आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भगवान राम वनवासाला जाण्यासाठी रवाना झाल्यानंतर भरताने त्याची भेट घेऊन रामाने पुन्हा अयोध्येत यावे आणि राज्यकारभार सांभाळावा यासाठी विनवण्या केल्या. मात्र, पित्याचं वचन पूर्ण करणं ही आपली जबाबदारी असल्याचं सांगून रामानी परत येण्यास नकार त्या नंतर भरताने रामाच्या खडावा सिंहासनावर ठेऊन एक प्रतिनिधी म्हणून अयोध्येचा कारभार सांभाळला, ही गोष्ट आपल्याला माहिती आहेच. मात्र, प्रत्यक्षात आताच्या काळात कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल इतकं प्रेम आणि आदरभाव अनुभवायला मिळेल का?
पंकज त्रिपाठी या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याने एका दूरचित्रवाणी कार्यक्रमात बोलताना असाच काहीसा किस्सा भावपूर्णतेने कथन केला. पंकजने सध्याच्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ‘मिर्झापूरचा ”कालिन भैया’ असो किंवा ‘सेक्रेड गेम्स-२’चे ‘गुरुजी,’ अशा पंकजने साकारलेल्या अनेक भूमिकांनी मनात घर केलं आहे.
पंकज मात्र, आपल्या अभिनयकौशल्याचं विख्यात अभिनेते मनोज वाजपेयीयांना देतो. मनोज वाजपेयी हे माझ्यासाठी द्रोणाचार्य आहेत आणि मी त्यांचा एकलव्य आहे, असं सांगत पंकजने मनोज वाजपेयी यांची चप्पल घेऊन गेल्याचा किस्सा कपिल शर्माच्या शोमध्ये कथन केला. त्यानंतर त्याला इतकं भरून आलं की तो पुढे काही वेळ बोलूच शकला नाही.
खूप वर्षांपूर्वी मनोज वाजपेयी आपल्या चित्रपटाच्या चित्रिकरसाठी पाटण्याला आले होते. ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, त्याच हॉटेलमध्ये पंकज ‘किचन सुपरवाझर’ म्हणून काम करत होता. ‘मनोज वाजपेयी आपल्या हॉटेलमध्ये रहात असल्याचं कळलं तेव्हा मला आनंद झाला. मी त्यावेळी नाटकात काम करायचो. मी सगळ्या स्टाफला सांगून ठेवलं की, त्यांच्या खोलीतून जी काही ऑर्डर येईल ती पूर्ण करायला मीच त्यांच्या खोलीत जाईन.
मी मनोज वाजपेयी यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांची ऑर्डर देण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेलो. मी पण नाटक वगैरे करत असल्याचं त्यांना सांगितलं. काही वेळानंतर वाजपेयी हे आपल्या खोलीत त्यांची चप्पल विसरून गेल्याचं सफाई कर्मचाऱ्याने मला सांगितलं. त्याचाही मला खूप आनंद झाला. मी सफाई कर्मचाऱ्याला सांगितलं की, ती चप्पल ‘लॉस्ट अँड फाउंड’ विभागात जमा करू नकोस. ती मला आणून दे. वाजपेयी यांची आठवण म्हणून माझ्याकडे जपून ठेवणार आहे.’
हे सांगितल्यानंतर पंकज खूप भावुक झाला. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याचा आदर्श असणारे मनोज वाजपेयी हे देखील या शोमध्ये त्याच्याबरोबर उपस्थित होते. त्यांच्या समोरच सद्गदित होऊन त्याने हा किस्सा सांगितला. मनोज वाजपेयी यांनीही त्याचं तोंड भरून कौतुक केलं.
आपल्यावर मनोज बाजपेयी यांचा खूप प्रभाव असल्याचं त्याने जवळजवळ प्रत्येक मुलाखतीत सांगितलं आहे. एका मुलाखतीत पंकज त्रिपाठीने सांगितलं होतं की, मनोज बाजपेयी यांचा ‘सत्या’ हा चित्रपट पंकजच्या बेलसंड या गावात प्रदर्शित झाला. त्यावेळी गावात मनोज यांचं खूप कौतुक झालं. या चित्रपटानेच मनोज सुपरस्टार ठरले.
आपल्या शेजारच्या चंपारण गावातला मुलगा जर अभिनेता होऊ शकतो, सुपरस्टार होऊ शकतो तर मी का होऊ शकत नाही, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला आणि मी अभिनेता होण्याचा चंगच बांधला.
तुरुंगवासात निर्माण झाली वाङमयाची रुची
पंकज हा महाविद्यालयात शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होता. तो सन १९९३ चा काळ! बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांची सत्ता होती. राज्य सरकारच्या निषेधार्थ अभाविपने केलेल्या आंदोलनात पंकज सहभागी झाला होता. त्याबद्दल त्याला तुरुंगवासात ७ दिवस काढावे लागले. कारावासाच्या काळात मी जास्तीत जास्त वेळ तुरुंगाच्या लायब्ररीत घालावायचो. या काळातच हिंदी वांड्मयाबद्दलची रुची विकसित झाली, असं पंकज सांगतो.
माध्यमिक शिक्षणानंतर पंकज महाविद्यालयीन शिक्षणासाठी पाटण्याला गेला. महाविद्यालयात असतानाच त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली होती. मात्र, त्याला अभिनयाचंही प्रशिक्षण घ्यायचं होतं. त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेऊन अभिनय शिकण्याचा निर्णय घेतला. या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी पदवी प्राप्त करणं बंधनकारक आहे. पंकजने मात्र बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटची पदविका घेतली होती. म्हणून त्याने हिंदी साहित्यात पदवी प्राप्त केली.
त्यानंतर त्याने एनएसडीमध्ये प्रवेश घेतला. मात्र, त्यासाठीही त्याला तीन वेळा प्रवेशपरीक्षा द्यावी लागली. पहिल्या दोन प्रयत्नात तो अनुत्तीर्ण झाला होता. तिसऱ्या वेळी उत्तीर्ण झाल्यावर त्याला प्रवेश देण्यात आला.
मुंबईत आल्यावर कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दलही पंकज मनमोकळेपणाने बोलतो. मी १६ ऑक्टोबर २००४ ला मुंबईत पोहोचलो. तेव्हा माझ्याकडे ४६ हजार रुपये होते. मात्र, २५ ऑगस्टला माझ्या खिशात फक्त १० रुपये उरले होते. मला आजही ही तारीख चांगलीच आठवते. कारण त्या दिवशी बायकोचा वाढदिवस होता. आणि माझ्याकडे केक विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते.
कारकीर्द घडवण्यासाठी खूप झगडावं लागलं. पहिली १० वर्ष रडतखडतच गेली. रन, अपहरण यांसारख्या काही चित्रपटांनंतर त्याच्या कारकिर्दीला आकार आणि आधार मिळाल्याचं तो सांगतो.
पंकज त्रिपाठीने मृदुलाबरोबर सोबत प्रेमविवाह केला आहे. त्यांच्या प्रेमाची कहाणीही अनोखी आहे. ‘पंकजच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. लग्नापूर्वी घरात शौचालय बांधणार असल्याचं तिच्या सासरच्या लोकांनी सांगितलं. (ही ‘टॉयलेट, एक प्रेम कथा’ बनण्याच्या पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे.) शौचालयाचं काम कसं झालं आहे, हे बघायला पंकजचा एक मित्र त्याच्या बहिणीच्या सासरी गेला. तिथे त्याला एक मुलगी दिसली. त्याने तिच्याबद्दल पंकजला भरभरून सांगितलं. तिचं नुसतं वर्णन ऐकून न बघताच मी तिच्या प्रेमात पडलो, असं पंकज सांगतो.
त्यानंतर तब्बल ११ वर्षांनी त्यांचं लग्न झालं. पण १९९३ ते २००४ हा काळ खूप वेगळा होता. तेव्हा मोबाईल नव्हते. आणि मी मृदुलाला पत्रही लिहू शकलो नाही. मला भीती होती की माझं पत्र दुसरंच कोणीतरी वाचेल की काय, असं पंकज सांगतो. याच दरम्यान त्याला ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. तिथून तो मृदुलाला रोज सकाळी साडेसात आणि रात्री ८ वाजता लँड लाईनवर फोन करायचा. सन २००४ मध्ये त्यांनी लग्न केलं. आता त्यांना एक मुलगी देखील आहे.
पंकजने रन या चित्रपटात छोटी भूमिका करून सुरू केलेला अभिनयाचा प्रवास आज यशाच्या शिखरावर आहे. धीर न सोडता ध्येय सध्या करण्यासाठी अथक प्रयत्न करत राहिलं तर यशाला गवसणी घालणं शक्य होतं, याचा वस्तुपाठ त्याने आपल्या कारकिर्दीतून घालून दिला आहे. तसंच कितीही यश मिळालं तरी संवेदनशीलता टिकवणं आणि पाय जमिनीवर घट्ट रोवून उभं राहणं काय असतं, हे देखील त्याने आपल्या वागण्यातून दाखवलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.