आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
गणेशोत्सव सध्या सर्वत्र सुरू आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे सण साजरे केले जातात. तिथलं वैशिष्ट्यच ते सण मानले जातात. बंगालमध्ये दुर्गापूजा, उत्तरप्रदेशात रामनवमी व कृष्णजन्माष्टमी, गुजरातमध्ये नवरात्र, दक्षिण भारतात पोंगल, ओणम तसा आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक व काही प्रमाणात आंध्र-तेलंगणा व बंगालमध्ये देखील हा गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातसुद्धा कोकणात पारंपरिक घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या सणाची खरी मजा अनुभवायची असेल, तर ती कोकणातच.
कोकणात बऱ्याच घरांमधले गणपती हे सहसा अनंत चतुर्दशीपर्यंत असतात. बऱ्याच ठिकाणी गौरी गणपती असतात, म्हणजे गौरी विसर्जनाच्या दिवशीच गणपतीचंही विसर्जन होतं. तर काही ठिकाणी प्रथेनुसार दीड, पाच, सात, नऊ दिवसही गणपती असतो. काहीजण तर चक्क एकवीस दिवसांचा गणेशोत्सवही करतात. एकूण काय, तर कोकणी माणूस आणि गणपती बाप्पा यांचं एक वेगळंच नातं आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरी कोकणी माणूस गणेशोत्सवाच्या काळात हमखास आपल्या गावी येतोच.
एकूणच कोकणात गणेशोत्सव हा सर्व प्रथापरंपरा पाळून अगदी जोरात साजरा होत असला, तरी इथं काही वेगळ्या अशा प्रथाही आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना कोकणात फारशी रुजलेली दिसत नाही. त्याला कारण इथे पहिल्यापासूनच असलेला घरगुती गणेशोत्सवाचा प्रभाव.
मात्र प्रत्येक नियमाला अपवाद असतात, तसे या बाबतीतही आहेत. त्यातलं पाहिलं उदाहरण आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं सुप्रसिद्ध असं श्री क्षेत्र गणपतीपुळे. या क्षेत्राच्या पंचक्रोशीत कुठल्याही घरी गणेशोत्सवात गणपती बसवला जात नाही. त्या भागातले सर्व रहिवासी हे त्या मंदिरातील गणपतीचाच पाच दिवसांचा उत्सव साजरा करतात.
दुसरं उदाहरण आहे, तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं. हे खरोखरच हटके असं उदाहरण आहे. तळकोकण भागात प्रामुख्याने घरगुती गणपतीच असतात. इथे तुम्हांला क्वचित असं घर मिळेल, जिथे गणपती बसवला जात नाही. इथे एक गंमत आहे, एखाद्याने नवीन घर बांधलं, की त्या घरात जर गणपती बसवला जात नसेल तर गणपतीच्या आदल्या रात्री कुणीतरी चोरून घरच्यांच्या नकळत बाहेर दारात गणपतीची मूर्ती ठेवून जातात. सकाळी जेव्हा घरचे दार उघडतात, तेव्हा दारात गणपती दिसला की, आता तो आपणहून आलाय तर त्याला परत पाठवायचं नाही, म्हणून मग ती मूर्ती घरात आणून त्याची पूजाअर्चा, आरती वगैरे करतात. तेव्हापासून त्या घरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.
अशाप्रकारे तळकोकणात घरगुती गणेशोत्सव वाढत गेला आहे आणि वाढत जातो आहे. पण तरीसुद्धा इथे एक गाव असं आहे की, ते या सगळ्याला पूर्णपणे अपवाद आहे. ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील कोईळ. संपूर्ण तळकोकणात घरगुती गणेशोत्सवाचं प्रस्थ असताना या गावाचं वेगळेपण उठून दिसतं. गणपती हेच या गावाचं ग्रामदैवत आहे. हा गणपती अत्यंत कडक अन जागृत असा मानला जातो.
गेली सुमारे ३०० वर्षं या गावात गणेशोत्सव काळात कुणीही घरी गणपती बसवलेला नाही, तर सर्वजण मिळून ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरातच सात दिवस गणेशोत्सव साजरा करतात. या गावची गोष्टच न्यारी आहे. या गावात कोणाच्याही घरी गणपतीचा कसलाही फोटो अथवा मूर्ती आढळत नाहीत. अगदी ग्रामदैवत असलेल्या गणपतीचाही नाही. त्या मंदिरात मूर्तीचा फोटो काढायला मनाई आहे.
इतकंच नव्हे, तर जेव्हा या गावात कुणाचं लग्न ठरतं, तेव्हा त्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेवरसुद्धा गणपती छापलेला नसतो. आसपासच्या गावांमध्ये लग्नपत्रिकेवरती गणपती छापलेला नसेल, तर ती पत्रिका कोईळ गावातूनच आलेली आहे, हे लोक सहजपणे ओळखतात. कोकणात दर गावात गणपतीची एक तरी चित्रशाळा असतेच, मात्र कोईळ गावात अशी एकही चित्रशाळा नाही. गणेशोत्सव काळात इतर गावचे लोक या गावाच्या हद्दीतून आपल्या घरी गणपती नेत नाहीत.
दशावतार ही तळकोकणातली प्रसिद्ध लोककला. प्रत्येक जत्रेत दशावतारी नाटक हे इथं असतंच. त्याची सुरुवातच होते ती गणेशवंदनाने. गणपतीचा मुखवटा घेऊन एकजण मंचावर येऊन बसतो आणि गणेशवंदन झाल्यानंतर निघून जातो. इथं कोईळ गावच्या जत्रेत दशावतारी नाटक सादर होतंच, मात्र तेदेखील गणपतीशिवायच. गणपतीचा मुखवटा हा नदीपलीकडे दुसऱ्या गावी ठेवला जातो व इकडे नाटक सादर केलं जातं.
तर असं हे आगळंवेगळं गाव. पण एवढंच नाहीय, तर याच जिल्ह्यात एक गाव असंही आहे की, तिथल्या गणपतीच्या मंदिरात देव वर्षातून फक्त साडेचार महिन्यांपुरताच असतो. कसा काय? चला जाणून घेऊया.
या गावाचं नाव थोडं मजेशीर आहे, उभादांडा. हे गाव आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात. या गावात असलेलं हे गणपती मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण इथं गणपतीची स्थापना भाद्रपदातल्या गणेशचतुर्थीला न होता दिवाळीतील लक्ष्मीपूजनादिवशी केली जाते. तर त्याचं विसर्जन होतं ते, होळीच्या आदल्या दिवशी. या दरम्यानचे साडेचार महिने हा गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या नवसाला पावतो. भक्त आपले नवस फेडायला या मंदिरात येतात. गणपती इथं या मंदिरात नसताना त्याचा फोटो त्याजागी ठेवलेला असतो.
हा गणपती एका गुराख्याने स्थापन केला, म्हणून आजही गुराख्याचा गणपती अशी त्याची ओळख आहे. साधारण अडीचशे वर्षांची जुनी परंपरा या मंदिराला आहे. इथली मूर्ती ही पूर्ण शाडू मातीची बनवलेली असते. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला एकही दरवाजा नाही. हे मंदिर कायम भक्तांना खुलं असतं.
माघ महिन्यात संकष्टीला या गणपतीचा उत्सव असतो. तसंच विसर्जनाच्या आदल्या दिवशी महाप्रसाद असतो, त्याचा भरपूर भाविक लाभ घेत असतात. होळीची बोंब या गणपतीच्या कानांवर पडता नये, म्हणून त्याचं विसर्जन हे त्याआधीच केलं जातं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.