आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल आणि त्याच्या भयंकर दुष्परिणामांबद्दल आपण ऐकलंच आहे. अनियंत्रित कार्बन आणि ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनामुळे जगातील काही ठिकाणी भीषण दुष्काळ पडल्याच्या बातम्यासुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. अशीच काहीशी वेळ आलीये ती इराणवर. नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांमुळे मानव स्वतःवरच अनेक घाव करून घेत आहे. आपल्या सुख-सुविधांचा आणि ऐषारामाचा विचार करून मानवाने आपल्याच पुढच्या पिढ्यांसाठी अनेक मोठी संकटे तयार करून ठेवली आहेत हीच शोकांतिका.
मानव फक्त हवा प्रदूषण करून ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटांना आमंत्रित करतोय असं नाही, तर विविध आस्थापनांमधून, शहरांमधून आणि सोसायट्यांमधून येणारं सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सरळ नदीमध्ये सोडलं जातं. नद्या या पाण्याच्या सर्वोत्तम स्रोत आहेत. नद्या अबाधित असतील तर प्रदेशाचा कृषी व्यवसाय भरभराटीस येतो. अन्यथा अतिप्रदूषित नद्या कोरड्याही पडू शकतात.
नद्यांमध्ये अशुद्ध पाणी, विशेषतः सांडपाणी, विविध कारखान्यांतून येणारं रसायनयुक्त पाणी मिसळलं असेल तर शेतीमध्ये अन्नधान्याबरोबरच विविध रोगांना आमंत्रण देणारे घटकही मिसळले जातात. दिल्लीजवळून जाणारी यमुना नदी कारखान्यांतून सोडल्या जाणाऱ्या विषारी रसायनांमुळे लुप्त होत चालली आहे. कचरा, रसायनांमुळे झालेला पांढरा फेस, सांडपाणी यांमुळे ही पवित्र आणि आपल्या मार्गातील शेकडो शेतांची आणि मोठ्या लोकसंख्येची तहान भागवणारी यमुना गलितगात्र झाली आहे.
नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा हा प्रकार फक्त भारतातच नाही तर जगातील विविध भागांमध्ये होत असून, हे अत्यंत धोकादायक आहे. तिकडे इराणमध्ये कोरड्या पडलेल्या प्रमुख नदीचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी इस्फहानमध्ये हजारो आंदोलक एकत्र आले. काल, शुक्रवारी (दि. १९ नोव्हेम्बर) सोशल मीडिया आणि इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी चॅनेल्सवर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडियोज-्मध्ये शेतकरी आणि इतर नागरिक इस्फहान प्रांतातील झायंदेह रुड नदीच्या पात्रातील घाणीच्या एका मोठ्या ओसाड पट्ट्यावर उभे असल्याचे दिसले. “इस्फहानला मोकळा श्वास घेऊद्या, आमची झायंदेह रुड परत द्या” अशा घोषणा हे आंदोलक देत होते. नदीच्या कोरडेपणाचा पर्यावरणावर विपरित परिणाम होण्याबरोबरच प्रांतातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमानावर त्याचा थेट परिणाम होत आहे.
इस्फहानमधील लोक मध्य इराणमधील पाण्यावर आधारित उद्योगांच्या अति-विकासावर देखील टीका करतात आणि या प्रमुख नदीच्या पाण्याचे इतर शहरांमध्ये होणारे वितरण थांबवावे अशी त्यांची इच्छा आहे. इराणमधील या प्रमुख नदीला वर्षानुवर्षे पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागत आहे आणि या समस्येकडे सरकारने लक्ष न दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी कित्येकदा सरकारचा निषेधही व्यक्त केला आहे. परंतु अधिकाऱ्यांना किंवा सरकारला अद्याप या समस्येवर कोणताही शाश्वत उपाय सापडलेला नाही.
इराणमध्ये याआधी सत्तेवर असलेल्या सरकारने या भीषण पाणी समस्येवर उपाय शोधण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार इराणच्या सर्वोच्च जल परिषदेने आठ वर्षांपूर्वी एक शाश्वत उपाय सांगितलाही होता, तो म्हणजे तत्कालीन सरकारने मोठ्या पाणथळ जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी एका नाईन-पॉईंट्स प्लॅनला मंजुरी दिली होती. पण दुर्दैवाने तो प्लॅन आजवर अंमलात आलाच नाही.
शेतकरी एका आठवड्यापेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत, परंतु शुक्रवारच्या निदर्शनासाठी अनेक लोक त्यांना पाठिंबा देण्यासाठी याठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी या समस्येकडे सरकारचे लक्षं वेधण्याचा प्रयत्न केला. कदाचित हे भव्य जनआंदोलन फलित झालं आणि सरकारला या समस्येची जाणीव झाली असं म्हणायला हरकत नाही.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनी पर्यावरण तज्ज्ञांची बैठक घेतली. तर इराणचे उप-राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोखबर यांनी थेट सरकारी दूरचित्रवाणी चॅनेल्सच्या माध्यमातून एका छोट्या फोन कॉलद्वारे आंदोलकांना संबोधित केले. प्रशासन या समस्येचा “गांभीर्याने” पाठपुरावा करत आहे असे आश्वासन मोखबर यांनी दिले.
कृषी आणि ऊर्जा मंत्र्यांना या समस्येचे निराकरण करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अनेक उपाय प्रस्तावित केले गेले आहेत परंतु त्यापैकी एकाही उपायाची शिफारस अद्याप सरकारसमोर केली गेलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन उपाययोजना करेल, अशी अपेक्षा व्यक्त करून इराणच्या ऊर्जामंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक पाणी न पुरवल्याबद्दल माफी मागितली.
इस्फहान हे इराणचे तिसरे सर्वात मोठे शहर आहे. तसेच सतराव्या शतकाच्या सुरुवातीला झायंदेह रुद नदीवर बांधलेल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांचे हे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. जागतिक तापमानवाढीमुळे जगात सगळीकडे दुष्काळाचं प्रमाण वाढलंय. इराणमध्ये अनेक दशकांपासून दुष्काळ पडला आहे, परंतु गेल्या दशकात त्याची तीव्रता वाढली आहे. बहुतेक इराणी प्रांतांना सध्या काही प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
या संकटातून बाहेर येण्यासाठी फक्त विकासाचाच नाही तर ‘शाश्वत’ विकासाची गरज आहे. असा विकास, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही. आता वेळ निघून गेलेली असून, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या मोठ्या समस्या होऊन बसल्या आहेत. आपण आता फक्त त्याची तीव्रता कमी करण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. तेव्हा संपूर्ण मानवजात प्रांत, धर्म, भाषिक भेद विसरून एका सामान व्यासपीठावर एकत्र येतील आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पुढची पावलं उचलतील हीच अपेक्षा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










