आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या कोरोनाच्या जीवघेण्या आजाराने जगभरात जे थैमान घातलं आहे ते तर आपण पाहतोच आहेत. आजाराबरोबर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी असणाऱ्या उपाययोजना सुद्धा आल्याच. मग त्यात मास्कस् असतील सॅनिटायझर असेल किंवा मग डिसइन्फेक्शन टनेल्स असतील.
भारताच्या कित्येक राज्यांत सुरक्षा उपाययोजनांमध्ये समावेश असणाऱ्या डिसइन्फेक्शन टनेल्सचा सार्वजनिक ठिकाणी वापर होतो आहे.
आता काही दिवसांत ताळेबंदी उठल्यावर सगळं सुरळीत चालू होईल, कोरोनाची साथ जरी कमी झाली तरी हा रोग पूर्णपणे लवकर संपेलच असं नाही. तेव्हा सर्वांच्या सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणी डिसइन्फेक्शन टनेल्स बसवण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या डिसइन्फेक्शन टनेल्समधून जावं लागणार आहे. काही ठिकाणी तर याचा वापर फार आधीपासूनच चालु सुद्धा झाला आहे.
पण प्रश्न हा आहे की हे टनेल्स खरंच किटाणूला मारतात? या टनेल्सच्या वापरामुळे मानवी शरीरावर काही दुष्परिणाम होतो का?
तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, दिल्ली यांसारख्या राज्यात वापरले जाणारे डिसइन्फेक्शन टनेल्स शेतीबाजार, पोलीस ठाणे तसेच अजूनही सार्वजनिक ठिकाणी वापरले जात आहेत.
जेव्हा व्यक्ती या टनेलमधे प्रवेश करतो तेव्हा त्याच्यावर सोडियम हायपोक्लोराईडचा स्प्रे मारला जातो. हायपोक्लोराईड हे जंतूंच्या प्रतिबंधासाठी उपयोगी केमिकल असून ते संपूर्ण किटाणूंना नष्ट करतं असे दावे करण्यात आले आहेत. हे एक कमर्शिअल केमिकल आहे जे ब्लिचिंग, क्लीनिंग यासाठी वापरण्यात येतं.
जलतरण तलावात किंवा सांडपाणी शुध्दीकरणकेंद्रात या केमिकलचा प्रामुख्याने वापर केला जातो. ०.५% w/v या प्रमाणात हे केमिकल जखमेवर जंतुनाशक म्हणून वापरलं जातं. बऱ्याच देशात १ ते ५% w/v या प्रमाणात वापर करण्यात येतो पण भारतात तरी अजून एवढ्या प्रमाणात वापर केल्याची माहिती प्राप्त नाही.
हे डिसइन्फेक्शन टनेल्स वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. आकारानुसार त्यांच्या किमती ठरत जातात.
अगदी बेसिक टनेलची किंमत दहा हजार इतकी आहे तर इतर सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेले डिसइन्फेक्शन टनेल्स पंचवीस लाखांपर्यंत सुद्धा उपलब्ध आहेत.
आउटलुक या नियतकालिकाचा रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की आपल्या महाराष्ट्रात भुसावळ इथे बसवण्यात आलेले डिसइन्फेक्शन टनेल हे दहा हजार रुपये इतक्या किमतीचे असून त्याची ५०० लिटरची साठवण क्षमता आहे. हे टनेल न थांबता १५ तासांपर्यंत फवारा मारू शकतं.
या डिसइन्फेक्शन टनेल्सबाबत संशयित स्थिती पाहायला मिळत आहे. द हिंदूने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये असं वाचायला मिळतं की मेडिकल रिसर्च संस्था असलेल्या पीजीआईएमईआर या संस्थेचे कोविड १९ बचाव विभाग प्रमुख डॉ. जे येस ठाकूर यांनी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती सांगितली. त्यात ते म्हणतात हे केमिकल जंतुनाशक पृष्ठभाग साफ करण्यासाठी आहेत, मानवी शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही, तसेच या केमिकलमुळे लोकांना त्रास होऊ शकतो.
पंजाबच्या आरोग्य विभागाने या टनेल्सचा राज्यात वापर न करण्याचा सूचना राज्यात दिल्या आहेत.
डायव्हर्सि या स्वच्छतेच्याबाबतीत जगात अग्रगण्य असणाऱ्या संस्थेने असं म्हटलं आहे की आपल्या कपड्यांवर किंवा शरीरावर जर एखादा विषाणू असेल तर तो या टनेल्समधून केल्या जाणाऱ्या फवाऱ्याने नष्ट होईलच असे नाही. तसेच एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाचा विषाणू असेल तर तिथे या टनेलचा काहीच उपयोग होणार नाही. त्याचं कारण विषाणू हा शरीराच्या आत असणार आणि तिथे स्प्रे होत नाही. तर हा जंतू त्या व्यक्तीच्या थुंकीत/लाळेत नक्कीच राहीलं.
या केमिकलच्या फवाऱ्याने श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तसेच डोळे, त्वचा यासारख्या अवयवांना खाजेचा त्रास होऊ शकतो. त्याबरोबरच या केमिकलमुळे फुफ्फुसांना सुद्धा त्रास होऊन श्वसनचा गंभीर आजार होऊ शकतो.
दुसरीकडे पाहायचं झालं तर असंही होऊ शकतं की या टनेलमधून एखादा निरोगी व्यक्ती गेल्यानंतर टनेलच्या दुष्परिणामामुळे निरोगी व्यक्तीमध्ये सुद्धा खोकला, शिंका यांसारखे कोरोनाचे लक्षणं दिसू शकतात.
या डिसइन्फेक्शन टनेलचा वापर आपल्याला सुरक्षित ठेवणार की नाही हे तर येणारा काळच सांगेल!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.