आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मनोरंजनाचे साधन असणारे सिनेमे आणि मालिका आता वास्तविकतेचे दाहक दर्शन घडवून आणणारी माध्यमं झाली आहेत असे म्हणण्यास काही हरकत नाही. समाजातील विकृत चालीरीतींचे दर्शन घडवताना फक्त बंगल्यातल्या लोकांचे प्रश्नच नाही तर झोपडपट्टीतील समस्याही आता पडद्यावर आणल्या जात आहेत.
आता जरी या गोष्टी सामान्य वाटत असल्या तरी सुरुवातीच्या काळात सामान्य नागरिकाचे जीवन जास्त माध्यमांमध्ये दिसत नसे. या परंपरेची सुरुवात करण्याचे श्रेय दिले जाते ते सईद मिर्झाच्या नुक्कड या टिव्ही मालिकेला.
सर्वसमावेशकता आणि समाजाविषयीची आपुलकी दाखवणारी ही मालिका १९८६ साली दुरदर्शन या त्यावेळच्या एकमेव राष्ट्रीय वाहिनीवर सुरु झाली होती. ८०चे दशक म्हणजे भारतात दुरदर्शनचे दशकच मानले जाते. सरकारी मालकीची ही एकमेव वाहिनी त्यावेळी भारतात होती. मध्यमवर्गीय समाजाशी निगडीत ‘हम लोग’ तसेच ‘रामायण’ आणि ‘महाभारत’सारख्या पौराणिक कथा त्यावेळी दुरदर्शन दाखवत असे.
८०च्या दशकात हळुहळु सामान्य लोकांचे वास्तविक जीवन पडद्यावर येण्यास सुरुवात झाली. या बदलाची नांदी ‘नुक्कड’ या मालिकेने केली असेच आजही मानले जाते.
पान विक्रेता, सफाई कामगार, भिकारी, चहा विक्रेता, दारुडा, सायकल दुरुस्ती करणारा अशा अनेक लोकांच्या आयुष्यावर भाष्य करणारी ही मालिका म्हणजे भारतीय मनोरजंन सृष्टीतील एका मोठ्या क्रांतीची सुरुवात होती.
राष्ट्रीय पातळीवर प्रतिनीधित्व नसलेल्या या वर्गाचे चित्र पडद्यावर साकारणे अतिशय जिकरीचे आणि जोखमीचे काम होते. गरिबांच्या जीवनावर आधारित या मालिकेची जबाबदारी होती निर्माता सईद मिर्झा, त्याचा भाऊ अजीज आणि दिग्दर्शक कुंदन शहा यांच्यावर. मालिकेला गंभीर न बनवता थोड्या हलक्याफुलक्या पद्धतीने ती लोकांसमोर सादर केली गेली.
मुंबईमध्ये चित्रीत केलेली ही मालिका १०० भागांत प्रदर्शित करण्यात आली. ४-५ मुख्य कलाकारांना घेऊन बनवण्यात येणाऱ्या मालिका बघण्याची सवय असणाऱ्या भारतीय प्रेक्षकांसाठी ही मालिका तशी वेगळी होती. २०पेक्षाही जास्त मुख्य कलाकारांना बरोबर घेऊन ही मालिका बनवण्यात आली होती.
वेगवेगळ्या वर्गातील, व्यवसायातील लोकांना बरोबर घेऊन बनवलेली ही मालिका भारताच्या विविधतेचे दर्शनसुद्धा घडवत होती. “अलग अलग तकदीर हैं सबकी, अलग अलग हैं बोली.” असे बोल असणारे मालिकेचे गीत या विविधतेला योग्यपणे दर्शवत होते.
“अजब तमाशा हैं ये नगरी, सब दुख सुख मे हसते गाते, अपनी बर्बादी का ये तो जश्न मनाते है.” असे बोल असणारे मालिकेचे एक गीत मालिकेचे अतिशय मार्मिक वर्णन करण्यास पुरेसे आहे. टिव्हीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यात नुक्कड मालिकेचा खुप मोठा हातभार आहे असे सईद मिर्झा यांच्या पत्नी जेनिफर मिर्झा सांगतात.
मालिकेचे निर्माते असलेले सईद मिर्झा “मोहन जोशी हाजिर हो” आणि “अल्बर्ट पिन्टो को गुस्सा क्यो आता हैं” यांसारख्या सिनेमांमधून आधीच प्रसिद्ध होते. नुक्कडच्या निर्मितीची कल्पना उदयास आली ती कुंदन शहा आणि माहिती प्रसारण सचिव एस.एस.गिल यांच्या दिल्लीतील भेटीच्या वेळी.
नंतर मिर्झा आणि कुंदन शहा यांनी गिल यांना भेटून मालिकेची कल्पना सांगितली तेव्हा गिल यांनीच मालिकेला गंभीर न बनवता हलक्या स्वरुपाची ठेवण्यास सांगितले. गरिबांना त्यांची परिस्थिती गांभीर्याने बघणे आवडणार नाही असा युक्तिवाद त्यांनी त्यावेळी केला होता.
मालिका सुरू झाली आणि हळुहळु मालिकेचा मुख्य उद्देश स्पष्ट होत गेला. रस्त्यावरचं आयुष्य दाखवणारी ही मालिका प्रत्येक भागात नुक्कडमधील लोकांच्या आयुष्यावर अधिक खोलवर भाष्य करत गेली.
दुकानदाराने सफाई कामगाराला हाकलून लावणे, भिकाऱ्याने मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींना लुबाडणे, सायकल दुरुस्ती करणाऱ्या मुलाने दुकानदाराच्या मुलीशी केलेली छेडछाड या सगळ्या गोष्टी त्यावेळी भारतात असलेल्या गरीब-श्रीमंत यांच्यातील दरीवर भाष्य करत होत्या. उच्च वर्गाच्या दबावाखाली दबून न जाता अ*त्याचाराविरोधात उठवला गेलेला आवाज या सगळ्या गोष्टी त्यावेळी क्रांतीकारी समजल्या गेल्या.
डाव्या विचारसरणीवर विश्वास असलेल्या मिर्झा यांनी मालिकेत गरीब पात्रांना जास्त महत्त्व दिले. भिकारी, गाडी दुरुस्त करणारा मुलगा, सफाई कामगार हे या मालिकेच्या डाव्या विचारसरणीचे दर्शक होते, मध्यभागी शिक्षक, चहावाला तर उजव्या विचारसरणीचे दर्शन दुकानदार, बनिया यांद्वारे केले जात होते. सगळे कुटुंब मालिकेच्या वेळी एकत्र बसून मालिका बघत असत. या प्रकारची प्रसिद्धी मालिकेला मिळाली.
मालिका सुरू झाली तेव्हापासूनच मालिकेत बरीचशी कामे घरगुतीच होती. बरेचशे कलाकार एकमेकांचे नातेवाईकच होते. सईद मिर्झा यांच्या घरीच मालिकेचे कार्यालय होते. मिर्झा आणि शहा यांनी अजीजला बरोबर घेतले. त्यानंतर अजुन काही जवळच्या मित्रांना बरोबर घेऊन काम सुरु करण्यात आले.
पुढे जाउन हेच ‘नुक्कड कुटुंब’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मिर्झाच्या जुन्या निर्मितीसमूहातील सहकारी पवन मल्होत्रा याने हरीची (सायकल दुरुस्ती करणारा) भूमिका साकारली. पुढे जाउन तो मिर्झाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या “सलीम लंगडे पे मत रो” या समुहाचा हिस्सा होता.
सईद मिर्झाची पुतणी नयनतारा कलगुटकर पोशाख डिझाइन करु लागली. काहींची मुले मालिकेत मुख्य कलाकारांच्या मागे असलेल्या कलाकारांतसुद्धा उभी राहिली. मिर्झाच्या मोठ्या मुलाला तर शाळेत ‘नुक्कड मिर्झा’ नावाने बोलावले जात असे.
बरेच कलाकार एक तर राष्ट्रीय नाटक अकादमी किंवा पृथ्वी थेटरमधील होते. ही मालिका त्यांच्यासाठी कमाईचे पहिले पुर्णवेळ साधन होते. महिन्यात २० दिवस मालिकेचे चित्रीकरण चालत असे. कलाकाराला प्रत्येक दिवसाचा पगार त्याच दिवशी दिला जात असे.
मालिकेतील खोपडी, कादरभाई, घनशू भिकारी ही घरगुती नावे बनली होती. या मालिकेत काम करणारे कलाकार, दिलीप धवन, राम विज, संगीता नाईक आणि अवतार गिल हे नुक्कड कुटंबाचे एक अविभाज्य घटक बनले होते.
यातील बरेचसे कलाकार नुक्कडच्या दुसऱ्या आवृती ‘नया नुक्कड’ मध्येसुद्धा दिसले. मालिकेने बऱ्याच कलाकारांना घराघरांत पोहचवले. आधीच सिनेमामुळे प्रसिद्ध असले तरी सईद मिर्झा यांनासुद्धा या मालिकेने मोठी ओळख दिली. पुढे जाऊन सईद मिर्झा म्हटलं की नुक्कडचे निर्माते हीच त्यांची ओळख तयार झाली.
“द स्टोरी ऑफ नुक्कड” नावाची एक मालिका नुक्कड मालिकेचा इतिहास दाखवण्यासाठी निर्माण केली गेली आहे. सईद मिर्झा यांचे मित्र आणि शेजारी असलेले किरीट खुराना या मालिकेचे दिग्दर्शक आहेत.
रस्त्यावरचे आयुष्य टिव्हीवर नेणाऱ्या या क्रांतीकारी मालिकेचा परिणाम म्हणूनच की काय आता या विषयांवर अगदी मोकळेपणाने चित्रपट आणि मालिकेतुन भाष्य कले जात आहे. सिनेसृष्टीला दिलेल्या या नविन दृष्टीकोणासाठी भारतीय प्रेक्षक नेहमीच या मालिकेचा ऋणी राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.