आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
शरीराला होरपळून टाकणाऱ्या कडक उन्हात एखाद्या म्युझियममधे ठेवलेल्या सांगड्याप्रमाणे शरीरयष्टी असलेले लोक अन्नाच्या एका तुकड्यासाठी एकमेकांशी जीवाच्या आकांताने भांडणं करत आहेत, आजूबाजूला प्रेतांचा खच पडलेला आहे, त्यांच्यावरील मांसाला गिधाडं आणि कुत्रे लचके तोडून ओरबाडत आहेत, एक म्हातारा मनुष्य, ज्याच्या पाठीतून त्याच्या कणा बाहेर येताना दिसतोय, तो पाण्याचा एका थेंबासाठी त्रासला आहे.
जिवंतपणी नरकाची अनुभूती देणारे हे चित्र आहे १९४३ साली बंगालमधे पडलेल्या भीषण दुष्काळाचे, ज्याचे ‘द ग्रेट बंगाल फेमिन’ असे नामकरण आधुनिक भारताच्या इतिहासकारांनी केले आहे. हा तोच दुष्काळ आहे ज्यामुळे बंगालमधील तब्बल ४० लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याकाळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते, बंगाल प्रांत हा आकाराने विशाल होता.
सध्याच्या बांग्लादेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या विशालकाय प्रदेशाला बंगाल प्रांत म्हटले जात होते. तब्बल ६ कोटी लोकांचे या प्रदेशात वास्तव्य होते. बंगालमधील दुष्काळाने या संपूर्ण प्रदेशाचे रूपांतर कब्रस्तानात केले होते.
१९३७ साली जपानने चीनवर आक्र*मण केल्यामुळे आशिया खंडातही दुसऱ्या महायु*द्धाला तोंड फुटले होते असे मानले जाते, पण ज्यावेळी हे घडत होते त्यावेळी भारतातील ब्रिटीश सत्तेला त्याचा सुगावा देखील लागला नव्हता. यानंतर तब्बल दोन वर्षांनी १९३९ साली जेव्हा ब्रिटनने अधिकृतपणे या यु*द्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेल्या भारतातून मोठ्या प्रमाणात सैनिकांच्या तुकड्या यु*द्धासाठी रवाना करण्यात आल्या होत्या.
एकीकडे हे यु*द्ध सुरु असताना एका मोठ्या संकटाने बंगालच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली होती. १६ ऑक्टोबर १९४२ रोजी एकीकडे यु*द्धात बॉ*म्बगोळे पडत असताना बंगालमध्ये १४२ किलोमीटरच्या वेगाने एक वादळ येऊन धडकले. हे वादळ इतके विनाशकारी होते की त्यामुळे तब्बल ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक बेघर झाले. या वादळामुळे बंगालच्या पिकांची देखील मोठ्या प्रमाणत नासाडी झाली. यावेळी कोणाला वाटले देखील नव्हते की हे वादळ त्याच्यासोबत दुःख आणि पीडेचे काळे ढग देखील बरोबर घेऊन आले आहे.
या वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेच पण जी पिके वाचली त्यांच्यावर कीड पडली. त्याकाळी सत्ताधीश असलेल्या ब्रिटिशांना याची पूर्ण कल्पना होती की यामुळे बंगालच्या लोकांच्या खाण्यापिण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्या महायु*द्धावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. ब्रिटिशांनी सैनिकांसाठी अन्नधान्याची खरेदी वाढवली. १९४०-४१ या काळात त्यांनी सैनिकांसाठी ८८ टन गहू विकत घेतला.
१९४१-४२ साली हे प्रमाण त्यांनी २,३८,००० टन इतके वाढवले. वादळामुळे पिकाला कीड लागल्यामुळे धान्य उत्पादनात घट होऊ लागली. पण यावर काहीच उपाययोजना ब्रिटिश सरकारने केली नाही.
१९४३ च्या मे-जून महिन्यापर्यंत धान्याची कमतरता भासू लागली आणि बंगालमधील परिस्थिती चिघळत गेली. त्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विस्टन चर्चिल होते. चर्चिल हा एक भारतद्वेष्टा पंतप्रधान होता, तो महात्मा गांधींना अर्धनग्न फकीर म्हणायचा. ज्यावेळी बंगालमधील अन्न धान्याच्या तुटवड्याची बातमी भारतमंत्री लिओ अमेरी यांनी त्याच्या कानावर घातली आणि लॉर्ड वेव्हेल यांनी तत्काळ धान्य पाठवण्याची याचना केली, त्यावेळी चर्चिलने निष्ठुरपणे ती याचिका फेटाळून लावली.
यानंतर भारतातून बंगालच्या विदारक परिस्थितीवर एक पत्र चर्चिलला लिहिण्यात आले, यात दुष्काळामुळे लोक मारतायत असा उल्लेख करण्यात आला होता.
पण चर्चिलने याला प्रतिक्रिया देताना म्हटले, “जर बंगालमध्ये एवढा दुष्काळ आहे तर गांधी अजून मेला का नाही?”
चर्चिलच्या या वाक्यामुळे सर्वत्र गदारोळ उडाला. ज्यावेळी बंगालमध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळी भारतातून तब्बल ७० हजार टन खाद्यान्न ब्रिटनला रवाना करण्यात आले होते, यापैकी काही जहाजे परत पाठवा अशी याचना चर्चिलला करण्यात आली, पण वातावरण खराब असल्याचे कारण देऊन त्याने जहाज परत पाठविण्यास नकार दिला.
बंगालमधील दुष्काळावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मदत केली आणि गहू रवाना केला पण ब्रिटिश सरकारने तो गहू परस्पर दुसऱ्या महायु*द्धात लढणाऱ्या आपल्या सैनिकांना पाठवला. बंगालमध्ये म्यानमारमधून तांदूळ आयात करण्यात येत होता. पण दुसऱ्या महायु*द्धावेळी जपानने ब्रिटिशांच्या ताब्यातून म्यानमार खेचून घेतले आणि तिथून भारतात होणारी तांदळाची निर्यात थांबवली, आता गहू आणि तांदूळ ही दोन्ही धान्ये लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग कठीण होऊन बसला होता. या काळात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठेबाजी केली, ब्रिटिश सरकारला यावर देखील निर्बंध लावता आले नाहीत.
दुष्काळ आणि धान्याच्या तुटवड्याने लोकांना गवत खाण्यास भाग पाडले. भुकेने व्याकुळ होऊन मरण्यापेक्षा लोकांना ट्रेनच्या समोर उडी मारून जीव देणे अधिक सोपे वाटू लागले. बंगालमध्ये परिस्थिती इतकी चिघळली होती की लोकांकडे त्यांच्या मृत परिजनांचे अंत्यसंस्कार पार पाडण्याची ताकद देखील उरली नव्हती.
महिलांमध्ये आपल्या लहानग्या पोटच्या लेकरांना डोळ्यासमोर मरताना पाहण्याची ताकद नसल्यामुळे त्यांनी मुलांना विहिरीत ढकलून दिले होते. जागोजागी प्रेतांचा खच पडला होता.
१९४३ मध्ये दुष्काळ पडला आणि १९४४ च्या सुरुवातीच्या महिन्यात बंगालचे रूपांतर स्मशानभूमीत झाले होते, असंख्य लोकांनी यावेळी स्थलांतर केले होते. १९४४ मध्ये मात्र परमेश्वर कृपेने चांगला पाऊस झाला आणि बंगालमधील लोकांना खायला अन्न मिळाले. बंगालमधील जनजीवन पूर्वपदावर आले तरी त्या दुष्काळाच्या आठवणींनी लोकांच्या मनाचा एक कोपरा कायमचा क्षतिग्रस्त केला होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.