आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ब्रिटीशांच्या जोखडातून भारताला मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक हसत-हसत फासावर चढले. शहीद भगतसिंग यांची कथा तर आपण सर्वजण जाणतोच. त्यांनी येणाऱ्या पिढ्यांनाही देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली.
त्यांच्या चरित्राने प्रेरित होऊन अनेक तरुण क्रांतीकार्याच्या यज्ञकुंडात उतरले. देशसेवा आणि ब्रिटिशांच्या अ*त्याचारांंपासून मुक्ती हेच अनेकांच्या आयुष्याचे ध्येय बनले.
भारताच्या गल्लीबोळातून हातात तिरंगा घेऊन देशप्रेमाची गाणी गुणगुणणारे अनेक भगतसिंग निर्माण झाले. भगतसिंग यांच्याप्रमाणेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे स्वप्न पाहणारा आणखी एक तरुण होता. ज्याला सिंधचा भगतसिंग म्हटले जाते.
देशासाठी प्राण त्याग करण्याचीसुद्धा तयारी या मुलाने दाखवली होती. इतकं की, तो लहानपणीच फासीचा दोर गळ्यात अडकवून भगतसिंगप्रमाणे फासावर लटकण्याचे स्वप्न पाहत असे.
तू असे का वागतो असे जर कुणी विचारलेच तर तो छोटा मुलगा उत्तर देई,
“मी देखील भगतसिंगप्रमाणे देशासाठी हसतहसत फासावर जाऊ इच्छितो.”
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या या क्रांतीकारकाचे नाव होते, हेमू कलानी.
अनेकदा इंग्रज अधिकाऱ्यांशी पंगा घेऊन हेमू कलानी इंग्रजांच्या निशाण्यावर आले होते. फक्त १९ वर्षांचे असतानाच इंग्रज सरकारने यांना फासावर चढवले.
सिंधच्या सख्खर प्रांतात २३ मार्च १९२३ रोजी हेमू यांचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव पेसुमल आणि आईचे नाव जेठीबाई होते. त्यांचे वडील जमीनदार घराण्यातील होते. त्यांच्याकडे अनेक विटांच्या भट्ट्या होत्या. हेमू कलानींचे संपूर्ण कुटुंबच देशभक्त होते.
लहानपणापासूनच अनेक क्रांतिकारकांच्या गोष्टी त्यांच्या कानावर पडत होत्या. या गोष्टी ऐकत ऐकतच मोठ्या झालेल्या हेमूंंच्या मनात देशभक्ती ओतप्रोत भरली होती. अगदी लहानपणापासून देशासाठी काम करण्याचा आणि वेळ पडलीच तर शहीद होण्याचा निश्चय त्यांनी केला होता.
हेमू अत्यंत बुद्धिमान आणि तल्लख होते. क्रांतिकारकांच्या गोष्टींंनी त्यांचे मन भारावून गेले होते.
गावातील प्राथमिक शाळेतून त्यांचे शिक्षण सुरु झाले. प्राथमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी सख्खरच्या टिळक हायस्कूल आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अभ्यासासोबतच खेळातही हेमुंना प्रचंड रुची होती. कॉलेजमध्ये असताना अनेक मैदानी खेळात त्यांनी प्राविण्य मिळवले.
कुस्ती खेळण्याचीही त्यांना भारी हौस होती. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि फुटबॉल अशा अनेक खेळात ते मैदान गाजवत असत. कुस्तीत तर अनेकदा त्यांनी इंग्रज पहलवानांना चीतपट केले होते.
हातात तिरंगा घेऊन हेमू गावातील गल्ल्यांमधून देशभक्तीपर गीते म्हणत फिरत असत. ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत असत.
७ वर्षांचे असतानाच त्यांनी आपल्या मित्रांसोबत एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली.
बालपणापासूनच ते शूर आणि धाडसी होते. एकदा त्यांच्या गावात काही इंग्रज अधिकारी आले. इंग्रजांना घाबरून सर्वांनी आपल्या घराचे दरवाजे खिडक्या बंद केल्या. पण, हेमू मात्र त्यांच्या समोरूनही ताठ मानेने चालत होते. त्यांचे हे अफाट धाडस पाहून लोकं आश्चर्यचकित होत असत.
ते स्वतः देशभक्तीपर गाणी रचत. या गाण्यातून त्यांना स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळत असे.
एकदा हेमूच्या वडिलांना इंग्रज शिपायांनी काही किरकोळ कारणावरून पकडून नेले. घरी येताच त्यांच्या आईने ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. त्यांनी हातात बंदूक घेतली आणि आपल्या वडिलांना सोडवून आणण्यासाठी बाहेर पडले.
या प्रसंगानंतर त्यांना देशकार्यासाठी क्रांतिकारी संघटन आवश्यक असल्याचे जाणवले. म्हणून आपल्या मित्रांसह त्यांनी स्वराज्य सेना मंडळाची स्थापना केली.
गांधींंनी जेव्हा स्वदेशी चळवळ सुरु केली तेव्हा हेमू यांनी त्यातही सक्रीय सहभाग घेतला. परदेशी कपडे एकत्र करून ते त्याची होळी करत असत. लोकांनीही परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकावा यासाठी ते लोकांना प्रेरणा देत असत.
फक्त देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणे हेच त्यांचे स्वप्न होते. आपल्या गळ्यात स्वतःहून फासीचा फंदा घालून ते शहीद क्रांतीकारकांची आठवण काढत. यातून त्यांच्या स्वप्नाला आणखी इंधन मिळत असे. इंकलाबच्या घोषणा देताना त्यांना अजूनच स्फुरण चढे.
एकदा त्यांच्या सोबतच्या काही क्रांतीकारकांना इंग्रज शिपायांनी अटक केली. तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र केले आणि इंग्रजांच्या विरोधात निदर्शने सुरु केली. पाहता पाहता सर्व शहरभर आंदोलकांची लाट उसळली. निरपराध लोकांना सोडून देण्यात यावे यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले होते.
इंग्रज अधिकाऱ्यांना तर घाम फुटला होता. पण, आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यात अनेक निरपराध लोक मारले गेले. या घटनेने तर हेमू अजूनच पेटून उठले.
त्यांनी जेलवर बॉ*म्बफेक करून आपल्या या मित्रांना सोडवण्याचा प्रयत्न केला.
इंग्रज शिपायांसोबत झालेल्या चकमकीत त्यांनी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ४० शिपायांना ठार केले होते. यात त्यांचे काही साथीदारही शहीद झाले.
गांधीजींंनी भारत छोडोची हाक दिली तेव्हाही हेमू या चळवळीत सहभागी झाले. त्यांनी इंग्रजांविरोधात केलेल्या कारवायांमुळे इंग्रजांनी हेमूंंना अटक करण्याची घाई झाली होती.
इंग्रजांच्या खजिने लुटणे, त्यांच्या गाड्या जाळणे, आणि निदर्शने करणे असे अनेक गुन्हे त्यांच्या नावावर नोंदवण्यात आले होते.
छोडो भारत आंदोलनामध्ये ब्रिटिशांनी गांधीजींना अटक केली. यामध्ये अब्दुल गफ्फार खान यांच्यासारखे ज्येष्ठ क्रांतिकारकही होते. या अटकेनंतर हे आंदोलन आणखी तीव्र झाले.
हेमू यांनी तर सिंध प्रांतात अगदी हाहाकार उडवून टाकला. त्यांनी अनेक ठिकाणी इंग्रजांविरोधात हिंसक कारवायांचे कटकारस्थान रचले. यापैकी अनेक कारवाया यशस्वी देखील झाल्या.
१९४२ साली इंग्रजांची एक ह*त्याराने भरलेली रेल्वे त्यांच्या प्रांतातून जाणार असल्याची खबर त्यांना लागली. ही रेल्वे उलटून टाकण्यासाठी त्यांनी रेल्वेचा रूळ उखडण्याचे नियोजन केले. काही मित्रांसमवेत ते रेल्वे रुळावर गेले आणि त्यांनी हा रूळ उखडण्यास सुरुवात केली.
इतक्यात तिथे इंग्रज शिपाई आले. त्यांना पाहताच हेमूंनी आपल्या मित्रांना पळून जाण्याच्या सल्ला दिला. ते स्वतः मात्र इंग्रज शिपायांच्या हाती लागले. इंग्रजांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्याविरोधात खटला सुरु केला.
इंग्रजांनी तुरुंगात त्याच्या अनन्वित छळ केला. पण, हेमुंनी आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगण्यास नकार दिला.
शेवटी वयाच्या १९व्या वर्षी इंग्रज सरकरने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.
त्यांना झालेल्या या शिक्षेने संपूर्ण देश पेटून उठला. मात्र ही शिक्षा जाहीर होताच हेमूंचे डोळे आनंदाने लकाकले. शेवटी बालपणापासून देशासाठी शहीद होण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याची वेळ जवळ आली होती.
२३ जानेवारी १९४३ रोजी या महान क्रांतीकारकाला फासावर लटकवण्यात आले.
अशा भारतमातेच्या अनेक वीरांच्या बलिदानामुळे आपल्याला इंग्रजांच्या जाचातून मुक्ती मिळाली. त्या सगळ्यांना, त्यांच्या देशभक्तीला, शौर्याला मानाचा मुजरा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








