आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पुण्यात एक म्हण आहे की, “दूध गाईचं नसावं म्हशीचं नसावं ते चितळेंचच असलंच पाहिजे.”
यावरून एक गोष्ट लक्षात येते आज चितळे बंधू हा ब्रँड पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. पुण्यात असा एकसुद्धा सण साजरा होत नाही ज्याला चितळेंचं श्रीखंड घरात येत नाही. घरातल्या दुधापासून चटकदार खमंग पदार्थांपर्यंत चितळेंच्या सर्वच उत्पादनांनी देशविदेशातील खवय्यांच्या मनात घर केलं आहे.
कधीकाळी दुग्धव्यवसाय म्हणून चालू झालेला हा उद्योग आता परिपूर्ण खाद्यउद्योगात बनला असून महाराष्ट्रातच नाही तर देशभर विस्तीर्ण पसरतो आहे.
कितीही व्याप वाढला तरीही चितळे बंधूंनी आपल्या पदार्थांची चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवत ग्राहकांचा विश्वास जपला आहे.
भिलवडीसारख्या छोट्याशा गावातून चालू झालेला हा व्यवसाय आज देशविदेशात जाऊन करोडोंचा व्यापार करतो आहे. चितळे बंधूंची चौथी पिढी सध्या व्यवसायात असून ते सुद्धा या व्यवसायाच्या तत्वांना बांधील राहूनच हा उद्योग पुढे घेऊन जात आहेत. पण एवढा मोठा उद्योग एका रात्रीच नक्की मोठा झाला नाही, त्याच्या मागे आहेत अथक परिश्रम, आणि खडतर प्रवास.
तर आज आपण चितळे बंधूंच्या प्रवासावर एक नजर टाकूया.
कै. भास्कर गणेश चितळे आणि जानकीबाई चितळे यांनी १९३६च्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कृष्णातिरी वसलेल्या भिलवडी या गावात दुग्धव्यवसाय सुरू केला. भास्कररावांकडे त्या काळात ५५० ते ६०० म्हशी होत्या आणि तेव्हा ते दुधाचे वेगवेगळे पदार्थ साताऱ्यात बनवायचे पण ते करत असतानाच त्यांना कृष्णेचं पाणी कमी पडायला लागलं अन् पाण्याची चणचण भासू लागली.
त्यामुळे पाणी आणि सुपीक जागेच्या शोधात ते भिलवडी इथे येऊन पोहोचले, आणि १९३९ साली भास्कररावांनी सांगली जिल्ह्यात कृष्णातीरी वसलेल्या भिलवडी या गावात दुग्धव्यवसायास प्रारंभ केला.
बहुतेक जणांना हे माहीत नसावं की चितळेंनी दुग्धजन्य पदार्थ व उपपदार्थ विकायची सुरुवात मुंबईत केली होती. पण पुढे तिथे त्यांना तिथे आपला व्यवसाय चालवण्यात अडचणी येऊ लागल्या.
आपला उद्योग चालवण्यास पुणे हेच शहरच योग्य अन् स्थिर आहे असं त्यांना वाटलं त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय पुण्यातच चालू ठेवला.
भास्कररावांनंतर त्यांच्या दुसऱ्या पिढीतल्या काकासाहेब आणि नानासाहेब चितळे यांनी तो उद्योग सांभाळला. त्यानंतर त्यांची तिसरी पिढी म्हणजेच विश्वास, अनंत, श्रीपाद, गिरीश आणि मकरंद चितळे यांनी मिळून हा उद्योग पुढे नेला.
आज त्यांची चौथी पिढी म्हणजेच इंद्रनील चितळे आणि त्यांचे मोठे चुलत बंधू केदार चितळे हा उद्योग सांभाळत आहेत.
जर कुठल्याही व्यवसायातील स्पर्धकांसोबत तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमचं तुमच्या उद्योगातील तंत्रज्ञानावर पकड असणं आणि बदलत्या काळानुसार ते सतत अद्ययावत करणं आवश्यक असतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन चितळेंनी त्यांच्या उद्योगात आधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया, त्याचबरोबर दूध पाश्चरायजेशन आणि विविध दुग्ध उत्पादने तयार केली.
आज चितळेंच्या दुधाचा व्यवसाय रोज जवळजवळ साडे तीन ते ४ लाख लिटर्स दूध संकलनावर पोहोचला आहे. या प्रसिद्ध उद्योगानं त्यांच्या भिलवडी गावाला देशभरात लौकिक मिळवून दिला आहे.
सुरवातीच्या काळात मुंबई -पुण्यात दूध उत्पादन किंवा मिठाईचे उद्योग यांवर गुजराती व्यापाऱ्यांचे वर्चस्व होतं. या व्यापाऱ्यांशी स्पर्धा करून आज चितळेंनी दूध उत्पादनाबरोबरच मिठाई, बाकरवडी यांच्या उत्पादनांद्वारे संपूर्ण देशभरात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
व्यवसायाबद्दल बोलताना चितळे नेहमी सांगतात की, भास्कररावांनी किंवा त्यांच्या कुठल्याच पिढीने कधीच आपल्या पुढच्या पिढीवर उद्योग सांभाळण्याची सक्ती केली नाही.
याचा एक किस्सा असा, की तिसऱ्या पिढीतले विश्वास परशुराम चितळे यांनी इंजिनीरिंग पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत येऊन राहा असा आग्रह त्यांच्या मित्रांनी केला तेव्हा त्यांचे वडील विश्वासरावांना सहज म्हणाले, “जितका तिथे मिळेल तितकाच पगार मी तुला इथं देतो, वाटल्यास वर्षभर काम कर नाही आवडलं तर जा अमेरिकेला”.
विश्वासरावांनी ते मान्य करून पुढे वर्षभर संशोधन विकास क्षेत्रात काम केलं, यात ते इतके दंग झाले की परत त्यांनी अमेरिकेला जायचा विषयच काढला नाही. पुढे उद्योग क्षेत्रात त्यांना “डेल” या नामांकित पुरस्कारानं गौरविण्यात आलं.
१९८७ ते १९८९च्या दरम्यान भारतात पहिल्यांदा चितळेंच्या दुकानात RFI बिलिंग प्रणाली आली.
म्हशींच्या जेनेटिक्सवर अभ्यास करणारं जगातलं पहिलं केंद्र हे भिलवडीतच आहे. त्याचबरोबर म्हशींना खाऊ घालण्यापासून ते दूध काढण्यापर्यंत पूर्णपणे संगणकावर चालणारा अत्याधुनिक गोठा पहिल्यांदा चितळ्यांनीच भिलवडीत उभारला.
दुग्धोत्पादन व्यवसायात यश संपादन केल्यानंतर चितळेंनी बाकरवडीच्या व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीला बरीच माणसं ठेवूनही हवं तेवढं बाकरवडीचं उत्पादन मिळण्यास अडचण यायची. शेवटी हवं त्या पद्धतीचं बाकरवडीचं मशीन बनवून घेऊन त्यांनी तो उद्योग देखील पुढे नेला.
आज चितळेंकडे एका दिवसात जवळपास अडीच ते ३ टन इतकं बाकरवडीचं उत्पादन होतं.
चितळे बंधूंनी कधीच आपल्या व्यवसायासाठी जाहिरात हे प्रमुख संसाधन मानलं नाही. उत्पादनाची गुणवत्ता आणि चव हीच आज त्यांची चालतीबोलती जाहिरात आहे.
चितळेंची सगळी उत्पादनं गृहीत धरली तर जवळपास २२५ विविध उत्पादनांची निर्मिती एका दिवसात केली जाते. एका मुलाखतीत चितळेंच्या उद्योग आणि त्याच्या विस्ताराबद्दल बोलताना इंद्रनील चितळे यांनी सांगितले की, पुण्यात चितळेंच्या विविध दुकानांमध्ये सरासरी १५०च्या जवळपास लोकं काम करतात आणि त्याव्यतिरिक्त पुण्यातल्या विविध कारखान्यांमध्ये ४५० लोकं काम करतात. एवढेच नाही तर जर एकूण देशांतर्गत पाहणी केली तर जवळपास १४०० ते १५०० लोकांना आज चितळेंच्या उद्योगामुळे रोजगार मिळत आहे.
चितळेंनी ७५ वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा टप्पा पार केला आहे. एवढी वर्ष होऊनही त्यांनी त्यांच्या उत्पादनांमधली चव आणि गुणवत्ता कायम ठेवल्यामुळे आज चितळे बंधू हा पुणेकरांचा आणि तिथल्या खवय्यांचा लाडका ब्रँड झाला आहे हे म्हणण्यास हरकत नाही..!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.