आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटामध्ये बाजीरावची भूमिका साकारलेल्या अभिनेता रणवीर सिंगच्या तोंडी एक डायलॉग आहे. ‘चीते की चाल ,बाज़ की नज़र और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है’, असा तो डायलॉग. इंडियन क्रिकेट टीममधील एका खेळाडूचं वर्णन करण्यासाठी या डॉयलॉगमध्ये आपण जरा बदल करू. ‘चिते की चाल, बाज़ की नज़र और रविंद्र जडेजा के थ्रो पर कभी संदेह नहीं करते, कभी भी विकेट जा सकती है!’.
प्रत्यक्षात पहायलं गेलं तर चित्त्यासारखा चपळपणा आणि गरूडासारखी भेदक नजर या दोन्ही गोष्टी रविंद्र जडेजामध्ये अक्षरश: ठासून भरलेल्या आहेत. जडेजा टीममध्ये असणं म्हणजे एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू टीममध्ये असल्याचा विश्वास क्रिकेट चाहत्यांना येतो. त्याला कारणही तसंच आहे. जर बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये काही कमाल करता आली नाही तर निदान फिल्डिंगमध्ये तरी जडेजा आपली छाप सोडून मोकळा होतो.
“First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win.” महात्मा गांधीजींनी हे उद्गार जणू काही जडेजासाठीच काढले होते. डाव्या हातानं सुमार स्पिन बोलिंग करणाऱ्या, जेमतेम बॅटिंग करणाऱ्या जडेजाची सुरुवातीला अनेकांनी खिल्ली उडवली. जडेजा नावाचा खेळाडू टेस्ट फॉरमॅटच्या लायकीचाच नाही अशी टीका होत असतानाही खंबीरपणे उभा राहिलेला रविंद्र जडेजा आता भारतीय क्रिकेटमधील एक अमूल्य हिरा झाला आहे. या जामनगरच्या ‘ऑलराऊंडर छोऱ्या’चा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा विशेष लेख..
बर्थ डे बॉय ‘सर’ रविंद्र जडेजाचे एक से बढकर एक किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र, या गोष्टीची सुरुवात १९९० च्या दशकापासून होते. नव्वदचं दशक सुरू होण्यापूर्वी दोन वर्ष म्हणजे १९८८मध्ये दोन मुलींचा पिता असलेल्या अनिरुद्धसिंह जडेजा यांच्या घरात एक ‘सुपुत्र’ जन्माला आला. अनिरुद्ध जडेजा यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. सुरक्षा रक्षकाच्या नोकरीतून मिळणाऱ्या ठराविक पगारावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत.
इतर कुठल्याही पित्याप्रमाणं त्यांनीदेखील आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल काही स्वप्न पाहिली होती. आपल्या एकुलत्या एक मुलानं सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करावी, अशी त्यांची इच्छा होती. जामनगरमध्ये रणजितसिंहजी आणि दुलीपसिंहजी यांनी क्रिकेटची मोठी पार्श्वभूमी तयार करून ठेवलेली होती. भविष्यात आपला मुलगा क्रिकेटच्या या राजेशाही परंपरेचा भाग होईल, असा विचार अनिरुद्ध यांनी कधी केला नव्हता. मात्र, त्यांच्या मुलानं क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं.
क्रिकेटमध्ये येण्याची रविंद्र जडेजाची स्वत:ची कारणं होती. क्रिकेट म्हणजे त्याच्यासाठी एकप्रकारची पळवाट होती. घरातील तणावापासूनची पळवाट. क्रिकेटमुळं तो जास्तीत जास्त काळ घरातील ओढाताणीच्या वातावरणापासून लांब राहिल, असा विचार करून जडेजाची आई आणि बहिण नैना यांनी त्याला पाठिंबा दिला. मात्र, सुरुवातीला आसपासच्या मोठ्या मुलांनी त्याला प्रचंड त्रास दिला. ग्राऊंडवर क्रिकेट खेळताना त्याचे प्रचंड हाल केले जात.
पण या सर्व गोष्टींवर मात करून रविंद्र क्रिकेट खेळण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. किशोरवयात पाऊल ठेवलेल्या जडेजाच्या आयुष्यात महेंद्रसिंह चौहान नावाच्या व्यक्तीची एन्ट्री झाली. एक पोलीस कर्मचारी आणि स्थानिक पातळीवर क्रिकेटपटू असलेले चौहान आणि जडेजाचे वडील एकमेकांना ओळखत होते.
चौहान ‘क्रिकेट बंग्लो’ नावाच्या एका लहानशा क्लबचे प्रशिक्षक होते. अतिशय कडक शिस्तीचे चौहान आपल्या निराळ्या प्रशिक्षण तंत्रासाठी प्रसिद्ध होते. उदाहरणच द्यायचं झालं तर, ते एखाद्या मुलाला पीचच्या मध्ये उभा करत आणि त्याच्या डोक्यावरून बोलर्सला बोलिंग करायला सांगत. अशा व्यक्तीच्या हाताखाली रविंद्र जडेजाची तालीम सुरू झाली होती. त्या तालमीचं पर्यावसन कशात झालं आहे हे, आत्ताच्या जडेजाकडं पाहिलं की बरोबर लक्षात येतं.
टीम इंडियात खेळण्यापूर्वी रवींद्र जडेजानं ‘अंडर-19’ स्तरावरच आपला जलवा दाखवला होता. दोनदा अंडर-19 वर्ल्डकप खेळलेल्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये त्याचा समावेश होतो. त्यानं २००६ आणि २००८ च्या वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला होता. २००८च्या फायनलमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. २००६च्या दुलीप ट्रॉफीमधून त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर रणजी करंडक स्पर्धेत सौराष्ट्राच्या संघासोबत खेळण्यास सुरुवात केली. मात्र, इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रापासून त्याला खरी ओळख मिळाली.
आयपीएलच्या पहिल्या सिझनचा विजेता असलेल्या ‘राजस्थान रॉयल्स’ संघाचा तो भाग होता. २००८-०९ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरी आणि त्यानंतर आयपीएलमधील प्रभावी खेळाच्या जोरावर जडेजानं फेब्रुवारी २००९ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलं. त्यापाठोपाठ टी-२०मध्येही त्याला संधी मिळाली. दरम्यानच्या काळात रणजी ट्रॉफीमध्ये सलग तीन त्रिशकं ठोकण्याचा भीम-पराक्रम ‘सर’ जडेजानं केला. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
बॅटिंगमधील सातत्यपूर्ण कामगिरीचं लवकरचं त्याला बक्षिसही मिळालं. डिसेंबर २०१२मध्ये त्याला भारतीय कसोटी संघामध्ये घेण्यात आलं. २०१३ मध्ये रवींद्र जडेजा एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला. १९९६पासून अनिल कुंबळेनंतर प्रथमच एका भारतीय गोलंदाजाला हा मान मिळाला होता. काही काळानंतर तो कसोटीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनला. २०१९ मध्ये त्यानं आपल्या ४४व्या कसोटी सामन्यात २०० बळी पूर्ण केले. रवींद्र जडेजा हा सध्या टीम इंडियाचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ मानला जातो.
रविंद्र जडेजा मैदानावर जितका प्रसिद्ध आहे तितकाच मैदानाच्या बाहेरही. त्याचे अनेक अतरंगी किस्से प्रसिद्ध आहेत. सर्वात जास्त चर्चा तर त्याच्या टोपणनावांची होते. ‘राजस्थान रॉयल्स’कडून आयपीएल खेळत असताना त्याला ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न यानं ‘रॉकस्टार’ हे नाव दिलं होतं. टीम इंडियातील खेळाडू त्याला ‘जड्डू’ आणि ‘सर’ या नावांनी आवाज देतात. ही दोन्ही नावं सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत.
क्रिकेटर्स गाड्यांचा संग्रह करतात हे आपल्याला माहितीच आहे. जडेजालाही वेगवान वाहनांची आवड आहे. त्याच्याकडे ऑडी A4, सुझुकी हायबुजासह अनेक लक्झरी गाड्या आहेत. मात्र, याव्यतिरिक्त त्याच्याकडे गंगा आणि केसर नावाचे दोन घोडे देखील आहेत. खाण्यापिण्याचा शौकिन असलेल्या जडेजानं राजकोटमध्ये एक रेस्टॉरन्ट सुरू केलं आहे. ‘जड्डूज फूड फिल्ड’ असं नाव असलेलं हे रेस्टॉरन्ट त्याची बहिण सांभाळते.
आपल्या वैयक्तीक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक चढ-उतार पार करून रविंद्र जडेजा आता एक वेगळ्या उंचीवर पोहचला आहे. त्याच्यावर सर्वांचा इतका विश्वास आहे की, प्लेइंग इलेव्हनमधील त्याचा समावेश क्रिकेट फॅन्सला एक वेगळंच समाधान देऊन जातं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.