव्हर आणि त्याचा भारतपे या कंपनीत नेमका काय वाद सुरू आहे ते पाहू. अशनीर ग्रोव्हरवर विविध स्तरातुन बरेच आरोप झालेले आहेत. ते आरोप पुढीलप्रमाणे..
१. भारतपे कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशनीर ग्रोव्हरने असभ्य वागणूक दिली आहे व अशनीर ग्रोव्हरचे कंपनीमधील वर्तनही असभ्य आहे.
२. कमी वयात भारतपेसारखं एक यशस्वी स्टार्ट अप अशनीर ग्रोव्हरने उभं केलं व चालवून दाखवलं , यामुळे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमात त्याला परीक्षक म्हणून बोलवण्यात आलं. पण या कार्यक्रमात आलेल्या स्पर्धकांशी अशनीर ग्रोव्हर हा उद्धटपणे वागला असा आरोप स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी ही केला आहे.
३. त्यावेळी नायका या कंपनीचा आय.पी.ओ. रिलीज झाला होता. या आयपीओमध्ये गुंतवणूक करता यावी यासाठी अशनीर ग्रोव्हरचे प्रयत्न सुरू होते. याकरिता त्याने कोटक महिंद्रा बँकेत ५०० करोडच्या सिक्युरिटीज लोनसाठी अप्लाय केले. त्याने कोटक महिंद्रा बँकेच्या एका कर्मचाऱ्याची मदत घेतली होती. पण काही कारणांमुळे कोटक महिंद्रा बँकेच्या त्या कर्मचाऱ्यांना लोनची अलॉटमेंट करता आली नाही यावरून अशनीर ग्रोव्हर याने त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून धमकीही दिली होती.
४. भारतपे कंपनीने अनेक खोट्या एचआर फर्म्सच्या मदतीने फॉल्स पेमेंट आणि फॉल्स रिक्रुटमेंट केले होते. एखादी कंपनी एचआर फर्मकडे आपल्याला कर्मचारी हवे आहेत म्हणून जाते. एचआर फर्म त्या कंपनीला उत्तम कॅन्डिडेट्स निवडून देते आणि याबदल्यात त्यांच्याकडून काही रक्कम घेते. परंतु, भारतपे कंपनीमधील कर्मचारी कोणत्याही एचआर फर्मच्या माध्यमातून आले नव्हते तर त्यांनी स्वतः कंपनीत येऊन इंटरव्ह्यू दिला होता. तरीही प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या अनेक एचआर फर्म्सनी या कर्मचाऱ्यांना घेतल्याचे कागदपत्रांतून समोर येत होते, म्हणजेच काहीही काम न करता या अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना भारत-पेकडून पैसे जात होते. हे पैसे नक्की कोणाला जात होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
५. Directorate of GST Intelligence या GST संबंधी गुप्तहेर विभागाला भारतपे कंपनीने करोडो रुपये अस्तित्वात नसलेल्या विक्रेत्यांना दिले आहेत आणि कर चुकवले आहेत असे पुरावे मिळाले आहेत आणि हे सगळे व्यवहार अशनीर ग्रोव्हर यांनी केले आहेत असा Directorate of GST Intelligence ने आरोप केला आहे. यामुळे कोटक महिंद्रा बँक आणि Directorate of GST Intelligence ने अशनीर ग्रोव्हर विरोधात कोर्टात केस दाखल केली आहे.
कोणत्याही एका माणसाने कंपनी उभी केली, सुरू केली, तरी त्या कंपनीचं कामकाज कसं असावं, त्या कंपनीने कोणते व्यवहार करावेत, कंपनीचं धोरण कसं असावं हे कंपनी कायदा सांगतो.
आता कोणत्याही एका माणसाने कंपनी उभी केली सुरू केली तरी त्या कंपनीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हे असावे लागतात. कंपनी संदर्भातील मोठे निर्णय व धोरणं ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या संमतीने घ्यावे लागतात.
अशनीर ग्रोव्हरच्या संमतीने केली गेलेली पैशाची अफरा-तफरी जेव्हा भारतपेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी भारतपे जमाखर्चाचे स्वतंत्रपणे लेखापरीक्षण करायचे ठरवले. हे लेखापरीक्षण करण्याचे काम ‘प्राइस वॉटर कूपर’ कंपनीला देण्यात आले. प्राइस वॉटर कूपर त्यांचा लेखापरीक्षण अहवाल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना सोपवेल व या लेखापरीक्षण अहवालात जर हे सिद्ध झालं की अशनीर ग्रोव्हर यांचा संमतीने पैशाची अफरा-तफरी झालेली आहे तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अशनीर ग्रोव्हर यांची त्वरित कंपनीतुन हकालपट्टी करेल हे ठरले होते.
बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने घेतलेल्या भूमिकेवर अशनीर ग्रोव्हरने भूमिका मांडली आहे. अशनीर ग्रोव्हरने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर असा आरोप केला आहे की बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्याचावर दबाव आणून तू आम्हाला भारतपे कंपनीतील तुझा हिस्सा स्वस्त दरात विक असं म्हणत आहेत. पण त्यावर अशनीर ग्रोव्हर असं म्हणतो आहे की जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला त्याची हकालपट्टी करायची असेल तर भारतपे कंपनीने त्याला ४००० करोड रुपये द्यावेत.
वरील परिच्छेदात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि अशनीर ग्रोव्हर यांनी ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या भूमिका जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला आधी कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न समजून घ्यायला लागेल. आता एखादा माणूस जेव्हा एखादी कंपनी सुरू करतो त्यावेळी त्याच्या एकट्याकडे एवढं भांडवल नसतं. भांडवल मिळावं म्हणून पैशाच्या बदल्यात तो माणूस गुंतवणूकदारांना कंपनी मधील एका भागाची मालकी देतो. जेवढी ज्या माणसाची कंपनीमध्ये गुंतवणूक जास्त तेवढ त्या माणसाचं कंपनीचं धोरण ठरवताना वर्चस्व असतं.
आता भारतपेचा शेअर होल्डिंग पॅटर्न पुढीलप्रमाणे
– Sequoia 18.58%
– Ribbit capital 10.66%
– Tiger global 3.51%
– Grace software holdings 9.22%
– Esop 6.69%
– Coatue 11.76%
– Beenext 9.06%
– Ashneer Grover 8.76%
– Steadview 3.88%
– Shashwat nakrani 7.23%
– Others 10.65%
आता यामध्ये sequoia, ribbit capital, coatue हे सर्वांत मोठे गुंतवणूकदार आहेत आणि सर्वात मोठे शेअरहोल्डरही. भारतपेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं असं म्हणणं आहे की जर अशनीर ग्रोव्हर याला त्याचे शेअर्स विकायचे असतील तर त्याला ते कंपनीच्या बाहेर दुसऱ्या कोणत्याही माणसाला किंवा कंपनीला विकता येणार नाहीत, तर अशनीर ग्रोव्हरच्या शेअर्सवर “Right of First Refusal” या संकल्पनेच्या आधारावर विकत घेण्याचा पहिला हक्क हा सर्वांत मोठ्या गुंतवणूकदारांचा आणि सर्वात मोठ्या शेअरहोल्डरचा असेल. तर या परिस्थितीत sequoia, ribbit capital, coatue या तिघांना Right of First Refusal अमलात आणता येईल. तर याला प्रत्युत्तर म्हणून अशनीर ग्रोव्हर याने “Tag Along Rights” या संकल्पनेचा आधार घेतला आहे.
वरील परिच्छेदात आपण दोन संकल्पना पाहिल्या Right of first refusal आणि Tag Along Rights. आता या दोन्ही संकल्पनांचे अर्थ समजून घेऊ.
Right of first refusal
एक उदाहरण घेऊ, समजा तुम्ही एका घरात भाड्याने राहता. एक दिवस तुमचा घरमालक तुम्हाला सांगतो की मी हे घर विकणार आहे. तुझ्याकडे घर रिकामं करायला दोन महिने आहेत. पण तुम्ही म्हणता की जर मी या घरात भाड्याने राहतो तर दुसऱ्या कुणाला हे घर विकण्याआधी मला हे घर विकत घायची संधी द्या. घरमालक म्हणतो ठीक आहे २ महिन्यात १ लाख रुपये दे आणि हे घर विकत घे, पण जर तू दोन महिन्यात हे पैसे देऊ शकला नाहीस तर मी हे घर दुसऱ्या माणसाला विकेन.
तर हेच उदाहरण जर अशनीर ग्रोव्हरच्या प्रकरणात जोडायचं झालं तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असं म्हणत आहेत की Right of first refusal च्या आधारावर अशनीर ग्रोव्हरने त्याचे शेअर बाहेर कुणाला न विकता कंपनीच्या सर्वात मोठया शेअरहोल्डर्सना खेरदी करण्याची संधी द्यावीस.
Tag Along Rights
कंपनी कायद्यात, मोठ्या शेअरहोल्डर्सना आणि लहान शेअरहोल्डर्सना त्यांच्या शेअर्सची विक्री करताना समान संधी व भाव मिळावा म्हणून ही संकल्पना आहे. या संकल्पनेप्रमाणे मोठ्या शेअरहोल्डर्सना त्यांचे शेअर्स विकताना जो भाव मिळेल तोच भाव लहान शेअरहोल्डर्सना ही मिळायला हवा. आता आपण वर पाहिलं की अशनीर ग्रोव्हरने कंपनी सोडण्यासाठी ४००० करोडची मागणी केली होती.
आता या मागचं गणित बघू. भारतपेच्या ३ सर्वात मोठ्या शेअरहोल्डर्सची कंपनीतील एकत्रित भागीदारी बघितली तर ती येते ४१%. त्यावेळी भारतपेचं टोटल व्हॅल्युएशन होतं २९० करोड इतकं. आता २९० करोडचे ४१% म्हणजे सुमारे १०० कोटी आणि अशनीर ग्रोव्हर मागणी करतो आहे ४ हजार करोडची.
भारतपेने अशनीरवर अनेक आरोप लावले, यामध्ये ग्रोव्हरने सुमारे ८१.२८ करोड रुपयांचा घोटाळा केल्याचे भारतपेने म्हटले आहे. याशिवाय खोट्या एचआर फर्म्सना अशनीरने सुमारे ७.६ करोड रुपयांचे पेमेंट केले असल्याचा आरोप, माधुरी जैन यांच्यावर वैयक्तिक खर्चासाठी ५९.७३ लाख रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप हे कंपनीने केला.
अशनीरवर फक्त कंपनीनेच खटले भरले असे नाही तर मॅनेजमेंटमधील इतरांनीही अशनीरविरोधात न्यायालयात धाव घेऊन विविध खटले दाखल केले. २ फेब्रुवारी २०२२ रोजी अशनीरने सीईओ सुहेल समीरला ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’मधून काढून टाकण्याची मागणी करणारे पत्र लिहिले. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून भारतपेने अशनीर ग्रोव्हरच्या पत्नी माधुरी जैन यांची कंपनीतून हकालपट्टी केली. १ मार्च २०२२ रोजी अशनीर ग्रोव्हरने भारतपेमध्ये राजीनामा दिला.
यानंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी अशनीर ग्रोव्हरने कंपनीशी संबंधित ‘गोपनीय माहिती’ इतरांना दिल्याचा आरोप भारतपेने केला. भारतपेची पॅरेण्ट कंपनी रेझिलिएंट इनोव्हेशन्सने याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे.
वरील परिच्छेदात आपण अशनीर ग्रोव्हरवर तो उद्धट आहे आणि लोकांशी त्याने असभ्य वर्तन केलं आहे असे आरोप त्याच्यावर झाले. अशनीर ग्रोव्हरची जी दुसऱ्यांशी वागायची पद्धत आहे त्याला मानसशास्त्रात “गॉड सिन्ड्रोम” असं म्हणतात. या गॉड सिन्ड्रोमची लक्षणं पुढील प्रमाणे..
ही लोकं थोडं जरी यश मिळालं तरी दुसऱ्या लोकांशी उद्धटपणे वागतात, दुसऱ्याचा विचार न करता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतात, दुसऱ्यांनी आपलं ऐकावं म्हणून दादागिरी करतात व धमक्या देतात, या लोकांना त्यांच्याविरुद्ध जरा काही बोललेलं किंवा वागलेलं आवडत नाही.
जर वरील प्रकरण आपण नीट वाचलं तर हे लक्षात येईल की अशनीर ग्रोव्हरच्या वर्तनात ही सर्व लक्षणे प्रकर्षाने दिसून येतात. त्यामुळे अशनीर ग्रोव्हरला बहुधा गॉड सिन्ड्रोम हा मानसिक विकार जडला आहे असं प्रथमदर्शनी वाटत आहे. माणूस भौतिकदृष्ट्या कितीही वर गेला तरीही त्याने आपले पाय जमिनीवर ठेवावेत कारण मराठीत एक म्हण आहे की “गर्वाचं घर खाली असतं” . अशनीर ग्रोव्हरचं पुढं काय होईल याचं उत्तर भविष्याच्या गर्भात दडलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.