आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
भारत ही त्यांची मातृभूमी नव्हती. तरीही त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. स्वातंत्र्यानंतरही भारत सोडून न जाता भारताच्या हिमालयीन डोंगर-दऱ्यातील पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीयांनी या दोन ब्रिटीश महिलांच्या कार्याबद्दल कायम त्यांचे स्मरण केले पाहिजे. स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्याचा आढावा घेतल्यास सामुदायिक एकता आणि समर्पणाची अटळ भावना आपल्याला आवक करून जाते.
देशाची सेवा करण्याची दृढ इच्छा, त्यासाठी त्याग करण्याची तयारी शिवाय वसाहतवादी ब्रिटीश शक्तींसोबत लढण्यासाठी आवश्यक असणारे नैतिक बळ या सर्वांच्या एकत्रित परिणामातून लाखो भारतीय एकत्र आले. महात्मा गांधींनी लाखो देशवासियांमध्ये देशसेवेची प्रबळ इच्छा जागृत केली. महात्मा गांधींच्या विचारांनी आणि जीवनशैलीने अनेकांना प्रभवित केले. त्यांनी एक आवाहन केल्यास लाखो-करोडो लोकांचा जनसमुदाय ब्रिटिशांविरोधात आंदोलन करण्यास उद्युक्त होत असे.
भारतीयांवर महात्मा गांधींचा जसा प्रभाव होता तसाच देशाबाहेरील व्यक्तींवर देखील होताच. अशाच दोन ब्रिटीश स्त्रिया त्याकाळी गांधी विचारांनी प्रेरित झाल्या होत्या. गांधीच्या विचारांवर चालण्यासाठी त्यांनी आपली मातृभूमी सोडली आणि त्या कायमच्या भारतात वास्तव्याला आल्या. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तर भाग घेतलाच पण भारताच्या पर्यावरणासाठी, निसर्गसमृद्ध वैभव जपण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. आपल्या कामातून त्यांनी आपला वारसा मागे ठेवला आहे.
या दोन्हीपैकी एक होती. मेडेलिन स्लेड, जी ब्रिटनच्या सरदार घराण्यात जन्माला आलेली. तिचे वडील एक नौदलीय अधिकारी होते, ज्यांना समाजात भरपूर मानसन्मान होता. दुसरी होती कॅथरीन मेरी हैल्मन. तिचे वडील जर्मन सैन्यात होते. पहिल्या महायुद्धात त्यांना कैद झाली होती. गांधींशी झालेल्या पहिल्या भेटीच त्यांच्यावर एक अमीट ठसा उमटला. गांधींच्या अकाली मृत्युनंतरही या दोघींनी आयुष्यभर गांधी विचारांचा वारसा जागवला.
रोमेन पोलार्ड या नोबेल विजेत्या फ्रेंच लेखकाने गांधींचे चरित्र लिहिले. या चरित्रात त्याने गांधींना ख्रिस्ताचा दुसरा अवतार मानले. या पुस्तकातूनच गांधी आणि मेडेलिनची पहिली भेट झाली. यानंतर तिने श्रीमद्भगवद्गीता आणि ऋग्वेदाचे वाचन केले. गांधींच्या “यंग इंडिया” या साप्ताहिकाचे देखील ती नियमित वाचन करायची.
नंतर ती गांधींच्या साबरमती आश्रमात वास्तव्याला आली. इथे तिचे नाव मीराबेन असे ठेवण्यात आले.
गांधींची आणि तिची प्रत्यक्ष भेट १९२५मध्ये झाली.
“गांधीना जमिनीवर त्याच्या गादीवर बसले होते. त्यांच्या दिशेने प्रकाशाचा एक किरण येत असल्याचे मला जाणवले. तो किरण मला दिसत नव्हता पण, मी त्याची अनुभूती घेऊ शकत होते. माझ्या डोळ्यांच्या माघारीही त्या प्रकाशाचे अस्तित्व मला जाणवत होते” या शब्दात तिने गांधींच्या आणि तिच्या पहिल्या भेटीचे वर्णन केले आहे.
ती भारतात आली तेंव्हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा लाभली होती. गांधीजी जेव्हा १९३१ साली प्रसिद्ध राउंड टेबल कॉन्फरन्ससाठी लंडनला गेले तेंव्हा त्यांच्यासोबत गेलेल्या मोजक्या लोकांमध्ये ती देखील होती.
तर, कॅथरीन आणि गांधी यांची पहिली भेट ही संयुक्त राज्याच्या विद्यार्थ्यांच्या एका गटासोबत असताना झाली. गांधींच्या विचाराने प्रभावित झालेली कॅथरीन १९३२ साली ब्रिटन सोडून भारतात आली. भारतात येताच सुरुवातीला तिने उदयपुर येथील विद्याभवन शाळेत नोकरी सुरु केली.
गांधींच्या आत्मनिर्भर आणि अहिंसा ही मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने ही शाळा चालवली जात होती.
या शाळेत दोन वर्षे काम केल्यानंतर महाराष्ट्रातील वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गांधींशी तिची पहिली भेट झाली. आठ वर्षे ती याच आश्रमात राहिली. इथे तिला “सरलाबेन” या भारतीय नावाने ओळखले जाऊ लागले.
स्त्री-सबलीकरण आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी गांधीनी “नई तालीम” नावाने काही मुलभूत शिक्षण सुरु केले. या मूल्यांच्या प्रसारासाठी तिने काम सुरु केले. वर्धा येथील असह्य उष्णता आणि मलेरियाची लागण झाल्याने तिने वर्धा सोडले व उत्तराखंडच्या कुमाऊच्या हिमालयीन पर्वतराजीतील एका गावात कायमचे स्थलांतर केले.
गांधींच्या सत्य आणि अहिंसा या तत्वांचा खोलवर प्रभाव असणाऱ्या या महिलांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला. १९४२च्या “चले जाव” आंदोलनात सहभाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास देखील भोगला.
मीराबेन जगभर प्रवास करून जगभरातील मोठमोठ्या नेत्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याला समर्थन करण्याचे आवाहन करत होती. अमेरीकेचे अध्यक्ष फ्रँकलीन रूझवेल्ट यांची देखील तिने भेट घेतली. जगभरातील नेत्यांचे समर्थन मिळवण्यासाठी तिने देशोदेशींचा प्रवास केला.
तर, सरलाबेन कुमाऊ प्रांतातील स्थानिक गावकऱ्यांचे ब्रिटीश विरोधात संघटन करत होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोघींनी देखील गांधींच्या विचारांचा वारसा जपत स्थानिक समुदायांना मदत करण्याचे काम केले.
१९४४ साली मीराबेनची नजरकैदेतून सुटका झाली. तिने रुरकी येथे स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या जमिनीवर किसान आश्रम सुरु केला. हृषीकेशजवळ तिने पशुलोक आश्रमाची स्थापना केली.
सध्याच्या उत्तराखंडमधील भिलांगण परिसरात बापू आश्रम आणि गोपाल आश्रम नावाने दोन आश्रम सुरु केले. दोघींनाही हिमालयाच्या कुशीतच आयुष्याचा उरलेला काळ व्यतीत केला.
या आश्रमातून मीराबेनने शाश्वत दुग्धव्यवसाय आणि शेतीचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी स्वतंत्र भारतात पर्यावरणाच्या रक्षणाकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचेही तिच्या लक्षात आले. विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या नद्यांवर जी धरणे बांधली जात होती, त्यामुळे आजुबाजूच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम दिसून येत होता.
शिक्षित आणि पैशामागे धावणाऱ्या आजच्या पिढीला पृथ्वीची होत असलेली हेळसांड आणि आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक मुलभूत घटकांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. संधी मिळेल तेंव्हा निसर्गाच्या योजनेत माणूस हस्तक्षेप करतो आणि व्यत्यय आणतो. विज्ञान आणि यंत्राच्या सहाय्याने त्याला प्रचंड परतावा मिळत असला तरी, याच मार्गाने एक दिवस त्याचे अस्तित्व धोक्यात येणार आहे.
आपल्याला निसर्गातील समतोलाचा अभ्यास केला पाहिजे. निरोगी आणि नैतिक प्रजाती बनून जगायचे असल्यास आपल्याला निसर्गाचे नियम आत्मसात केले पाहिजेत, असे तिने १९४९ साली लिहिलेल्या एका निबंधात म्हटले आहे.
सरलाबेन यांनी कौसानी येथे १९४६ साली कस्तुरबा महिला उत्थान मंडळ सुरु केले. स्थानिक स्त्रियांना सबळ बनवणे हा या आश्रमाचा उद्देश होता. या भागातील महिलांमध्ये धाडस असले तरी त्या पितृसत्ताक व्यवस्थेला शरण गेल्या असल्याचे सरलाबेन यांनी ओळखले. या जोखडातून मुक्त करून त्यांच्यात आत्मभान जगवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.
सरलाबेन या स्त्रियांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण देत असे. गांधींच्या “नई तालीम”मधील मुल्यांची शिकवण दिली. जंगलाच्या संवर्धनासाठी “चिपको चळवळ”सारख्या चळवळीची सुरुवात केली. खाणकामामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागृती निर्माण केली.
दोघींनीही पर्यावरणाच्या रक्षणासाठी चळवळी उभ्या केल्या. हिमालयातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेशाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला. सरलाबेन आणि मिराबेनसारख्या महिलांचा वारसा आजही पर्यावरणविषयक आंदोलनातून दिसून येतो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.