आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
कुस्ती हा तसा प्राचीन खेळ. कुस्ती हा शब्द कुश्ती या फारसी शब्दावरून घेतलेला आहे. त्याचा अर्थ आहे मल्लयु*द्ध किंवा बाहुयु*द्ध. प्राचीन काळी इराणमध्ये द्वंद्वयु*द्ध खेळताना कमरेला एक पट्टा किंवा दोरी बांधत. त्याला कुश्ती असे नाव होते. या कुश्तीला धरून द्वंद्व खेळले जाई. त्यामुळे त्या खेळालाही कुश्ती असे म्हटले जाऊ लागले. कुश्त हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ ठार मारणे असा होतो. त्यावरूनच कुश्ती हा शब्द आला असावा.
अगदी प्राचीन काळापासून मानव स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लढाया करत आला आहे. त्यातूनच कुस्तीचा उगम झाला. छोटे प्राणी त्यांच्याहून आकाराने मोठ्या असलेल्या प्राण्यांवर युक्तीने मात करतात आणि स्वतःचे संरक्षण करू शकतात हे मानवाने जेव्हा पाहिले, तेव्हा त्याने मल्लविद्येची उपासना करायला सुरुवात केली. सुरुवातीला हे तंत्र प्राथमिक अवस्थेत होते. पण नंतर त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनले. ते जगभरात प्रसिद्ध झाले. वेगवेगळ्या देशांनी त्यात काही बदल केले.
भारतात वैदिक वाङमय आणि रामायण-महाभारत यांसारख्या ग्रंथांतही अनेक ठिकाणी मल्लविद्येचा म्हणजेच द्वंद्वाचा उल्लेख येतो.
या खेळाचे नियम तसे साधेसोपे आहेत. हा खेळ दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो. प्रत्येक खेळाडू आपल्या प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर लोळवण्याचा प्रयत्न करत असतो. विजयी होण्यासाठी प्रतिस्पर्ध्याचा खांदा आणि कंबर जमिनीवर टेकवावी लागते. कुस्तीचा सामना सारख्या वजनगटातील खेळाडूंमध्ये खेळला जातो.
भारतात कुस्तीवीरांची मोठी परंपरा आहे. पैलवानाकडे चपळ शरीर आणि तेज बुद्धी या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक असते. आज अशाच एका कुस्तीवीराची माहिती करून घेऊ. त्यांना राममूर्ती पैलवान या नावाने ओळखले जाते.
राममूर्ती पैलवान यांचे संपूर्ण नाव कोडी राममूर्ती नायडू. कुस्तीच्या क्षेत्रात त्यांनी भारताला जे नाव मिळवून दिले आहे त्याला तोड नाही. ते मूळचे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील वीरघट्टम् या गावाचे. वायु स्तंभन म्हणजे हवेचा रोध आणि जल स्तंभन म्हणजे पाण्याचा रोध. या दोन्ही प्रकारात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. त्यांना युनायटेड किंगडमचा राजा जॉर्ज द फिफ्थकडून ‘कलियुग भीम’ हा किताबही प्राप्त झाला आहे. त्यांनी अफाट पैसा मिळवला. पण विशेष हे की त्यातली बरीचशी रक्कम त्यांनी विविध चॅरिटेबल ट्रस्ट्सना देणगी म्हणून देऊन टाकली.
राममूर्तींच्या आईचा ते अगदी लहान असतानाच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे वडीलच त्यांची आईही बनले. वडिलांनी अर्थातच या मुलाचे भरपूर लाड केले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या बरोबरच्या मुलांची त्यांची भांडणे होऊ लागली. रोज घरी तक्रारी येऊ लागल्या. वडील कंटाळून गेले.
असेच एकदा त्यांच्या मारामारीला कंटाळून वडील त्यांना रागावले. त्यामुळे ते घरातून पळून गेले आणि एका जंगलात जाऊन राहिले. तिथे जवळपास आठवडाभर मुक्काम ठोकून होते. जेव्हा ते गावात परत आले तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर एक चित्त्याचे पिल्लू उचलून आणले होते. दिवसभर ते त्याला खांद्यावर घेऊन फिरत असत. त्यामुळे घाबरून गावातले इतर लोक घराबाहेर पडणे टाळू लागले. अर्थातच काहीजणांनी त्यांच्या वडिलांकडे याबद्दल तक्रारी केल्या.
आता पाणी डोक्यावरून चालले आहे याची वडिलांना जाणीव झाली. त्यांनी त्यांना शिक्षणासाठी आपल्या धाकट्या भावाकडे विजयनगरम येथे पाठवले. हे काका पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करत होते.
काकांच्या घरी असतानाच राममूर्ती यांनी आखाड्यात जायला सुरुवात केली आणि तिथे कुस्तीचे धडे गिरवले. मग त्यांचे काका नारायण स्वामी यांनी त्यांना मद्रास येथील दुसऱ्या एका व्यायामशाळेत पाठवले. तिथे एक वर्ष शिकून ते काकांच्या गावी परत आले आणि जवळच्या एका कॉलेजमध्ये त्यांनी व्यायामाचे शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली.
ते शुद्ध शाकाहारी होते. त्या अनुषंगाने आंध्र प्रदेश सरकारने केवळ शाकाहारी आहारातून मिळणाऱ्या प्रथिनांमधून आवश्यक ती शक्ती कशी मिळवता येते याचे महत्त्व विशद करणारा एक धडाच शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे.
१९११ मध्ये ते मद्रासला गेले. तिथे त्यांनी स्टीलच्या साखळ्या तोडणे, चालत्या गाडीला थांबवणे, तसेच स्वतःच्या छातीवरून हत्तीला चालायला लावणे यासारखी अचाट ताकदीची प्रात्यक्षिके दाखवली. हे त्यांचे कौशल्य बघून उपस्थित लोक तसेच सरकारी अधिकारीही प्रभावित झाले. त्यांनी त्यांना इंडियन सॅंडो हा किताब बहाल केला.
पुढे त्यांनी त्यांच्या काकांच्या गावी विजयानगरम् येथे एक सर्कस कंपनी स्थापन केली. त्यामध्ये त्यांनी अनेक थरारक कसरतींचा समावेश केलेला होता. ते स्वतः त्यांच्या शरीराभोवती बांधलेली लोखंडी साखळी केवळ दीर्घ श्वास घेऊन आणि स्नायू फुगवून तोडत असत. शिवाय ते स्वतःच्या छातीवर हत्तीला पाच मिनिटांपर्यंत उभे करत असत. या कसरतींनी देशभरातल्या लोकांना आकर्षित केले.
त्यावेळचे व्हॉईसरॉय लॉर्ड मिंटो यांनीदेखील राममूर्तींच्या ताकदीचा अनुभव घेतलेला आहे. त्यावेळी ते त्यांची कार चालवत होते आणि राममूर्तींनी लोखंडी साखळ्यांच्या मदतीने ती थोपवून धरली होती. या घटनेनंतर त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. केवळ भारतातच नाही तर फ्रान्स, जर्मनी, जपान, स्पेन यांसारख्या देशांतही त्यांनी आपले प्रयोग सादर केले.
स्पेनमध्ये तर स्पॅनिश लोकांनी त्यांना बुल फायटिंगच्या खेळाच्या वेळी बैलाशी झुंज देण्यासाठी रिंगमध्ये बोलावले. त्यावेळी त्यांनी बुल फायटिंग रिंगमध्ये प्रवेश करत बैलाच्या शिंगांना पकडून त्याला रोखले आणि नंतर मैदानाबाहेर फेकून दिले. वास्तविक यापूर्वी त्यांना या प्रकारचा अनुभव नव्हता. पण तरीही असामान्य धैर्य दाखवत त्यांनी या खेळावरही आपली किती पकड आहे हे सिद्ध केले.
सर्कशीच्या माध्यमातून त्यांनी लाखो रुपये कमावले आणि तितक्याच उदारपणे त्यांनी ते देशकार्यासाठी देऊनही टाकले. बी. चंद्रय्या नायडू यांच्यामुळे ते स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले.
विशाखापट्टण येथे आज त्यांचा एक मोठा पुतळा उभारण्यात आला आहे. याखेरीज त्यांच्या नावाने श्रीकाकुलम येथे कोडी राममूर्ती स्टेडियमदेखील आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.