आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
स्वातंत्र्यपूर्व काळातील पतियाळा संस्थानचे संस्थानिक महाराजा भूपिंदर सिंह आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या बऱ्याच गोष्टींसाठी आजतागायत चर्चेचा विषय बनले होते. भूपिंदर सिंहांची ऐषोरामाची जीवनशैली, खेळावर असलेले विशेष प्रेम आणि प्राविण्य, एवढेच नाही तर, अगदी खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे देखील ते आजही कुतूहलाचा विषय आहेत.
संपूर्ण भारतात सर्वांत आधी स्वतःच्या मालकीचे खाजगी विमान खरेदी केलेली व्यक्ती म्हणजे महाराजा भूपिंदर सिंह.
बऱ्याचदा परदेश दौऱ्यांसाठीही या विमानाचा वापर केला जाई. या एका विमानासाठी पतियाळा येथे विशेष धावपट्टी देखील उभारण्यात आली होती. शौकीन जीवनशैली असलेले महाराजा हे जेव्हा परदेश दौऱ्यासाठी जात, तेव्हा आलिशान राजमहाल ते पूर्णपणे स्वतःसाठी आरक्षित करून ठेवत असत. त्यांच्या ठायी असलेल्या तब्बल ४४ रोल्स रॉयल कारपैकी २२ कार ते दररोज वापरात आणत.
भूपिंदर सिंहांच्या विलासी जीवनशैलीचे एक उदाहरण म्हणजे त्यांनी ‘कार्टर एस ए’ या त्या काळच्या जगविख्यात पर्शियन जवाहिऱ्याकडून बनवून घेतलेला बहुचर्चित पतियाळा नेकलेस, जो बनविण्यासाठी भारतातून मौल्यवान हिऱ्यांचे पेटारे त्यांनी परदेशी पाठविले होते. त्याबद्दल असे बोलले जाते की, तब्बल २.५ करोड डॉलर्स एवढी प्रचंड किंमत असलेला हा नेकलेस आजपर्यंतचा सर्वाधिक महागडा दागिना आहे.
१९२२ साली प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीसाठी महाराजांनी शाही जेवणासाठी १४०० सोन्या-चांदीच्या थाळ्या तयार करून घेतल्या होत्या.
जर्मनीचा हुकूमशहा हि*टल*र याने महाराजा भूपिंदर सिंग यांना मैत्रीखातर मर्सिडीज मेबॅक ही लोकप्रिय कार भेट म्हणून दिली होती.
भूपिंदर सिंह यांच्या एकूण १०पेक्षा जास्त महाराण्या व तब्बल ३०० हुन अधिक उपराण्या होत्या! एवढेच काय तर त्यांचे ८८ औरस अपत्य देखील होते. असे सगळे असले तरी भूपिंदर हा हेकेखोर, छळवादी, भ्रष्ट आणि मद्यपी महाराजा होता अशी टीकाही काही पुस्तकांत केलेली आढळते.
महाराजा भूपिंदर हे आपल्या वयाच्या नवव्या वर्षी राजगादीवर विराजमान झाले. १९२५ साली ‘लीग ऑफ नेशन्स’मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ऐतिहासिक ठरलेल्या गोलमेज परिषदांना देखील भूपिंदर सिहांची हजेरी होती.
पटियाळाच्या खास वास्तुस्थापत्य शैलीत देखील महाराजांचे महत्त्वाचे योगदान होते. तेथील काली मंदिर, चेल महाल इत्यादी वास्तू याच खास शैलीत बांधण्यात आल्या आहेत.
भूपिंदर सिंहांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचे खेळावर असलेले विशेष प्रेम. विशेषतः पोलो आणि क्रिकेट या दोन खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले होते. त्याकाळी जगातील सर्वाधिक पदकांच्या कमाईसाठी देखील ते नावाजलेले होते. पोलो आणि क्रिकेटच्या ‘पतियाळा ११’ आणि ‘पतियाळा टायगर्स’ या भारतातील सर्वोत्तम टीम भूपेंदर सिंहांच्याच होत्या.
पण, क्रिकेटसाठी ते बेताल उधळपट्टी करायचे असाही आरोप त्यांच्यावर केला जातो. बीसीसीआयच्या स्थापनेवेळी त्यांनी मोठी आर्थिक मदत केली होती, मुंबईतील स्टेडियमचा काही भाग खास त्यांच्या नावाने बनविण्यात आला होता. ब्रिटिश प्रशिक्षकांना सर्वप्रथम भारतात बोलावणारे महाराज म्हणून ते ओळखले जातात.
त्यांची स्वतःची क्रिकेट टीम होती. त्या टीमचे कर्णधारच ते होते. एवढेच नव्हे तर भूपिंदर सिंग हे मेलबर्न देशाच्या बाजूने देखील मैदानात उतरले होते. त्यांनी केलेल्या भरगच्चं आर्थिक मदतीमुळे त्यांना संघामध्ये महत्त्वाचे स्थान सहज मिळत गेले अशीही टीका भूपिंदर महाराजांवर केली जाते.
ऐशोआरामात आपले आयुष्य घालवणारा हा राजा चांगला होता की वाईट हे तर माहिती नाही पण त्याच्याबद्दल सतत काही ना काही चरमरीत खबरी येत असतात हे मात्र खरं!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.