आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. काही ना काही कारणांमुळे ते सतत चर्चेतही असतात. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. या मालिका विजयात नवोदित क्रिकेटपटूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामुळे खुश होऊन उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी स्वतःच्या खात्यातून शार्दुल ठाकूर, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि टी. नटराजन या क्रिकेटपटूंना महिंद्रा थार ही एसयुव्ही गाडी भेट दिली होती.
आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा चर्चेत आले आहेत. गेल्या आठवड्यात ‘फादर्स डे’निमित्त महिंद्रा यांनी ट्विट करून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला होता. याच पोस्टमधून त्यांनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ व ‘अमेरिकन जीप’ ब्रँडशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला होता.
आपल्या ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो १९६०चा आहे. त्यावेळी आनंद यांचे वडील हरीश महिंद्रा अमेरिकेला निघाले होते. अमेरिकेतील अग्रगण्य जीप उत्पादक असलेल्या कैसर कुटुंबानं हरिश महिंद्रा यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं.
असं काय कारण होतं, की अमेरिकेतल्या अग्रगण्य जीप उत्पादकांनी महिंद्रांना निमंत्रण दिलं. महिंद्रा अँड महिंद्रा १९४७ पासून भारतात जीपची निर्मिती करत होती. या उत्पादनासाठी ते विलिस-ओव्हरलँड या अमेरिकन जीप कंपनीचा परवाना वापरत होते. कालांतरानं कैसर कुटुंबाने विलिस-ओव्हरलँड हा जीपचा ब्रँड आपल्या ताब्यात घेतला. मात्र, त्यांनी महिंद्रांसोबतचा करार रद्द न करता सुरू ठेवला. खूप कमी लोकांना याबाबत माहिती असेल.
एक अमेरिकन कंपनी आणि महिंद्रा यांचा एकत्र प्रवास कसा सुरू झाला याबाबत आपण जाणून घेऊया.
जेव्हा संपूर्ण देश ब्रिटिशांच्या ताब्यातून स्वतंत्र होण्यासाठी लढत होता; त्यावेळीच मुंबईत दोन भावांनी मिळून जीप उद्योगाचा पाया घातला. त्यांनी ‘विलीस जीप’ या अमेरिकन कंपनीच्या जीप बनवण्याचा उद्योग सुरू केला होता. जे.सी. महिंद्रा आणि के.सी. महिंद्रा यांना विश्वास होता की, देशातील तरुणांना वाहतुकीची नवीन साधनं मिळाली तर आपली प्रगती नक्कीच होईल. त्यामुळे त्यांनी मुंबईत विलिस जीपची बांधणी करण्यासाठी अमेरिकन कंपनीसोबत करार केला.
भारतातील खडबडीत आणि आडवळणाच्या रस्त्यांवर तग धरणारी वाहनं तयार करण्याचा त्यांचा विचार होता. ‘एम अँण्ड एम’चा प्रवास स्टील उद्योगापासून सुरू झाला होता. सुरुवातीला कंपनीचं नाव ‘मुहम्मद अँण्ड महिंद्रा’ असं होतं. महिंद्रा बंधू आणि मलिक गुलाम मुहम्मद यांनी एकत्र येत लुधियानामध्ये स्टीलचा उद्योग सुरू केला होता.
१९४७ ला फाळणीनंतर मुहम्मद पाकिस्तानला निघून गेले. त्यानंतर १९४८ मध्ये के. सी. महिंद्रा यांनी कंपनीचं नाव बदलून ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ केलं, आणि विलीसच्या मदतीनं त्यांनी जीप उत्पादन सुरू ठेवलं.
मिशिगनमधील कैसर मोटर्स आणि ओहायोमधील जॉन नॉर्थ विलीस यांच्या ‘विलिस ओव्हरलँड’ या दोन कंपन्यांनी दुसऱ्या महायुद्धात सैन्याला जीप पुरवल्या होत्या. पुढे कैसर यांनी संपूर्ण कंपनीचा मालकी हक्क विकत घेतला. याच कंपनीचा परवाना महिंद्रा यांनी मिळाला होता.
महिंद्रा अँण्ड महिंद्राचे संस्थापक के.सी. महिंद्रा हे १३ वर्षे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांच्या नेतृत्वात ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ने औद्योगिक क्षेत्रात स्वतःचे पाय रोवले. कंपनीनं अनेक उद्योगांमध्ये प्रवेश केला. के. सी. यांचा मुलगा केशूब महिंद्रा १९४८ मध्ये कंपनीमध्ये दाखल झाला व १९६३ मध्ये त्याने कंपनीच्या कार्यकारी अधिकारी पदाची धुरा हातात घेतली.
त्यावेळी भारतामध्ये कंपन्यांना अनेक बंधनं होती. कंपन्यांनी कशाचं आणि किती उत्पादन घ्यावं यासाठी देखील परवाने घ्यावे लागत. महिंद्रांनी मात्र, प्रवाहाच्या विरुद्ध जात आपला प्रवास सुरू ठेवला. देशात हरित क्रांती झाल्यानंतर भविष्याचा विचार करत १९६०मध्ये त्यांनी ट्रॅक्टर निर्मितीच्या उद्योगात प्रवेश केला. त्यानंतर कित्येक वर्षे देशात ट्रॅक्टर म्हटलं की महिंद्रा हे समीकरणच झालं होतं. महिंद्रांच्या दूरदृष्टीपणाचं हे एक छोटंसं उदाहरण.
पुढे १९८१ मध्ये जे.सी. महिंद्रांचे नातू आणि हरीश महिंद्राचा यांचे पुत्र आनंद जे. महिंद्रा हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधून मॅनेजमेंटची पदवी घेऊन भारतात परतले. ते महिंद्रा युजिन स्टील कंपनी (मस्को) मध्ये वित्त संचालकांचे कार्यकारी सहाय्यक म्हणून रुजू झाले. नव्या दमाच्या आनंद महिंद्रांनी आपल्या नवीन कल्पनांसह कंपनीला आणखी उंचीवर पोहचवलं.
आनंद यांच्या नेतृत्त्वाखाली कंपनीनं रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटीसारख्या नव्या व्यवसायात पाऊल ठेवलं. १९९१ मध्ये त्यांची महिंद्रा अँण्ड महिंद्राच्या उप-व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्त झाली. पुढे भारतानं मुक्त व्यापाराचं धोरण स्विकारलं. त्यानंतर महिंद्रांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि ग्रामीण वित्त क्षेत्रात प्रवेश केला. एप्रिल १९९७मध्ये आनंद महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाले.
२०१६ पर्यंत विलिस व महिंद्रा एकत्रपणे भारतात जीपचं उत्पादन घेत होते. मात्र, २०१६ला या अमेरिकन ऑटोमोबाईल ब्रँडनं ‘रँगलर’ आणि ‘ग्रँड चेरोकी’ या मॉडेल्ससह थेट भारतीय बाजारात प्रवेश केला.
असं असले तरी, महिंद्राला त्याचा फारसा फटका बसला नाही. गेल्या काही दशकांपासून महिंद्रांनी जीप निर्मिती उद्योगात मोठं नाव कमावलं आहे. फक्त जीपचं नाही तर आलिशान एसयुव्ही गाड्यांची निर्मिती करून जागतिक स्तरावर त्यांनी कौतुक मिळवलं आहे. त्यांच्या नवनवीन कल्पना या कंपनीला वेळोवेळी फायदा मिळवून देत आहेत. तसेच, इतर कंपन्यांच्या संचालकांच्या तुलनेत महिंद्रा हे ट्विटरवर जास्त अॅक्टिव्ह असल्यामुळे लोकांचा कल सध्या कशाकडे आहे याचा थेट अंदाज त्यांना बांधता येतो. एकूणच मोठ्या पदावर राहूनही तळागळातील लोकांशी कसं जोडलेलं रहायचं हे आनंद महिंद्रा यांच्याकडूनच शिकायला हवं!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.