आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
‘खडूस’ म्हणून ६०च्या दशकातील क्रीडा प्रेमींना परिचित असलेले डावखुरे गोलंदाज आणि माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे जानेवारी २०२० मध्ये वयाच्या ८६व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समाज माध्यमांवर श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पाठोपाठ सचिन तेंडूलकर, राजदीप सरदेसाई, रवी शास्त्री आणि अनेक क्रिकेट रसिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण ६० च्या दशकात अनेक फलंदाजाना घाम गाळायला लावणाऱ्या या गोलंदाजाची कथा आजच्या पिढीतल्या फार कमी लोकांना माहिती आहे.
रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी हे काही सामान्य क्रिकेटपटू नव्हते. त्या काळात ज्यावेळी कसोटी क्रिकेटचे सामने भराभर संपायचे आणि कुठलाही कसोटी क्रिकेट सामना हा पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत चालत अशा वेळी बापू नाडकर्णी यांचा इकोनॉमी रेट ४१ कसोटी सामन्यांच्या पाठी फक्त १.६७ इतकाच होता.
जेव्हा १९५० आणि १९६० च्या काळात ते क्रिकेट खेळत होते. त्यावेळी प्रति षटक चार रन हा रेट मिळवायला दशकं शिल्लक होती, अशा काळात त्यांनी २००० बॉलमध्ये क्रिकेटच्या इतिहासातील चौथा सर्वोत्तम इकोनॉमी रेट टिकवला होता. जो निश्चितच सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता.
भारतीय क्रिकेट नियमन मंडळ अर्थात बीसीसीआयने नाडकर्णींना श्रद्धांजलीस्वरूप प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील नाडकर्णी यांनी खूप चांगली कामगिरी बजावली होती.
१०,००० बॉल्सच्या पाठी त्यांचा इकोनॉमी रेट हा केवळ १.६४ इतकाच होता. जो आजच्या काळात देखील कुठल्या गोलंदाजाला मिळवणे कठीण आहे.
नाडकर्णी हे फारच किफायतशीर गोलंदाज होते. हा त्यांचा क्रिकेटपटू म्हणून सर्वोत्तम गुण होता. त्यांच्या नावावर ८८ कसोटी विकेट्स आणि १४१९ धावांचा रेकॉर्ड आहे. सोबतच एका कसोटीतले शतक देखील त्यांच्या नावावर आहे. याचा अर्थ नुसते गोलंदाज म्हणून नव्हे तर फलंदाज म्हणून पण त्यांची चांगली खेळी होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स आणि ८,८०० रन त्यांच्या नावावर आहे. त्यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सरासरी ही ४०.३६ इतकी आहे.
२१ निर्धाव षटकांचा पराक्रम
१९६०-६१ साली पाकिस्तानविरोधातल्या एका मालिकेत त्यांनी रेकॉर्ड केला होता. कानपूर येथील सामन्यात त्यांची आकडेवारी ३४-२४-२३-०, दिल्लीतील सामन्यात ३४-२४-२४-१ अशी आकडेवारी होती. पण चेन्नईतील इंग्लंडविरोधात झालेल्या सामन्यात त्यांनी कमाल केली, या सामन्यात त्यांची आकडेवारी ही आश्चर्यकारक होती.
२१ निर्धाव षटकांच्या बरोबर ३२-२७-५-० अशी आकडेवारी त्यांची होती, हा एक विक्रम होता. त्यांच्या या विक्रमाला आज सहा षटकांच्या मर्यादेत पण कुठलाही गोलंदाज पोहचू शकलेला नाही.
त्यांना श्रद्धांजली म्हणून अनेकांनी केलेल्या फेसबुक पोस्ट्समध्ये त्यांच्या या अचाट कामगिरीचा उल्लेख आवर्जून करण्यात आलेला आहे.
नाडकर्णी हे १९६७-६८ पर्यंत खेळत होते. भारताच्या इंग्लंड दौऱ्यातून काढल्यानंतर त्यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी पुन्हा बोलवण्यात आले होते. या दौऱ्यात वेलिंग्टन येथील कसोटी सामन्यात त्यांनी फक्त ४३ धावा देत ६ गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. बिशन सिंह बेदी हे डावखुरे गोलंदाज म्हणून उदयास येत होते म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेतली. पुढे त्यांनी निवृत्ती घेतली. काही काळ त्यांनी भारतीय क्रिकेट नियमन मंडळात भारताच्या राष्ट्रीय संघाच्या निवड समितीत आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचा पदाधिकारी म्हणून भूमिका देखील बजावली.
खडूस क्रिकेटपटू
खडूस या शब्दाचा अर्थ जरी रागीट असा असला तरी मुंबई क्रिकेट संघात याचा अर्थ वेगळा होतो. रणजी क्रिकेटमध्ये आपल्या क्रीजला चिटकून अजरामर कामगिरी करणाऱ्या काही निवडक क्रिकेटपटूंना संबोधण्यासाठी हा शब्द वापरला जात होता. नाडकर्णी हे त्या बिरुदावलीचे खरे मानकरी असल्याची भावना अनेक माजी क्रिकेटपटूंनी बोलून दाखवली होती. त्यांनी जरी आपल्या करीअरमधील बहुतांश काळ महाराष्ट्राच्या संघासाठी खेळण्यात घालवला असला आणि त्यांना फार कमी कालावधीसाठी मुंबई संघासाठी खेळायला मिळाला असून देखील त्यांनी खडूस या किताबाचा मान पटकावला होता.
सुनील गावस्कर आणि मिलिंद रेगे या दोन माजी भारतीय खेळाडूंनी एका क्रिकेट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या ‘खडूस’ बिरुदावलीचा इतिहास नाडकर्णी यांच्याशिवाय अपूर्ण आहे, असे उद्गार काढले आहेत. त्यांना जरी खडूस ही बिरुदावली मिळाली असली तरी त्यांचा स्वभाव हा अत्यंत विनम्र होता. त्यांनी अनेक तरुण मुलांना क्रिकेटमध्ये भविष्य घडवण्यासाठी मदत देखील केली होती.
सुनील गावस्करांना त्याकाळचे टिकाऊ नसलेले क्रिकेट पॅड घालून खेळण्यास त्रास होत होता, त्यावेळी नाडकर्णींनी त्यांना छोडो मत, तुम्ही देशासाठी खेळत आहात याचा विसर पडू देऊ नका, असा सल्ला दिला होता. यातून पुढे मी घडलो अशी भावना सुनील गावस्करांनी व्यक्त केली होती. राजदीप सरदेसाई यांनी त्यांचे वडील दिलीप सरदेसाई यांच्या आठवणींना उजाळा देत नाडकर्णीना ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे.
नाडकर्णी यांचे भारतीय क्रिकेटमधील योगदान विसरता येण्यासारखे नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय क्रिकेटविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. भारतीय क्रिकेटच्या दोन पिढ्या घडवणाऱ्या या खडूस खेळाडूला क्रिकेट विश्व कधीही विसरणार नाही!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.