उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीमुळे थेट महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची खुर्ची धोक्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार पडण्याच्या बातम्या येत आहेत. हा सगळा नाट्यमय घटनाक्रम काय आहे, हे आता आपण उलगडून बघणार आहोत!
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी, मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिन कांड्या भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाकडून तपास सुरु झाला. सुरुवातीला या गाडीचा मालक कोण आहे? याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. तपासाअंती मनसुख हिरेन या ठाणेस्थित व्यापाऱ्याचे नाव समोर आले.
साहजिकच मनसुख हिरेन यांची चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू असताना मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या आयुष्याला धोका असून त्यांच्या परिवाराला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. तपास सुरू असताना ०५ मार्च २०२१ रोजी ठाण्याजवळील मुंब्रा येथील खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला, त्यांची इनोव्हा गाडी देखील तिथे जवळच आढळून आली.
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये मनसुख हिरेन यांच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या व त्यांच्या तोंडात पाच – सहा रुमाल कोंबलेले आढळले, म्हणजे हे घातपाताचे प्रकरण असल्याचे लक्षात आले.
दरम्यान या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब नोंदवण्यात आला, ज्यात त्यांच्या पत्नीने स्पष्ट केले होते की मनसुख हिरेन यांच्याकडून ती स्कॉर्पिओ गाडी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी घेतली होती व तब्बल ६ महिने त्या गाडीचा वापर केला होता. पण या गाडीचे पैसे न दिल्यामुळे वाझेंनी ही गाडी परत केली.
पुढे ही स्कॉर्पिओ अंबानी यांच्या घराजवळ सापडण्याचा काही दिवस अगोदर मनसुख हिरेन कुठेतरी घेऊन गेले असता, ती तिथून चोरीला गेली होती.
मनसुख हिरेन यांनी आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी घरातून बाहेर पडताना क्राईम ब्रँचच्या तावडे नावाच्या अधिकाऱ्याची भेट घ्यायला घोडबंदर रोड येथे जात असल्याची माहिती देखील दिली होती.
ही बाब समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांच्याकडून चाळीस लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप केला. इतकेच नाहीतर मनसुख हिरेन यांनी या जिलेटिनच्या कांड्या ठेवलेल्या स्कॉर्पिओ गाडीची जबाबदारी देखील स्वीकारावी, यासाठी वाझे दबाव टाकत असल्याचा आरोप देखील फडणवीसांकडून करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वाझेंवर एवढे आरोप लावण्यात आल्याने गृहमंत्री अनिल देशमुखांवर दबाव वाढला व त्यांनी वाझे यांची उचलबांगडी केली.
यानंतर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA ची या सर्व प्रकरणात एन्ट्री झाली व त्यांनी सचिन वाझेंची चौकशी करण्यास सुरुवात केली. मनसुख हिरेन यांच्याकडून ती स्कॉर्पिओ गाडी घेऊन सचिन वाझे यांनी स्वतः अंबानी यांच्या घराजवळ पार्क केली, अशी NIA ला शंका होती.
१३ मार्चला NIAने सचिन वाझेंची चौकशी केली व १४ मार्चला सचिन वाझेंना अटक केली. २५ मार्चपर्यंत सचिन वाझेंची विशेष न्यायालयाने NIAला कस्टडी दिली. NIAने त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्यादिवशी स्कॉर्पिओ गाडी पार्क करणारा पीपीई किट घातलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हेतर खुद्द सचिन वाझेच असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणात वाझे यांनी मनसुख हिरेन यांची त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एका मर्सिडीज गाडीतून भेट घेतल्याचा संशय देखील NIAकडून व्यक्त करण्यात आला. पण या मर्सिडीज गाडीच्या डिटेल्सचा शोध घेतल्यावर ही गाडी धुळ्याच्या भाजपा पदाधिकाऱ्याची असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. पण हे आरोप बिनबुडाचे असून ती गाडी आधीच विकण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली व त्या पत्रकार परिषदेत त्यांनी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी चांगले संबंध असल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर, वरूण सरदेसाई हे सचिन वाझे यांच्याकडून खंडणीतील हिस्सा मागतात असा आरोप राणे यांनी केला. त्यांनी वाझे व सरदेसाई यांच्यातील कॉल रेकॉर्ड तपासून पाहण्याची मागणी केली. सचिन वाझे यांना वरूण सरदेसाई यांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ती स्कॉर्पिओ गाडी लावली, त्या रात्री देखील फोन कॉल केल्याचे समोर आले. तर इकडे वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणात मुंबई पोलीस दलाची होणारी नाचक्की बघता, मुंबई पोलीस दलात अचानक मोठे बदल करण्यात आले व मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गृहसंरक्षक दलाच्या महासंचालकपदी बदली करण्यात आली व हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली व भाजपाच्या शिष्टमंडळासह केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवारांना जाऊन भेटले.
या अगोदर अनिल देशमुख यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाद्वारा आयोजीत एका कार्यक्रमात ‘मुंबई पोलिसांकडून मनसुख प्रकरणात काही चुका झाल्या’ असा स्पष्ट कबुलीजबाब दिला होता. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे व तपासात लवकरच सर्व स्पष्ट होईल असं देखील देशमुख म्हणाले होते.
दरम्यान दिल्लीत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन ते सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी दबाव टाकला असा खळबळजनक खुलासा केला. याबरोबरच सचिन वाझे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नेमणूक केली व त्यांच्यावर वसुली करण्याची जबाबदारी टाकण्यात आली, असा आरोप देखील फडणवीसांनी केला. त्यांनी वाझे यांना मुद्दाम सर्व हाय प्रोफाइल केसेसमध्ये सामील करण्यात आले, असे देखील फडणवीसांनी स्पष्ट केले.
दिनांक २० मार्च रोजी, मुंबई पोलीस दलाचे माजी अधीक्षक व गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोशारी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ई-मेलवर एक पत्र पाठवले.
या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील १७५० बार व हॉटेल्समधून प्रत्येकी २-३ लाख खंडणी घेऊन दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा, गंभीर आरोप करण्यात आला. इतकेच नाहीतर दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस दलावर गृहमंत्र्यांनी दबाव टाकल्याचे देखील परमबीर सिंग यांनी स्पष्ट केले.
या पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. वाझे प्रकरणात परमबीर सिंग स्वतः अडचणीत येत असल्याने त्यांनी माझ्यावर आरोप केल्याचे, अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. हे पत्र समोर आल्यावर विरोधी पक्ष भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री खंडणी वसूल करायला लावतो ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असून या प्रकरणाचा केंद्रीय संस्थेकडून तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान शरद पवार यांनी ह्या प्रकरणाची ज्युलिओ रीबेरो यांच्यासारख्या निष्पक्ष निवृत्त अधिकाऱ्याकडून चौकशी करत मुख्यमंत्र्यांनी याविषयी निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हे उद्यापर्यंत ठरवू असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय परमबीर सिंगांनीच सचिन वाझे यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय अशी नियुक्ती शक्य नसल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नसल्याचे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान एटीएसकडून मनसुख हिरेन प्रकरणात ज्या दोन जणांची अटक करण्यात आली होती त्यांचा ताबा NIAने घेतला असून आता ते पुढील तपास करत आहेत.
आता हे प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आता अजून काय समोर येते, याची वाट सर्वजण बघताय. एका गल्लीत सापडलेल्या स्कॉर्पिओने पार दिल्लीपर्यंतचे राजकारण हादरवून सोडले आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.