आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अंतराळयात्रा म्हणजे प्रत्येकाचं लहाणपणी असलेलं स्वप्न. आकाशातील ताऱ्यांच्या जगात रमण्याची मजा काही औरच. पण या ताऱ्यांच्या दुनियेत जाऊन राहण्याचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईलच असं नाही.
असंच ताऱ्यांच्या दुनियेत जगण्याचं स्वप्न प्रत्यक्षपणे अनुभवणारे एकमेव पुर्णत: भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती म्हणजे श्री. राकेश शर्मा.
श्री. राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबमधील पटीयाला येथे झाला. १९८४ साली अंतराळात जाऊन इतिहास रचवणाऱ्या राकेश शर्मानी त्या अगोदर भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून काम केलं आहे.
कल्पना चावला, सुनिता विलियम्स या अंतराळविरांनीही अंतराळात यात्रा केली असली तरी त्यांना अमेरिकी नागरिकत्व असल्यामुळे अजूनही राकेश शर्मा हेच एकमेव भारतीय अंतराळवीर आहेत.
हवाई दलात काम करत असताना आपल्याला आयुष्य बदलून टाकणारी अशी काही संधी मिळेल असा विचार स्वप्नातही केला नव्हता असं ते आजही आश्चर्याने आणि तेवढ्याच अभिमानाने सांगतात.
१९८४ मध्ये रशियन सोवियतच्या सोयुज टी-११ या अंतराळयानात गेलेल्या राकेश शर्मा यांनी अंतराळात ७ दिवस, २१ तास आणि ४० मिनीट वास्तव्य केले. त्यांच्या बरोबर सोवियत युनियनचे आणखी दोन अंतराळवीर युरी मैलिशेव, गेनाडी स्ट्रेकलोव हेसुध्दा होते. ३ एप्रिल १९८४ ते ११ एप्रिल १९८४ या वेळेत राकेश शर्मा अवकाशात राहीले.
या अंतराळयात्रेनंतर राकेश शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. भारत सरकारने त्यांना अशोक चक्र देऊन सन्मानित केले. तसेच सोवियत युनियनने त्यांना ‘हिरो ऑफ़ सोवियत युनियन’ या पुरस्काराने सन्मानित केले. सोवियत युनियनचे विभाजन होण्याअगोदर हा पुरस्कार तेथील सरकार कडून दिला जात असे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर राकेश शर्मा हिरो म्हणून प्रसिद्ध झाले.
एका वर्तमानपत्रास दिलेल्या मुलाखतीत भारत अंतराळातून कसा दिसतो या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितले की त्यांना हाच प्रश्न तत्कालीन पंतप्रधान मा. इंदिरा गांधी यांनी विचारला होता, ज्याचं उत्तर त्यांनी “सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा” असं दिलं होतं.
सूर्योदय आणि सुर्यास्त या दोन गोष्टी अंतराळातून अनुभवणे त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे असं ते सांगतात. शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये काढलेले ते ७ दिवस त्यांच्यासाठी एक अद्भुत असा अनुभव होता असंसुद्धा ते आवर्जून सांगतात.
८० च्या दशकाच्या सुरवातीस सोवियत युनियन एक अंतराळयान अवकाशात पाठविण्याची तयारी करत होता. सोवियतकडून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे दोन भारतीय अंतराळवीरांना पाठविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाचा स्वीकार करत इंदिरा गांधी यांनी राकेश शर्मा आणि रविश मल्होत्रा या दोन अंतराळवीरांना पाठविण्याचा निर्णय घेतला. रविश मल्होत्रा यांना अतिरिक्त म्हणून ठेवण्यात आले. त्यांना अंतराळ यात्रेसाठी पाठविण्यात आले नव्हते.
भारतीय अवकाश संशोधनात झालेल्या उत्तुंग प्रगतीबद्दल बोलताना राकेश शर्मा म्हणतात, “अवकाशात माणूस पाठविण्यास आज भारत पूर्णतः तयार आहे. यामध्ये फक्त संशोधक नसून एका सामान्य नागरिकालासुध्दा सहभागी होण्याची संधी मिळणार आहे”.
आज ३ दशकं उलटून गेली असली तरी स्वत:च्या अंतराळ यात्रेसाठी असलेली उत्सुकता पहिल्या भारतीय मानव अंतराळ योजनेच्या बाबतीत ही तशीच राकेश शर्मा यांच्यामध्ये आहे.
देशहितामध्येच स्वहित शोधणाऱ्या मुठभर मंडळींमध्ये राकेश शर्मा यांचं नाव आजही अग्रक्रमाने घेतलं जातं ते त्यांच्या असाधारण आणि अतुलनीय कार्याचा गौरवच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.