आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
९० च्या दशकात चेन्नईत एकच भीतीचं वातावरण पसरलं होतं. तरुण मुली बेपत्ता होऊ लागल्या होत्या. १९८७ ते १९८८ या कालावधीत तिरुवनमियुर सेक्शनमधून तब्बल ८ ते ९ मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं.
या सगळ्याच्या मागे एक विक्षिप्त माणूस होता. त्याचं नाव होतं ऑटो शंकर.
ऑटो शंकरचं मूळ नाव होतं गौरी शंकर पण तो रिक्षा चालवत असल्याने त्याला ऑटो शंकर या नावाने ओळखलं जातं असे.
चेन्नई शहरातल्या या ऑटो शंकरच्या नावावर नऊपेक्षा जास्त खुणांची नोंद आहे. तो मुलींचे अपहरण करायचा, त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि नंतर मारुन टाकायचा.
मुलीचे अपहरण करणे, तिच्यावर जबरदस्ती करणे, तिला विकणे, हे सगळं त्या मुलीचा जीव जाईपर्यंत किंवा यांची वासना शमेपर्यंत चालायचं. आणि नंतर त्या मुलीला जाळलं जायचं किंवा कुठेतरी दरीत फेकून दिलं जातं असे.
सुरवातीला या घटनेच्या प्राथमिक चौकशीवरून असा अंदाज काढला गेला की गरीब लोकांनी मुलीच्या लग्नात हुंडा देता येणार नाही म्हणून त्यांना सोडून दिलं असावं. पण हे प्रकरण काहीसं वेगळंच होतं. यात पोलिसांना अपहरणकर्त्यांना आणि पीडितांना शोधण्यात अपयशच येत होतं.
पुढे १९८८ च्या डिसेंबरमध्ये दारूच्या दुकानासमोरून जात असलेल्या एका मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या प्रयत्नात अपहरणकर्त्यांना अपयश आलं आणि सुब्बलक्ष्मी नावाची ती मुलगी त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. इथून सुटल्यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.
जेव्हा तिने तक्रार दिली तेव्हा हे प्रकरण इतकं गंभीर आहे हे स्थानिक पोलिसांच्या लक्षात आलं आणि यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांच्यापुढे नाव आलं. ऑटो शंकर.
ऑटो शंकरची दहशतच इतकी होती की त्याच्या नावानेच लोकं भयभीत होतं असायचे. तो ज्या पद्धतीने गुन्हे करायचा ते अगदी चित्रपटात दाखवतात तसं असायचं. माथेफिरू असणारा शंकर लोकांना अतिशय क्रूर पद्धतीने मारायचा. मग कधी तो लोकांना भिंतीत जिवंत पुरायचा तर कधी जिवंत पेटवून द्यायचा.
चेन्नईच्या इतिहासात अशी घटना या आधी कधीच घडली नव्हती. पण जेव्हा ऑटो शंकरच्या गॅंगकडून हा सगळा प्रकार चालू झाला तेव्हा पूर्ण चेन्नई या घटनेने हादरून गेली.
१९५५ मध्ये जवळच्या खेड्यात जन्म झालेला गौरी शंकर उदरनिर्वाहासाठी चेन्नईच्या पेरियारनगरमध्ये येऊन राहायला लागला. त्याची सुरवात एक चित्रकार म्हणून झाली होती पण कालांतराने त्याने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तो तिरुवनमियुर ते मालमापुरम या भागात बेकायदेशीररित्या व्यवसाय करत होता.
याचवेळी त्याला चित्रपटांचा छंद जडला. त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले. यानंतर तो महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेऊ लागला. हे काम करताना महिलांकडून आले पैसे स्वतः घेऊन तो त्यांना कामाला लावत असे. इतकंच नाही तर तो आपल्या रिक्षातूनच वेश्या व दारूची वाहतूक करण्यास सुरुवात केली.
हे सगळं करताना त्याला कुठेच अडथळा आला नाही. तो करत असलेला बेकायदेशीर व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच जात होता. यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्याला खात्री झाली की आपण चेन्नईत काहीही करू शकतो.
चित्रपटातील दृश्य बघूनच त्याला मुलींचे अपहरण करून त्यांना देहविक्री करायला लावण्याची कल्पना सुचली असावी. हा अंदाज वर्तविण्याचे कारण म्हणजे शंकरने कोर्टात दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे की सिनेमाने त्याला ही सगळी कृत्य करण्यास भाग पाडलं.
आपला लहान भाऊ मोहन आणि नातेवाईकांच्या तसेच मित्राच्या मदतीने शंकर लवकरच मोठा गुंड बनला होता. त्याने पेरीयार नगर आणि एल. बी. रस्त्यावर स्थानिक पोलीसांच्या सहमतीने महिलांना ठेऊन वेश्याव्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. या भागात शंकरचा १९८० पर्यंत वट होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार एक सुशिक्षित महिला होती जी ऑटो शंकरच्या विरोधात पोलीस ठाण्यात आली होती. तिला वेश्याव्यवसायातून मुक्ती हवी होती म्हणून तिने फिर्याद नोंदवलेली. यानंतर तिने पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता पण यात तिला अपयश आले. जेव्हा तिला पकडल तेव्हा तिची आणि तिच्यासोबत असलेल्या महिलेची हत्या करून तिला जाळण्यात आलं आणि जळलेले अवशेष पोत्यात भरून खाडीत टाकून दिले गेले.
शंकर याच पद्धतीने आता अपल्या विरोधात जाणाऱ्या लोकांना मारायचा यामुळेच त्याला सगळे घाबरून राहत.
डिसेंबर १९८७ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांचे निधन झाले. नंतर १९८८ ते १९८९ हा काळ चेन्नईत राजकीय दृष्टीने अतिशय खडतर होता. याकाळात तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
पोलिस शंकरला पकडण्यात अपयशी ठरले होते. या गोष्टीमुळे पीडितांच्या घरचे, राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे गेले. या घटनेनंतर राज्यपालांनी पोलिस महानिरीक्षक जफर अली यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे नवीन पथक तयार करण्यास सांगितले व तपासला गती देण्याची सूचना केली.
हे झाल्यानंतर एक पथक नियुक्त करण्यात आले, पथकात एक व्यक्ती असा होता की जो शंकरला खूप उत्तम प्रकारे ओळखत असे. या तपासात त्या एका कॉन्स्टेबलकडे असणारी माहिती कामाला आली आणि शंकरला पकडण्यात पोलिसांना यश आले.
१९८८ मध्ये त्याला पकडल्यानंतर पोलिसांनी शंकरच्या घराची झडती घेतली तेव्हा त्याच्या घरात ३ मानवी सापळे आढळून आले. या घटनेने पुन्हा परिसरात खळबळ माजली. शंकरला साथ देणारे पोलीस कर्मचारी यावेळी उघडकीस आले आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं.
नंतर शंकरला चेन्नईच्या सेंट्रल जेलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं इथून तो ऑगस्ट १९९० मध्ये बाहेर पळून आला. शोध घेतल्यानंतर शंकर ओडिसामध्ये पोलिसांच्या हाती लागला.
या वेळीसुद्धा शंकरला मदत करणाऱ्या ३ जेलरसहित ७ जणांना दोषी ठरवण्यात आलं यात शंकरचे भाऊ सुद्धा होते. या ७ जणांना गुन्हेगारी कारवाया करण्याच्या आरोपाखाली सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
शंकरला पकडून त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्याने ५ लोकांना जिवंत मारल्याची कबुली दिली. यातील पाचही लोकांचे अवशेष अत्यंत क्रूर पद्धतीने नष्ट करण्यात आले होते. काहींना जाळलं होतं तर काहींना पुरून टाकण्यात आलं होतं.
कोर्टात सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर कोर्टाने १९८८ आणि १९८९ या दोन वर्षात केलेल्या ६ खुनांच्या गुन्ह्यात ऑटो शंकर आणि त्याच्या साथीदारांना दोषी ठरवण्यात आलं आणि प्रत्येक खुनासाठी ३ वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
शेवटी २७ एप्रिल १९९५ रोजी ऑटो शंकर याला फाशी देण्यात आली आणि चेन्नईतल्या एका सिरीयल किलरचा अंत झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.