आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सध्याच्या काळात विज्ञान, तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही मानवाला अद्याप त्सुनामी, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीचे पूर्वानुमान काढण्याचे अचूक तंत्र विकसित करता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. प्राणी आणि पक्ष्यांमध्ये अशा संकटाची आधीच जाणीव करून देणारी क्षमता आहे हे मात्र नोंदी आणि अनुभवामुळे सिद्ध झालेले आहे. नैसर्गिक आपत्तीचा आघात होण्यापूर्वी प्राण्यांना या संकटाची चाहूल लागते. त्यामुळे त्यांच्या वर्तनात ठळक बदल दिसून येतात आणि बहुतेक वेळा प्राणी, पक्षी या संकटात आपला जीव वाचविण्यात यशस्वी ठरतात, असे आढळून आले आहे. अर्थात, आतापर्यंत अनेक संशोधन प्रकल्प राबवूनही प्राण्यांच्या संकटाची चाहूल लागण्याच्या संवेदनेचा उपयोग करून त्याचे पूर्वानुमान काढण्याच्या मानवी प्रयत्नांना यश आलेले नाही.
हिंद महासागराच्या तळाशी २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या भूकंपामुळे अभूतपूर्व त्सुनामी उसळली. त्यामध्ये आशिया आणि पूर्व आफ्रिकेतील हजारो लोकांचा बळी गेला. या त्सुनामीने निसर्गापुढे मानव हतबलच असल्याची जाणीव जणू निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवून करून दिली. उल्लेखनीय बाब ही आहे की, या सर्व विनाशकाळामध्ये श्रीलंकेच्या ‘याला नॅशनल पार्क’मधील वन्यजीव अधिकार्यांनी, या संकटातही प्राणी मोठ्या संख्येने मरण पावले नसल्याचे निरीक्षण नोंदविले.
‘याला नॅशनल पार्क’ हे शेकडो वन्य प्राण्यांचे निवासस्थान आहे. सरपटणारे प्राणी, उभयचर आणि सस्तन प्राण्यांच्या विविध प्रजातींचा या ठिकाणी अधिवास आहे. त्यामध्ये हत्ती, बिबट्या आणि माकडे यांचे प्रमाण उल्लेखनीय आहे.
संशोधकांचा असा विश्वास आहे की, नैसर्गिक संकटाची चाहूल माणसाच्या खूप आधी प्राण्यांना होते. अर्थात प्राण्यांना भूकंप कसे जाणवू शकतात हे स्पष्ट करणारा कोणताही निर्णायक पुरावा अद्याप मिळालेला नाही. ‘याला नॅशनल पार्क’मधील प्राणी चाहूल संकटाची चाहूल लागल्याने त्सुनामी येण्यापूर्वीच उंच ठिकाणी जाऊन पोहोचले आणि त्यांचे जीव वाचविले.
प्राण्यांना संकटाची पूर्वकल्पना बऱ्याच आधी मिळते यावर संशोधकांचे एकमत असले तरीही प्राण्यांना आगामी संकटाची चाहूल नेमकी कशी लागते याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही संशोधकांच्या मते प्राण्यांची संवेदनक्षमता मानवापेक्षा अधिक असल्याने त्यांना भूगर्भातील स्पंदनांची जाणीव होते आणि त्यामुळे संकटाची चाहूल लागते. दुसऱ्या एका मताप्रमाणे प्राण्यांना वातावरणात होणाऱ्या बदलांची जाणीव होते. पृथ्वीवरून नैसर्गिक संकटांपूर्वी उत्सर्जित होणारा विशिष्ट वायू त्यांना जाणवतो आणि त्यांना संकटाचा अंदाज येतो.
प्राण्यांच्या भूकंप आणि नैसर्गिक आपत्तींचा वेध घेण्याच्या क्षमतेचा माणसाला ही संकटे टाळण्यासाठी किंवा होणारे नुकसान कमी करण्यासाठी कितपत उपयोग करता येईल याबाबत संशोधक साशंक आहेत. काही जणांच्या मते संकटाची चाहूल लागल्यानंतर प्राण्यांच्या वर्तनात काही ठळक बदल दिसून येतात. ‘ट्रॅकिंगसारख्या यंत्रणांचा वापर करून हे बदल टिपता येतील आणि संकटाबाबत पूर्वानुमान बांधणे शक्य होईल. मात्र, नैसर्गिक आपत्तीची चाहूल लागल्यावर प्राण्यांच्या वर्तनात बदल होतो ही वस्तुस्थिती असली आणि अनेकदा ती अधिकृतपणे नोंदविण्यात आली असली तरीही असे बदल अन्य अनेक कारणांनीही दिसून येतात. प्रत्येक वेळी या बदलांचा संबंध नैसर्गिक संकटांशी लावणे योग्य ठरणार नाही, असे संशोधक लक्षात आणून देतात.
अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हे या शासकीय संस्थेने स्पष्ट केले आहे की, प्राण्यांच्या वर्तनातील बदलांवरून नैसर्गिक संकटाचे पूर्वानुमान काढणे शक्य नाही. मात्र, जगभरातील संशोधक प्राण्यांचे वर्तन आणि नैसर्गिक आपत्ती यांचा सखोल अभ्यास करत आहेत. या अभ्यासांमुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तीचा वेळीच अंदाज येण्यास मदत होईल अशी आशा आहे.
इटलीमध्ये सन २००९ मध्ये झालेल्या भूकंपापूर्वी आपत्तीग्रस्त भागातील बेडकांनी आपली पिल्ले जन्म घालण्यासाठी निवडलेली स्थळे बदलून ते दुसरीकडे निघून गेले. भूकंपाचे धक्के बसून गेल्यानंतरही अनेक दिवस ते या ठिकाणी फिरकले नाहीत. संशोधकांच्या मते बेडकांना या ठिकाणाच्या वातावरणात विद्युतीयचुंबकीय क्षेत्रातील बदल बेडकांना जाणवले असतील अथवा भूकंपाच्या अगोदर रेडीओ लहरी उत्सर्जित करणाऱ्या वातावरणातील स्तरामध्ये (आयनोस्फियर) बदल झाल्याने यातून रेडॉन वायू सोडला गेल्याचे त्यांना जाणवले असेल आणि त्यांना संकटाची चाहूल लागली असेल.
सिसिलीमधील एटना पर्वतावर सन २०१२ मध्ये शेळ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना असे आढळून आले की, ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या काही तास आधी शेळ्या घाबरल्या आणि दूर पळून गेल्या. भूगर्भातील हादरे किंवा वेगळ्या प्रकारच्या वायूचे हवेतील उत्सर्जन याचिचोल शेळ्यांना लागली असावी आणि त्यामुळे त्यांनी ज्वालामुखी उद्रेकाचा अंदाज बांधला असावा. मात्र, शेळ्या केवळ ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळीच घाबरून पळून गेल्या. छोट्या-मोठ्या भूकंपाच्या वेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, हे देखील संशोधकांना आढळून आले.
आगामी काळ हा नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत आव्हानात्मक असणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जगभरात नैसर्गिक आपत्तींमध्ये भरच पडणार असल्याचा इशारा संशोधक वारंवार देत आहेत. आताही अवकाळी पाऊस, शेकडो हेक्टर क्षेत्रात पटणारे वणवे, चाकरी वादळे, महापूर, दुष्काळ एभरावाशी ऋतुमान या सवरपात आपण त्याचे चटके भोगत आहोत. या संकटांमध्ये भरच पडत गेली तर मानवी अस्तित्वासमोरच आव्हान उभे राहणार आहे.
नैसर्गिक आपत्ती टाळणे मानवाच्या आवाक्यात नसले तरी त्याची पूर्वसूचना मिळाल्यास त्यापासून कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणे शक्य होईल. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अशी पूर्वसूचना मिळविण्यात अद्याप यश आले नसले तरी सेन्सर्स, ट्रॅकर्ससारख्या यंत्रणांचा वापर करून प्राण्यांच्या वर्तणुकीचा सातत्याने आढावा घेणे आणि त्याचे विश्लेषण करून आगामी संकटांचा मागोवा घेणे शक्य व्हावे, यासाठी जगभरातील संशोधकांचे नेटाने प्रयत्न सुरू आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.