आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आईस्क्रीम… अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा एक गारेगार पदार्थ. आईस्क्रीम एकदाही खाल्लं नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. घशाला त्रास जरी होत असला, तरी आईस्क्रीम खाणारी माणसंही बरीच असतात. पूर्वी फक्त उन्हाळ्याच्या दिवसांतच खाल्लं जाणारं आईस्क्रीम आता वर्षभरात कधीही खाल्लं जातं.
एखादी चांगली गोष्ट झाली असेल किंवा एखादी चांगली बातमी मिळालेली असेल किंवा एखाद्याचा राग घालवायचा असेल तरीसुद्धा आईस्क्रीम हे निमित्त पुरेसं होतं बऱ्याचदा. व्हॅनिला, बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे त्याचे निरनिराळे फ्लेवर्स हे आपल्याला नेहमीच आवडतात. लहान मुलं अन् आईस्क्रीम यांचं अतूट नातं तर आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. फक्त आईस्क्रीम म्हटलं तरी मुलं किती खुश होतात ते आपण पाहतोच. आईस्क्रीम तसा तर सगळ्यांचा असला तरी लहान मुलांचा खास जिव्हाळ्याचाच विषय.
आताच्या महागाईच्या जमान्यात प्रत्येक वस्तूची दरवाढ ही ठरलेली. दरवर्षी जेव्हा बजेट सादर होतं तेव्हा आपल्याला कळतं की, यावर्षी काय स्वस्त आणि काय महाग होणार. पेट्रोलची दरवाढ तर आपण कायमच अनुभवत असतोच. शिवाय दूध, तेल, साखर वगैरे वस्तूंच्या किमतीसुद्धा वाढत असताना आपण पाहिल्या आहेत. वेगवेगळे खाद्यपदार्थही थोड्याफार फरकाने महाग होतच असतात.
एकदा अशीच एका आईस्क्रीमची किंमत वाढली, तर लोकांनी त्यावरून त्या आईस्क्रीम कंपनीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली की कंपनीला आपल्या सर्व ग्राहकांची माफी मागणारी एक जाहिरातच प्रसिद्ध करावी लागली.
ही कंपनी आहे उगवत्या सूर्याच्या देशात अर्थात जपानमधली. जपानमधल्या अकागी न्यूग्यो नावाच्या या कंपनीच्या अनेक आईस्क्रीम उत्पादनांपैकी एक आहे गारीगारीकुन लॉलीज. लहान मुलांमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं आईस्क्रीम. या आईस्क्रीमची किंमत आधी होती ६० येन (जपान देशाचं चलन) जी १० येननी वाढून ७० येन झाली. एका बाजूला महागाई वेगाने वाढत असताना ‘अकागी न्यूग्यो’ने आपल्या उत्पादनांचे दर जवळपास २५ वर्षं तसेच स्थिर ठेवले होते.
कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, आईस्क्रीम स्टिक्सकरता अधिक चांगल्या प्रतीचं लाकूड वापरणं या सर्व गोष्टींमुळे परिणामी आईस्क्रीमची किंमत वाढवण्यात आली. पण हे करताना देशामधील लोकांच्या भावनांना विचारात घेऊन कंपनीने त्या लोकांची माफी मागण्यासाठी एक जाहिरातीचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
व्हिडिओमध्ये सुरवातीला कंपनीचे कर्मचारी एकामागोमाग रांगेत हात दुमडून उभे राहिलेत असं दिसतं. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला जपानचं स्थानिक लोकसंगीत ऐकू येतं. नंतर अधिकारी पुढे येऊन खिन्नपणे मान झुकवून उभे राहतात. त्याचवेळी इतर कर्मचाऱ्यांच्या मानाही झुकतात. पडद्यावर जपानी भाषेतील एक संदेश दिसू लागतो की, गेली २५ वर्षं आम्ही थांबलो परंतु ६०→७०.
अकागी न्यूग्यो कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीच्या समोरच ही एका मिनिटाची जाहिरात चित्रीत करण्यात आली होती. कंपनीच्या प्रमुख ग्राहक वर्गाला अर्थात लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून या जाहिरातीची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळेच या जाहिरातीत एक लहान मुलगाही दिसतो.
जेव्हा ही जाहिरात प्रसिद्ध झाली, तेव्हा ती प्रचंड लोकप्रिय झाली. युट्यूबवर त्या व्हिडिओला तब्बल ९ लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले. कंपनीचे इतरही काही फ्लेवर्स जसे स्पॅगेटी, पोटॅटो स्ट्यू आणि त्यांचा सर्वाधिक विकला गेलेला फ्लेवर ब्यूलॉन-हेवी कॉर्न पॉटीज या फ्लेवर्सच्या किमती वाढवायच्या तयारीत कंपनी होती. पण त्यावेळी केवळ गारीगारीकुन या एकाच फ्लेवरची किंमत वाढवली गेली. या जाहिरातीला इतका प्रतिसाद मिळेल अशी आमची अपेक्षा नव्हती, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं.
तसं तर जपानसारख्या देशात २५ वर्षांनी एखाद्या वस्तूची किंमत थोडीशी वाढणं यात विशेष असं काही नाही. परंतु जपानमध्ये वस्तूंच्या घटत चाललेल्या किमती ही जपानच्या सरकारसाठी एकप्रकारची समस्याच बनली आहे. जपानी अर्थव्यवस्थेची सदोष रचना हेही एक कारण आहेच.
तिथले लोक हे वस्तू खरेदी करण्यापेक्षा आपल्याकडील पैशाची बचत करण्यावरती जास्त भर देतात. त्यामुळे मग देशाच्या अर्थव्यवस्थेला कमी हातभार लागतो. साहजिकच तिथल्या उद्योगधंद्यांचा आवाकाही मर्यादित झालाय. सरकारला सर्व वस्तूंचे दर उतरवावे लागलेत. इतकंच काय, सरकारने तिथं कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावरील करदेखील रद्द केला आहे, कारण पैसा खर्च व्हायचं प्रमाणच कमी झालेलं आहे.
अकागी न्यूग्योचं गारीगारीकुन हे आईस्क्रीम मुळात लहान मुलांना त्यांच्या पॉकेटमनीमधूनच विकत घेता येईल, या दृष्टीनेच त्याची किंमत निश्चित करण्यात आली होती. आणि हेच कारण होतं, की त्यात वाढ करण्याचा निर्णय कंपनी सहजपणे घेऊ शकत नव्हती. कारण तसं केलं असतं तर त्याचा ग्राहकवर्ग कमी होण्याचा धोका संभावित होता.
जर मोठ्या माणसांकडेच पैसे कमी असले, तर लहान मुलांना तरी जास्त कुठून मिळणार! पण तरीही अखेर कंपनीने ही जोखीम उचलली व आपल्या आईस्क्रीमच्या किमतीत वाढ केलीच.
हे सगळं वाचून झाल्यावर आता कदाचित तुमच्याही मनात एक विचार आला असेल की, अशी परिस्थिती जर आपल्या भारतामध्ये निर्माण झाली असती, तर काय झालं असतं. मुळात भारत आणि जपान या देशांच्यामध्ये असलेले फरक आधी जाणून घेणं यासाठी महत्वाचं ठरेल. लोकसंख्येच्या बाबतीत भारत जपानच्या दसपट पुढे आहे. त्यात आणखी गरीब-श्रीमंत विभाजन, एवढ्या प्रचंड प्रमाणात असलेल्या लोकसंख्येतील खरेदी करण्याची क्षमता असलेल्या तसंच नसलेल्या लोकांचं प्रमाण अशा बऱ्याच गोष्टींमुळे फरक पडतो.
लोकांची मानसिकता जर पहायची म्हटली, तर भारतीयांचा कल हा खर्च करण्याकडेच दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठीसुद्धा बऱ्याच प्रमाणात पैसे आपल्याकडे खर्च होतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागत जातो. जपानमध्ये नेमका याच गोष्टीचा अभाव आहे. आणखी एक म्हणजे, जपानमध्ये सरकार असो वा उद्योग ते प्रामुख्याने तिथल्या जनतेचा विचार करतात. जपानी संस्कृतीमध्येच हा गुण ठासून भरलेला दिसून येतो. त्यामुळेच अकागी न्यूग्यो कंपनीने आपली दरवाढ करताना लोकभावना विचारात घेऊन सर्व जनतेची क्षमा मागणं यात तिथल्या लोकांसाठी तसं विशेष काही नसावं. आपल्याकडे मात्र ‘नोटबंदी’सारखी अतिमहत्त्वाची घोषणाही अचानकपणे जनतेचा कोणताही विचार न करता केली जाते, त्यावेळेस काय घडतं ते आपण पाहिलंच आहे. हा निर्णय फसल्याचं सरकारला नंतर मान्य करावंही लागलं.
असो, पण तरीही एखाद्या कंपनीने कोणत्याही कारणाने का असेना, पण आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्याबद्दल लोकांची माफी मागणं हे तसं विशेषच म्हणावं लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.