आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
वडील फास्ट बॉलर असूनही क्रिकेट त्याची पहिली पसंती कधीच नव्हती. त्याला तर आजोबांप्रमाणं टेनिसची आवड होती. असाच एकदिवस तो कोर्टवर मित्रांसोबत खेळत होता. एका क्रिकेट क्लबच्या ज्युनियर टीमसाठी दोन-तीन खेळाडूंची गरज होती. कोचनं या मुलाला टेनिस खेळताना पाहिलं होतं. जास्त खेळू जरी शकला नाही तर निदान हा मुलगा बॅट तर नक्कीच फिरवू शकतो, याची त्या क्रिकेट कोचला खात्री होती. मग काय टेनिस खेळणारा मुलगा दुसऱ्या दिवसापासून क्रिकेट खेळू लागला! क्लबच्या ज्युनियर टीमसाठी तो बॅटिंग करू लागला.
मात्र, त्याच्या नशीबात आणखी काहीतरी वेगळं होतं. एक दिवस बॅट जाऊन त्याच्या हातात बॉल आला. क्रिकेटचा देव सचिनच्या हातून ‘टेस्ट कॅप’ घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये पाय ठेवलेल्या या मुलानं १० वर्षांच्या काळातच ४०० कसोटी विकेट्सचा टप्पा गाठला. आता तुम्ही विचार करत असाल अशी चित्र-विचित्र वळणं घेऊन क्रिकेटमध्ये आपला ‘लोहा मनवणारा’ हा खेळाडू आहे तरी कोण?
अनिल कुंबळे आणि हरभजनसिंगनंतर पूर्णवेळ फिरकी गोलंदाजीची मदार समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणारा हा खेळाडू आहे, रविचंद्रन अश्वीन! अगदी शाहरूख खानच्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर, ‘अश्वीन… रविचंद्रन अश्वीन, नाम तो सुना होगा’!
कॅरम बॉल, ऑफस्पीनवर त्याचं असलेलं कमालीचं नियंत्रण आणि तीक्ष्ण मेंदू अश्विनला उत्कृष्ट फिरकीपटू बनवतं. ज्यावेळी अनिल कुंबळे निवृत्त झाला होता आणि हरभजनसिंग कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात होता. त्यावेळी अश्विन नावाचा ‘हिरा’ भारताला गवसला.
अश्विन त्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे जो आयपीएलच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत आला. सामान्यपणे म्हटलं जातं, टी-२० सारख्या शॉर्ट फॉरमॅटमधून येणारे खेळाडू ‘लंबी रेस के घोडे’ ठरत नाहीत. मात्र, चैन्नईचा हा ‘इंजिनियर’ अपवाद ठरला! क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये त्यानं स्वतःला फक्त टिकवूनच नाही ठेवलं तर सिद्ध देखील केलं.
मैदानावरील त्याची कामगिरी जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मात्र, त्याच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहिती नाहीत. आज रविचंद्रन अश्विनचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्याच्याबद्दलचा हा विशेष लेख…
रजनीकांतचा एक फेमस डायलॉग आहे, ‘शेर अकेलाही आता है’. शेर असूनही अश्विनला मात्र, हे सुख कधी अनुभवता आलं नाही! डोक्याला जास्त ताण देण्याची गरज नाही. त्यामागची कारणं मी सांगते ना तुम्हाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये त्यानं एक किंवा दोन खेळाडूंसोबत पदार्पण केलेलं आहे. त्यानं आता कर्णधार असलेल्या विराट कोहली आणि नमन ओझासह टी -20मध्ये पदार्पण केलं होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्येसुद्धा त्याला नमन ओझा आणि पंकज सिंगची सोबत मिळाली होती. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या साथीनं त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आपलं पाऊल ठेवलं. मात्र, त्याची एक गोष्ट नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. ती म्हणजे त्यानं आपल्या प्रत्येक पदार्पणात विकेट्स मिळवल्या.
त्यानं आपल्या पहिल्या टी -२०सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध चार षटकांत २२ धावा देऊन १ विकेट घेतली होती. हा सामना भारतानं सहा गडी राखून सहज जिंकला होता. एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करताना त्यानं ३८ धावा केल्या आणि दोन विकेट्सही घेतल्या होत्या, आणि अशा प्रकारे त्याने आपला प्रभाव पाडला.
याहीपेक्षा त्याचं कसोटी पदार्पण खऱ्या अर्थानं गाजलं. वेस्ट इंडीजविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळताना अश्विननं पहिल्या डावात ३ (डेरेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स आणि रवी रामपॉल) आणि दुसऱ्या डावात ६ (डेरेन ब्राव्हो, मार्लन सॅम्युअल्स, रवी रामपॉल, शिवनारायण चंद्रपॉल, केरॉन पॉवेल आणि फिडेल एडवर्ड्स) विकेट्स घेतल्या. पदार्पणाच्या कसोटीमध्ये ‘फाईव्ह विकेट हॉल’ मिळवणाऱ्या यादीत तो जाऊन बसला. याशिवाय त्याला पहिल्याच कसोटीमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’चा किताब देखील मिळाला होता.
कसोटी पदार्पणातील हा सूर त्यानं पुढे कायम ठेवला. डावांचा विचार केला तर कसोटी क्रिकेटमध्ये ५०, १००, १५०, २००, २५०, ३००, ३५० आणि ४०० विकेट्सचा टप्पा गाठणारा तो सर्वांत वेगवान भारतीय गोलंदाज आहे.
अश्विन उजव्या हातानं गोलंदाजी करतो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. मात्र, त्याला डाव्या हातानं देखील गोलंदाजी येते! हो, ही गोष्ट एकदम खरी आहे. विस्डेन इंडिया वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं स्वत: ही गोष्टी सांगितली होती. त्यानं चेन्नईच्या गल्ल्यांमध्ये खूप अंडर-आर्म क्रिकेट खेळलं होतं. तो लेगब्रेक गोलंदाजी करायचा. मात्र, ती खूप कठीण असल्याचं सांगून अनेकांनी त्याला निराश केलं. त्याचं म्हणणं होतं की त्यानं फलंदाजीच करावी आणि वाटलं तर सोबत ऑफ स्पिन गोलंदाजी करावी. म्हणून नंतर जेव्हा गोलंदाजी करण्याची वेळ आली तेव्ही अश्विननं ऑफ स्पिन गोलंदाजी केली आणि ती चांगलीच प्रभावी ठरली.
अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एक गोलंदाज म्हणूनच नाही तर कठीण काळात धावून येणारा फलंदाज देखील बनला आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर २०१३ साली ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याचं घेता येईल. पाहुण्या वेस्ट इंडिजला २३४ धावांवर रोखण्यात यजमानांना यश आलं होतं. मात्र, शेन शिलिंगफोर्डनं भारतीय फलंदाजांची शिकार सुरू केली आणि भारताची अवस्था ६ बाद १५६ झाली. एका बाजूनं रोहित शर्मा एकाकी खिंड लढवत होता. मात्र, त्यानंतर मैदानावर आलेल्या रविचंद्रन अश्विननं(१२४) रोहितच्या(१७७) साथीनं सातव्या विकेटसाठी तब्बल २८० धावांची शानदार भागीदारी केली.
भारतीय क्रिकेटसाठी हा एक अनोखा विक्रम होता. दोघांच्या भागीदारीमुळं भारताला शेवटी ४५३ धावांपर्यंत मजल मारता आली. दुसऱ्या डावात भारतानं वेस्ट इंडिजला १६८ धावांवर रोखलं आणि एक डाव आणि ५१ धावांनी विजय मिळवला. अश्विननं या सामन्यात ५ विकेट देखील घेतल्या होत्या.
मैदानावर खेळताना अश्विन सहसा शांत आणि संयमी वाटतो. मात्र, त्याच्या या धीरगंभीर चेहऱ्यामागे एक अतिशय खोडकर मुलगा दडलेला आहे. त्याची बालमैत्रीण आणि पत्नी असलेल्या प्रीतीने काही मुलाखतींमध्ये त्याची ही बाजू सर्वांच्या समोर आणली. शाळेमध्ये असताना तो प्रचंड खोडकर होता. तो आणि त्याचा ग्रुप कायम काहीना काही खेळण्यात आणि दुसऱ्यांना त्रास देण्यात गुंतलेले असायचे.
त्याचा हा खोडकरपणा अजूनही गेलेला नाही. आजही आपल्या दोन मुलींसोबत मिळून घरातील व्यक्तींच्या खोडी काढत असतो, असं प्रीतीचं म्हणणं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.