आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोरोनाच्या वेगाने पसरत जाणाऱ्या संसर्गाला आळा घालण्यासाठी २०२०च्या मार्चमधे लॉकडाऊनचा पर्याय अवलंबण्यात आला होता. यावेळी टीव्ही मालिकांचे चित्रीकरणही बंद असल्याने दूरदर्शनवरून ९०च्या दशकातील जुन्या मालिका पुन्हा प्रसारित केल्या गेल्या. यातील सगळ्यात गाजलेल्या मालिका होत्या रामायण आणि महाभारत. या मालिकांनी लोकांना जुन्या आठवणीत नेले. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरी बसून या मालिका चांगल्याच लक्ष देऊन बघितल्या.
तुम्हीही या मालिकांचे पुनःप्रसारण बघितले असेलच पण तुमच्या हे लक्षात आले का की रामायण, महाभारत, कृष्ण या मालिकांमध्ये एका व्यक्तीने कितीतरी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत? या प्रत्येक भूमिकेतील त्या अभिनेत्याचा अभिनय इतका जबरदस्त आहे की कुणालाही पटणार नाही या भूमिका एकाच व्यक्तीने केल्या आहेत. त्या अभिनेत्याचे नाव आहे, अस्लम खान.
रामायण भारतीयांच्या अपार श्रद्धेचा विषय आहे. लॉकडाऊनच्या काळातही लोकांनी ही मालिका सश्रद्ध मनाने आणि अगदी बारकाव्यांसह पहिली तेव्हा त्यांना अनेक भूमिकेत दिसणारा हा एकच कलाकार कोण याची उत्सुकता लागून राहिली. त्यातच अस्लम खान यांच्या मुलाने जैगमने सोशल मिडीयावर आपल्या वडिलांच्या अनेक रूपातील फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना त्याने लिहिले होते,
“रामानंद सागर यांच्या रामायण या एकाच सिरीयलमधील माझ्या वडिलांच्या विविध भूमिका. दूरदर्शनवरून रामायण ही मलिक पुन:प्रसारित केली जाते याबद्दल मला खूपच अभिमान वाटत आहे. या मालिकेत माझ्या वडिलांनी, अस्लम खान यांनी अनेक सहाय्यक भूमिका केल्या आहेत. रामायणच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार.”
खरे तर जैगम खान यांच्या या पोस्टनंतर लोकांनी रामायणातील विविध भूमिकांतील अस्लम खान यांच्याकडे बारकाईने लक्ष देण्यास सुरूवात केली.
रामानंद सागरद्वारा निर्मित रामायण या मालिकेत अस्लम खान यांनी कधी ऋषी, कधी गुप्तचर, कधी राक्षस तर कधी वानर अशा अनेक भूमिका केल्या आहेत. याशिवायही शिपायापासून ते गावकऱ्यांपर्यंत त्यांनी अनेक छोट्या-छोट्या भूमिकाही केल्या आहेत. अस्लम खान यांचे अभिनय कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. खुद्द रामानंद सागरही त्यांच्या अभिनयाचे चाहते होते.
रामायण दुसऱ्यांदा प्रसारित होऊ लागल्यावर प्रेक्षकांनीही त्यांच्या अभिनयाची भरपूर स्तुती केली. पहिल्यांदा जेव्हा रामायण प्रसारित झाले तेव्हा कदाचित एकाच व्यक्तीने केलेल्या या विविध भूमिकांची नोंद प्रेक्षकांनी घेतली नसेल पण यावेळी मात्र प्रेक्षकांनी अस्लम यांच्यावर अगदी बारीक नजर ठेवून रामायण मालिका पहिली.
इतक्या विविध भूमिकांतील त्यांचा सहज वावर पाहून प्रेक्षकही अवाक झाले. लॉकडाऊनमधील हे रामायणाचे पुन:प्रसारण अस्लम खान यांच्यासाठी तरी खूपच फायद्याचे ठरले, पण त्यांनी २००२ मध्येच टेलिव्हिजन क्षेत्रातून निवृत्ती घेतली आहे.
रामायण सोडून इतरही अनेक मालिकांत त्यांनी काम केले आहे. विक्रम वेताळ, कृष्ण, अलिफ लैला या ९० च्या दशकातील गाजलेल्या मालिका. या मालिकातही त्यांनी काम केलेले आहे.
‘ये हवाएं’ही त्यांची शेवटची मालिका. या मालिकेत त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. त्यांच्या या भूमिकेचीही लोकांनी खूप स्तुती केली होती.
आज सोशल मिडियामुळे अस्लम खान यांच्यातील या कलागुणाची मोठ्या प्रमाणात दाखल घेतली जात आहे. ते जेव्हा टेलीव्हिजन क्षेत्रात काम करत होते तेव्हा जर त्यांच्या कामाची आणि त्यांची अशी चर्चा झाली असती तर त्यांना या क्षेत्रात भरपूर प्रसिद्धी मिळाली असती आणि काम करण्याच्या आणखी वेगवेगळ्या संधीही मिळाल्या असत्या.
आज अस्लम खान यांनी या क्षेत्रातून निवृत्ती घेतली आहे आणि ते आपल्या मूळ गावी झांसीला परत गेले आहेत. तिथे ते आज मार्केटिंगचे काम करत आहेत. फेसबुकवरून त्यांचे मिम्स व्हायरल होत आहेत. त्यांच्या फोटोंना भरपूर लाईक मिळत आहेत, हे सगळे पाहून त्यांना खरोखर खूप आनंद झाला. लोकांचे हे प्रेम माझ्या उमेदीच्या काळात मिळाले असते तर मी आणखीन उत्साहाने काम केले असते असेही ते म्हणतात. शेवटी त्याकाळी सोशल मिडिया आणि इंटरनेट नव्हते मग लोकांचे हे प्रेम कळणार तरी कसे.
अस्लम खान हे मुळचे उत्तरप्रदेशमधील. त्यांचे आईवडील कामाच्या शोधात मुंबईत आले आणि इथेच स्थाईक झाले, त्यामुळे अस्लम खान मुंबईतच लहानाचे मोठे झाले. एकदा ते त्यांच्या शेजाऱ्यांसोबत स्टेज शो पाहायला गेले होते. तेव्हा त्यांनाही वाटले की आपणही अभिनय करू शकतो. मग त्यांची ओळख रामानंद सागर यांच्याशी झाली. रामानंद सागर यांनी त्याकाळात अनेक प्रसिद्ध मालिकांची निर्मिती केली. या सगळ्या मालिका आजही प्रेक्षकांचा पसंतीस उतरतात.
रामानंद सागर यांच्याकडे ऑडीशन दिल्यानंतर त्यांनी अस्लम खान यांना सुरुवातीला ‘विक्रम वेताळ’ या मालिकेमध्ये काम दिले. त्यानंतर रामायण आणि महाभारत या दोन्ही मालिकांमध्ये त्यांना काम मिळाले.
२००२ साली त्यांनी टेलीव्हिजन क्षेत्राला राम राम ठोकला आणि मुंबई सोडून कायमचे आपल्या गावी परत गेले. अस्लम खान यांनी तिकडे जाऊन मार्केटिंगचे काम सुरु केले. आज त्यांचे कुटुंब सुस्थितीत आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. संपूर्ण कुटुंबालाच आज अस्लम खान यांच्या कामाबद्दल अभिमान वाटतो. त्यांच्या मुलाने तर सोशल मिडियावरून हा आनंद साजरा केला. त्यांचे सगळे नातेवाईकही आज त्यांच्यावर बनणाऱ्या वेगवेगळ्या मिम्सची चर्चा करतात आणि त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीचे त्यांच्या कामाचे कौतुक करतात.
उशिरा का होईना पण प्रेक्षकांची दाद त्यांच्यापर्यंत पोहोचली याबद्दल त्यांना खूपच कृतकृत्य झाल्यासारखे वाटत असेल.
कदाचित त्यांना इतकी प्रसिद्धी आणि प्रेम मिळण्याची अपेक्षाच नव्हती, पण लॉकडाऊनमुळे अस्लम खान आज पुन्हा एकदा घरोघरी पोहोचले. तेव्हाही घरोघरी पोहोचले होते, पण त्याची कुणी दाखल घेतली नव्हती. आज इतक्या वर्षांनंतर लोकं दखल घेत आहेत, ही निश्चितच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
अस्लम खान लोकांच्या मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाने आणि त्यांच्या प्रेमाने भारावून गेले. आपल्यातील कलागुणाची, कष्टाची उशिरा का होईना नोंद घेतली, याचेच त्यांना अमाप कौतुक वाटत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.