आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
दुबई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बुर्ज खलीफा इमारत, उंची शौक असणारे गर्भश्रीमंत शेख, जगातील सर्वात मोठा मॉल अशा गोष्टी येतात. मात्र, त्यासोबतच आपल्याला आठवतात ती मोठा गाजावाजा करत पाण्यात तयार केलेली कृत्रिम बेटं. २००१मध्ये पाण्यात वाळू टाकून कृत्रिम बेटं तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्यानंतर कित्येक वर्षे तो चर्चेतही राहिला. मात्र, आज त्या प्रकल्पाची स्थिती काय आहे? हा कितपत पूर्ण झालाय? याठिकाणी राहण्यासाठी सुरुवात केलीय का?
दुबईचा ड्रीम प्रोजेक्स : पाम आयलंड्स
दुबईमधील उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे तेलाच्या विहिरी हे आपल्याला माहिती आहेच. मात्र, त्यासोबच दुबईच्या उत्पन्नाचा आणखी एक मोठा स्त्रोत म्हणजे, तिथे भेट देणारे पर्यटक. दुबईचं हवामान, तेथील उंची हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल्स आणि समुद्रकिनारे! यासाठी दरवर्षी दुबईला ५० लाख पर्यटक भेट देतात. मात्र, तेथील प्रशासनाला ही संख्या १.५ कोटींपर्यंत न्यायची होती. यामध्ये एक मोठी अडचण होती, ती म्हणजे दुबईतील जागा.
दुबईमध्ये येणारे पर्यटक हे बहुतांश तेथील समुद्रकिनाऱ्यांसाठी येत. मात्र, दुबईला केवळ ७२ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे तेवढ्या जागेत १.५ कोटी लोक मावणे कधीच शक्य नव्हते. मग यावर उपाय काय?
असं म्हणतात, की ‘मॉडर्न प्रॉब्लेम्स रिक्वायर मॉडर्न सोल्यूशन्स’. त्यामुळे या दुबईतील अडचणीवरही एक मॉडर्न उपाय सुचवला गेला. समुद्रामध्ये एक कृत्रीम बेट तयार करण्याचा. देशातील मोठा प्रॉपर्टी डेव्हलपर असलेल्या ‘नखील’ने ही संकल्पना मांडली, आणि राबवलीही. हे बेट ‘पाम ट्री’च्या आकारात बनवले जाणार होते. एकूण साडेपाच किलोमीटर व्यासाचं असणारं हे बेट दुबईला ५६ किलोमीटरचा अतिरिक्त समुद्रकिनारा देणार होतं. या प्रकल्पासाठी २००६ ही डेडलाईन ठरवण्यात आली होती.
अशी झाली सुरुवात
सुरुवातीला ‘पाम जुमैरा’ या बेटांची निर्मिती सुरू करण्यात आली. त्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट अशा अभियंत्यांचा शोध घेणे सुरू झाले. शेवटी हॉलंड देशातील भूभाग ३५ टक्क्यांनी वाढवण्याचा तगडा अनुभव असलेल्या डच अभियंत्यांना या कामासाठी नक्की करण्यात आले. यासोबतच, हॉंगकॉंगचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिंगापूरचे इंडस्ट्रिअल सेंटर आणि इतर अशाच प्रसिद्ध बांधकामांचा अनुभव असलेल्या अभियंत्यांचे पथक या कामासाठी निवडण्यात आले.
समुद्रातील लाटा, वादळ, भरतीच्या वेळी वाढणारे पाणी आदींचा संपूर्ण अभ्यास करुन याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. नोव्हेंबर २००१ पर्यंत ९ बार्ज, १५ डंपर, ४ ड्रेजर्स, ३० हेव्ही लँड बेस मशीन्स आणि दहा क्रेन्स एवढ्या मशीन्स या कामासाठी नेमण्यात आल्या होत्या. जिथे निसर्गानेच समुद्र तयार केला आहे, त्याठिकाणी चक्क वाळू टाकून बेट तयार करण्याचे काम हे लोक करत होते. विशेष म्हणजे, ठरलेल्या वेळेत या अभियंत्यांनी हे काम फत्तेही केले. २००९ पर्यंत याठिकाणी २८ हॉटेल्सही सुरू करण्यात आली होती.
पाम जुमैराचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे, ही बेटे पूर्णपणे वाळू आणि दगडांचा वापर करुन बांधण्यात आली होती. यामध्ये कॉंक्रीट किंवा स्टीलचा आजिबात वापर केला नव्हता.
तसेच, अवकाशातूनही ही बेटे दिसून येतात. या प्रकल्पासाठी एकूण १२ बिलियन डॉलर्स एवढा खर्च आला होता.
आणखी दोन ठिकाणी उभारली अशी बेटे
पाम जुमैराच्या यशानंतर ‘पाम जेबेल अली’ आणि ‘डेईरा आयलंड्स’ असे दोन प्रकल्पही घोषित करण्यात आले. २००२ साली पाम जेबेल अलीचे काम सुरू करण्यात आले होते. २०१८ पर्यंत हे काम सुरूच होते. त्यानंतर हे काम थांबवण्यात आले आहे. तर डेईरा आयलंड्स ही चार लहान बेटे मुख्य भूमीला पुलाच्या सहाय्याने जोडलेली आहेत. २००४ साली नखील या प्रॉपर्टी डेव्हलपरने या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर २००५ साली याचे काम सुरू करण्यात आले. या यातील एका बेटावर २०१४मध्ये डेईरा शॉपिंग मॉल सुरू करण्यात आला.
नखीलने असे भाकित केले होते, की या बेटांवर एकूण १ लाख २० हजार नागरिक रहायला येतील. मात्र, आज याठिकाणची लोकसंख्या याच्या निम्मीही नाही. तसेच, याठिकाणी राहणारे लोकही इथं रहायला वैतागले आहेत. या बेटांच्या पाम वृक्षाप्रमाणे असलेल्या आकारामुळे इथलं पाणी खेळतं न राहता, कोपऱ्यांमध्ये साचून राहतंय. ज्यामुळे शैवाल, त्याची दुर्गंधी आणि डासांचा मोठा प्रश्न याठिकाणी निर्माण होतोय.
सुरुवातीला अनेक कोट्यधीशांनी याठिकाणी रहायचे स्वप्न पाहून इथं घरं घेतली होती. मात्र आता इथली परिस्थिती आणि भविष्यातील धोका याचा विचार करता अनेक लोक तिथून काढता पाय घेत आहेत. याला कारण केवळ डास किंवा दुर्गंधी नाही. खरंतर, याठिकाणी मोठ्या लाटा येणार नाहीत असा अभियंत्यांचा अंदाज होता.
मात्र, २००० ते २०२० या वीस वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राच्या पातळीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे इथे आता अगदी दोन मीटर उंचीच्या लाटाही येत आहेत. जी इथल्या रहिवाशांसाठी धोक्याची घंटा आहे.
यासोबतच, २००९मध्ये वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडने असे जाहीर केले, की जुमैरा बेटं ही ०.२० इंच प्रतिवर्ष या वेगाने बुडत आहेत. किती वेगाने ती बुडत यापेक्षा, ‘ती बुडत आहेत’ हेच लोकांना तिथून निघून जाण्यासाठी पुरेसं होतं. नखीलने यावेळी ही बेटं बुडत असल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं. मात्र, एकदा कानफाट्या नाव पडलं, की पडलं!
२०११मध्ये नखीलने या बेटांचं पुन्हा ब्रँडिंग सुरू केलं. मात्र, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने तेथील किंमती कमीदेखील केल्या. मात्र, तरीही लोकांचा म्हणावा असा प्रतिसाद त्याला मिळाला नाही. कहर म्हणजे, दुबईतील घरांचे भाव वरचे वर कोसळत असल्यामुळे जुमैरा वगळता इतर दोन प्रकल्प अद्यापही अपूर्ण राहिले आहेत. ही कामं पुन्हा कधी सुरू होतील याबाबत कोणालाही स्पष्ट कल्पना नाहीये.
एवढंच नाही तर, ‘जगातील आठवे आश्चर्य’ अशी जाहिरात केलेल्या या बेटांमुळे पर्यावरणाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात समुद्रात खोदकाम आणि बांधकाम केल्यामुळे येथील समुद्रातील लाटांचा पॅटर्नच बदलला गेला आहे. तसेच, इथल्या पाण्याचे तापमान, जमिनीची झीज या सर्वांचा जो गेली कित्येक वर्षे चालत आलेला पॅटर्न होता, तो अचानक बदलला.
तब्बल एक किलोमीटर वर्ग परिसरातील प्रवाळही या प्रकल्पामुळे नष्ट झाले. तसेच, यामुळे तेथील समुद्रातील जैवविविधताही धोक्यात आली आहे. ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ या संघटनेच्या मते, समुद्री जीवांसाठी युनायटेड अरब इमिराती हा देश जगातील इतर देशांपेक्षा पाच पटींनी अधिक धोकादायक आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.