आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सौदी अरेबियामध्ये अलीकडच्या काळात मोठा सत्ता बदल घडून आला आहे. या सत्ता बदलासोबतच आता सौदी-अरेबिया आपली कात टाकणार अशीही चर्चा सुरू आहे. मुहम्मद बिन सलमान सौदी-अरेबियाचे उत्तराधिकारी म्हणून निवडले गेले आहेत आणि ही निवड खुद्द त्यांचे वडील किंग सलमान बिन अब्दुल अझीझ अल सौद यांनी केली आहे. अर्थात राजाच्या मुलगा राज्याचा उत्तराधिकारी होणार नाही तर दुसरा कोण होणार? असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो पण इथे मुहम्मद बिन सलमान यांच्या निवडी मागे घराणेशाहीचा पाठींबा हे कारणच नाहीये हीच आश्चर्याची गोष्ट आहे.
मुहम्मद बिन सलमान, ज्यांना पश्चिमेत एमबीएस म्हणून ओळखले जाते, यांच्या आधी सौदीचे उत्तराधिकारी हे त्यांचेच चुलत भाऊ मुहम्मद बिन नयाफ हे होते. पण, काही कारणाने त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. इकडे एमबीएस यांनी राज्याची सूत्रे आपल्या हातात येताच नवा सौदी कसा असेल याची झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे. उत्तराधिकारी बनण्यासाठी त्यांनी आधी स्वतःला सिद्ध केले आहे.
आपल्या स्वप्नातील सौदी निर्माण करताना जो कुणी अडवा येईल त्याची गय केली जाणार नाही असाही एक संदेश एमबीएसने आपल्या कृतीतून दिला आहे. यासाठी त्याने सौदीतील मोठ्या नेत्याविरुद्धही कारवाई करण्यात कुचराई केलेली नाही.
३५ वर्षाचा एमबीएस हा सर्वात तरुण सत्ताधीश आहे, असे म्हणावे लागेल. २००९ मध्ये एमबीएसने आपल्या वडिलांसाठी विशेष सल्लागार म्हणून काम केले होते.
यावेळी त्यांच्या हातात पुरेशी सत्ता आणि प्रभाव नसल्याने त्यांच्या अनेक योजनांना मूर्त स्वरूप देणे शक्य झाले नाही. २०१२ साली त्यांना राजकुमार घोषित केले आणि गेल्याच वर्षी त्यांना राजाने आपला उत्तराधिकारी घोषित केले. आता मात्र त्यांच्या हाती सत्ताही आलेली आहे आणि त्यांचा प्रभावही वाढला आहे. सामान्य जनतेतही एमबीएसची प्रतिमा काहीशी उजळ आहे. २०१२ पासूनच आपल्याकडे आलेल्या सत्तेचा फायदा घेत त्यांनी अनेक सुधारणा लागू केल्या. उत्तराधिकारी घोषित केल्या केल्या त्यांच्याकडे राष्ट्राचे संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आले आहे. या पदावर असलेला तो जगातील सर्वात तरुण नेता आहे. संरक्षण मंत्रालय मिळताच त्यांनी इराण विरोधात अमेरिकेशी आघाडी करण्याचे धोरण स्वीकारले. सौदीसाठी हा एक महत्वाचा आणि धाडसी निर्णय होता.
यानंतर सलमानने असे काही धाडसी निर्णय घेतले की ज्यामुळे राजघराण्यातील लोकांना ते आपला वारसा चालवण्यास सक्षम असल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांना डेप्युटी क्राऊन प्रिन्स पदी नेमण्यात आले.
सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यासाठी आणि तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांनी पावले उचलली. यासाठी त्याने व्हिजन २०३० या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. या कार्यक्रमाअंतर्गत सौदीतील अनेक क्षेत्रांचे खाजगीकरण करण्याचे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे तेल व्यापार सोडून इतर क्षेत्रातूनही महसूल उत्पन्न वाढेल.
क्राऊन प्रिन्स या महत्वाच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अशाप्रकारे एमबीएसने एकेक टप्पे सर केले आहेत. शेवटी सौदीतील सर्वोच्च स्थान प्राप्त करणे हेच तर त्यांचे ध्येय होते आणि ते त्यांनी मिळवले देखील.
सौदीतील प्रतिगामी सौदी वाहब्बी हे तिथले धर्मपंडित समजले जातात. या प्रतिगामी धर्मपंडितांना मान्य होणार नाहीत असेही अनेक निर्णय एमबीएसने घेतले. देशाच्या विकासासाठी धर्मसत्तेविरुद्धही पंगा घेण्याची त्यांची ही खेळी यशस्वी ठरली. यामुळेच त्याला सामान्य जनतेत हिरो बनणे सहज साध्य झाले. राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात तर त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतलेच पण अनेक सामाजिक सुधारणांना चालना देऊन त्यांनी समाजपरिवर्तनासाठीही मोठी पावले उचलली आहेत.
सामाजिक परिवर्तनामध्ये स्त्रियांवरील बंधनांना त्यांनी प्रथम आव्हान दिले आहे. स्त्रियांना अधिक अधिकार असले पाहिजेत या मताचा असल्याने त्यांनी स्त्रियांच्या अधिकारात वाढ केली आहे. अधिकाधिक स्त्रियांनी नोकरी करण्यास पुढे यावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. याचा अर्थ सरळ आहे की, त्यांच्या आर्थिक नियोजनात स्त्रियांना मोठी संधी असणार आहे.
सौदीमध्ये गेली कित्येक दशके चित्रपटगृहांवर बंदी होती. त्यांनी ही बंदी उठवली. अगदी मारिया कॅरेसारख्या गायकांनाही त्याने आपल्या गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. महिलांना वाहन चालवण्याचे परवाने दिले आहेत. त्यांचे हे निर्णय सौदीतील सामाजिक जडणघडणीला अर्थातच हादरे देणारे आहेत.
सौदीतील पोलीस दलातही त्यांनी काही प्रमुख बदल केले आहेत. सौदीतील पोलीस दलाचा वापर हा लोकांच्या खाजगी आयुष्यावर निगराणी ठेवण्यासाठी आणि त्यांची नैतिक मुल्ये तपासणीसाठीच केला जात असे. आता लोकांना अशा कुठल्याही निगराणी शिवाय मोकळेपणाने वावरता येणार आहे. या प्रतिगामी विचारांच्या शक्तींना बळी न पडता आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेऊ शकतात. सौदीतील हा बदल खूप महत्वपूर्ण आहे.
काहींच्या मते मात्र एमबीएसची ही धोरणे म्हणजे निव्वळ दिखाऊगिरी आहे. त्यांच्या या अशा निर्णयामुळे सौदीत लगेच बदल घडेल किंवा या बदलांना प्रोत्साहन मिळेल असे वाटत नाही. अशा शंका व्यक्त केल्या जाता असल्या तरी त्यांच्या नेतृत्वाखालील सौदीमध्ये नक्कीच मोठा बदल झालेला आहे.
सत्ता मिळताच त्यांनी भ्रष्टाचार विरोधी समिती स्थापन केली. ते स्वतः या समितीचा अध्यक्ष आहेत. या समितीचे कायदे अतिशय कडक बनवण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे एकही बड्या नेत्याला या समितीने थोडीही ढील दिलेली नाही. मात्र स्वतः सलमानची मात्र कधीच या कायद्याअंतर्गत चौकशी झालेली नाही.
सलमानचे स्वतःचे राहणीमान अतिशय उंची आणि अलिशान आहे. अगदी लिओनार्डोची काही महागडी चित्रेही त्यांच्या वैयक्तिक संग्रहात आहेत. पण त्यांनी ही संपत्ती कशी जमवली याबद्दल कुणीही ब्र देखील उच्चारू शकत नाही.
याउलट आपल्या विरोधकांना मात्र ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे अदेश देत आहे. अगदी राजघराण्यातील आणि धार्मिक वर्तुळातील उच्चपदस्थ व्यक्तीही याला अपवाद नाहीत. सत्ता मिळाल्याच्या अवघ्या काही महिन्यातच सौदीतील अर्थव्यवस्थेपासून ते परदेश नीती आणि समाज जीवन अशा सगळ्याच क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेले आहेत.
अर्थात आपल्या स्वप्नातील सौदी उभारण्यासाठी एमबीएस कुठल्याही मर्यादांचा विचार करणार नाही याचे मात्र त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. हा बदलता सौदी जगासाठी आणि खुद्द तेथील सामान्य नागरिकांसाठी कितपत फायद्याचा ठरतो हे आता येणारा काळच सांगेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.