आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आज भारतात अनेक उद्योगधंद्यांची रेलचेल दिसून येते. अगदी छोटीशी सुई बनवण्यापासून ते अवकाशात कृत्रिम उपग्रह पाठवण्यापर्यंत आणि विविध पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्यापर्यंत भारताने आश्चर्यकारक प्रगती केली आहे. आज अन्नधन्यापासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या उत्पादनात आज भारत स्वयंपूर्ण बनला आहे.
सामान्य माणसालाही व्यापार-उदीम आणि उद्योगाचे महत्व समजले आहे. आजचे अनेक तरुण स्टार्टअपद्वारे आर्थिक विकासाच्या नवनव्या संधी शोधत आहेत. त्यांच्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत आहेत. भारत सरकार देखील तरुणांच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी नवनव्या योजना जाहीर करून त्यांना प्रोत्साहन देत आहे.
पण, ब्रिटिशांच्या अंमलाखालील भारतात अशाप्रकारे स्वतःचे उद्योग साम्राज्य उभे करण्याचे स्वप्न पाहणे आणि ते अंमलात आणणे इतकं सोपं होतं काय? तरीही, जमशेद टाटा नावाच्या पारसी तरुणाने हे शक्य करून दाखवले.
आज मिठापासून चहापर्यंत आणि स्टीलपासून ते कार-ट्रकसारख्या चारचाकी वाहनांपर्यंत आणि वित्तपुरवठ्यापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तू, सेवा वापरतो त्यात टाटाचे उत्पादन हमखास असतंच. संपूर्ण देशभर आज टाटा उद्योगसमूहाचे जाळं पसरलं आहे. नुसता आपला देशच नाही तर, देशापल्याडदेखील उद्योग जगतात टाटा समूहानं देशाचं नाव उज्वल केलं आहे.
टाटा समूहाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या उद्योगातील मध्यवर्ती विचारसरणी.
टाटा समूहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव करून दिली जाते की, “आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामान्य भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहोत.”
या महाकाय उद्योग जगताचा पाया जमशेदजी टाटा यांनी घातला. म्हणूनच त्यांना भारतीय उद्योग जगताचं जनक म्हटलं जातं.
गुजरातच्या नौसरी भागात ३ मार्च १८३९ रोजी जमशेदजी टाटा यांचा जन्म झाला. जमशेदजींचे वडील नुसरवानजी टाटा गावातच छोटेखानी व्यापार करायचे. इंग्रजांनी व्यापाराच्या दृष्टीने मुंबई बंदराचा विकास करून नवे शहर वसवण्यास सुरुवात केली तेंव्हा नुसरवानजी यांनी नौसरीहून मुंबईला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. यावेळी जमशेदजी यांचे प्राथमिक शिक्षण नौसारीमध्येच सुरु होते.
नुसरवानजी एक उत्तम व्यापारी होते. मुंबई येण्याआधी गुजरातमध्ये त्यांचा निर्यातीचा व्यापार होता. व्यापाराच्या क्षेत्रात पश्चिमी देशांमध्ये तेव्हा तीव्र चढाओढ सुरु होती. नुसरवानजी अफिमचा व्यापार करत होते. विशेष म्हणजे त्याकाळी अफिमच्या व्यापाराला कायदेशीर परवानगी होती. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना वेदनेचा विसर पाडण्यासाठी अफिमचा वापर केला जात असे.
वयाच्या १३व्या वर्षी उच्च शिक्षणासाठी मुंबईत आले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अभ्यासात त्यांना चांगली गती होती. एल्फिन्स्टनमधून त्यांनी टॉप करत त्यांनी पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी वडिलांच्या व्यवसायातच मदत केली. १८५९मध्ये त्याच्या वडिलांनी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी जमशेदजींना हॉंगकॉंगला पाठवले.
देशाच्या बाहेरही आपले उद्योगविश्व वाढवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पुढचे चार वर्षे जमशेदजी हॉंगकॉंगमध्येच राहिले. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी हॉंगकॉंगमध्ये टाटाच्या कामाची सुरुवात केली. हॉंगकॉंग पाठोपाठ चीन आणि जपानमध्ये देखील जमशेदजींनी आपल्या उद्योगाचा विस्तार केला.
आशियामध्ये जमशेदजींना उद्योगाच्या बाबतीत चांगले यश मिळाले असले युरोपात मात्र त्यांना सुरुवातीला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही. मात्र, व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने त्यांनी चीन, जपान, अमेरिका, युरोप इंग्लंड या देशांचे दौरे केले. तेथील उद्योगजगताचा चांगला अभ्यास केला.
जमशेदजींची पदवी पूर्ण झाली त्यावेळी भारतात ब्रिटीश विरोधी लढ्याला सुरुवात झाली होती. हा काळ प्रचंड संघर्षाचा होता. ब्रिटिशांनी १८५७चे बंद दडपून टाकले होते. मात्र ब्रिटीश विरोधी विद्रोहाची हीच सुरुवात होती. देशभर सर्वत्र अनागोंदी असताना टाटांनी आपल्या व्यापाराला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.
१८६८ साली जमशेदजींनी स्वतःची कंपनी सुरु केली. तोपर्यंत ते आपल्या वडिलांसोबतच काम करत होते. युरोपच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कापडाच्या व्यापारातील फायदा जवळून बघितला. त्यानंतर १८९६मध्ये भारतात आल्यावर त्यांनी चिंचपोकळी येथील एक दिवाळखोरीत निघालेली एक तेल मिल विकत घेतली आणि तिचे रुपांतर कॉटन मिलमध्ये केले. या मिलमधून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले.
जसा मिलमधून चांगला नफा मिळू लागला तशी त्यांनी ती मिल विकून टाकली. मिल विकून मिळालेल्या पैशातून त्यांनी नागपूरला नवी मिल चालू केली. या मिलमधूनही त्यांना प्रचंड फायदा झाला. पुढे याच मिलचे एम्प्रेस मिल असे नामकरण करण्यात आले.
यानंतर जमशेदजींनी चार नव्या कल्पना अंमलात आणल्या.
यामध्ये एक होती स्टील कंपनीची, दुसरी जागतिक दर्जाचे हॉटेल, तिसरे शैक्षणिक संस्था आणि चौथे जलविद्युत निर्मिती. या चारही योजना जर यशस्वी झाल्या तर भारत लवकरच आत्मनिर्भर देश बनेल असा त्यांचा कयास होता.
अर्थात, यातील हॉटेल ताजचं स्वप्न त्यांच्याच हयातीत पूर्ण झालं. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा येथे हॉटेल ताजचं उद्घाटन केलं. पोलाद उद्योगात उतरण्याचं त्यांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी १८८२ साली कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मयुरगंज येथे लोखंड आणि कोळशाचे साठे आढळले होते. म्हणून त्याच ठिकाणी पोलाद कारखाना सुरु करण्याचा त्याच्या मनसुबा होता. त्याकाळी पोलाद निर्मितीसाठी त्यांनी २ कोटी ३२ लाख रुपयांचं भांडवल उभं केलं होतं.
पण, त्यांच्या इतर कल्पना पुढील पिढीने प्रत्यक्षात उतरवल्या. या चार कल्पनांमुळेच टाटा ग्रुप ऑफ कंपनीजची स्वतःची ओळख निर्माण झाली. या कंपनीच्या स्थापनेनंतर देशात मोटारी, ट्रक, इत्यादी अवजड साहित्यांची निर्मिती करणे शक्य झाले.
१९०० साली ते व्यापाराच्या निमित्ताने जर्मन दौऱ्यावर असताना आजारी पडले. यानंतर त्यांचे प्रकृती स्वास्थ्य खालावतच गेले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहेम येथे त्यांचे निधन झाले. इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.