आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या सत्य घटनांपासून प्रेरित होऊन त्यावर आधारलेले स्क्रिप्ट लिहिण्याचा आणि सिनेमा बनवण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये झपाट्याने वाढत चालला आहे. बॉलिवूडमधले मोठमोठे बॅनर्स अजूनही यशाचा जुना फॉर्म्युला म्हणून प्रत्येक वेळी सिद्ध झालेल्या मसाला सिनेमाला प्राधान्य देत असले तरी अनेक दिग्दर्शक मजबूत पटकथेवर विश्वास ठेवून नवनवीन प्रयोग करत आहेत.
सुदैवाने आज अनेक अभिनेतेही वेगळी वाट चोखाळताना दिसत आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. त्याचा रुस्तम हा चित्रपटही अशाच एका सत्यघटनेवर आधारित आहे. ही एक अशी घटना आहे जिच्यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही रस निर्माण झाला होता.
के एम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य असा हा खटला होता.
नौदल अधिकारी असलेले नानावटी आणि त्यांची इंग्रज पत्नी सिल्व्हिया यांची ही गोष्ट. त्यांच्या आयुष्यात आलेली तिसरी व्यक्ती म्हणजे प्रेम आहुजा. रुस्तमचा मित्र. ज्याला नानावटीने ठार मारले होते.
प्रेम आहुजाच्या हत्येबद्दल कावस माणेकशा नानावटीवरील खटला हा २० व्या शतकातील, माध्यमांमध्ये अभूतपूर्व प्रसिद्धी लाभलेल्या न्यायालयीन खटल्यांपैकी एक मानला जातो. त्यावरून प्रेरणा घेऊन अनेक कादंबऱ्या, पुस्तके, चित्रपट आणि लेख लिहिले गेले आहेत. विशेष म्हणजे, त्या काळात भारतातदेखील पाश्चात्य देशांप्रमाणेच न्यायदानासाठी, ज्युरी पद्धत अस्तित्वात होती आणि या प्रकरणामुळे त्या पद्धतीचा शेवट झाला.
‘ज्युरी ट्रायल मेथड’ म्हणजे – आरोपीला न्यायाधीश आणि काही महत्वाच्या लोकांसमोर सादर करण्यात येते आणि आरोप प्रत्यारोप झाल्यावर हे निवडक लोक स्वतःचा निर्णय देतात. चित्रपटातील ही बाब भारतीय प्रेक्षकांसाठी कुतूहलाची बाब बनली होती.
जाणून घेऊया काय होता भारतातील हा सुप्रसिद्ध खटला:
रुस्तम चित्रपटाची कथा
के. एम. नानावटी या नौदलातील उच्चाधिकाऱ्याला, कामानिमित्त सतत आपली पत्नी आणि मुले यांच्यापासून लांब रहावे लागत असे. त्यामुळे आलेल्या एकटेपणातून त्याची पत्नी सिल्व्हिया, नानावटीचा मित्र प्रेम आहुजा याच्याकडे आकर्षित झाली. सिल्व्हिया आणि प्रेम आहुजा यांचे प्रेमप्रकरण सुरु तर झाले होते, पण आहुजा तिच्याशी लग्न करेल की नाही याबद्दल तिला शंका वाटू लागली होती. सिल्व्हियाने मग तिच्या पतीकडे, स्वतःच्या या गुप्त प्रेमप्रकरणाची कबुली दिली.
या कबुलीजबाबाने नानावटीला जबरदस्त धक्का बसला आणि त्याच्या मित्राच्या विश्वासघातामुळे तो प्रचंड दुखावला गेला. त्याने आहुजाशी बोलून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले. त्याला भेटण्याआधी, नानावटीने आपल्या कुटुंबीयांना चित्रपटगृहात सोडले व खोटी सबब सांगून बंदूक घेण्यासाठी तो त्याच्या नाविक तळावर गेला. तेथून बंदूक हस्तगत केल्यावर तो आहुजाच्या फ्लॅटवर गेला आणि तिथेच त्याने आहुजाला तीन गोळ्या घातल्या. त्यानंतर स्वत: पोलिस उपायुक्तांसमोर हजर होऊन त्याने आत्मसमर्पण केले.
नानावटीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. देशातील प्रत्येक घरात या खटल्याची चर्चा सुरु झाली. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे खटल्याच्या सुनावणीसाठी ९ सदस्यांच्या ज्युरींची निवड करण्यात आली.
इकडे, माध्यमांनी नानावटीला “नायक” ठरवून त्याचे कौतुक केले. या हत्येला “भावनावेगातून घडलेला गुन्हा” असे नाव दिले गेले. त्याच्या, एक सरळ, देशभक्त नौदल अधिकारी आणि अन्यायग्रस्त पती अशा प्रतिमेमुळे त्याला सर्वसामान्यांची सहानुभूती मिळाली. साप्ताहिक ब्लिट्जने या वार्तांकनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी सुनावणीसंबंधी खास बातम्या छापल्या. ब्लिट्झच्या प्रती पूर्वी २५ पैसे दराने विकल्या जायच्या, तिथे आता एक प्रत २ रूपये दराने विकली जाऊ लागली.
ज्युरींचा कथित पक्षपात
हा गुन्हा पूर्वनियोजित कट होता की, आरोपीला ऐनवेळी चिथावणी मिळाल्यामुळे त्याच्या हातून अचानक हा अपराध घडला, याबाबतचा निर्णय ज्युरींच्या हातात होता. अचानक घडलेला अपराध असेल तर नानावटीला दहा वर्षांची शिक्षा झाली असती, तर पूर्वनियोजित गुन्ह्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असती. त्यामुळे या खटल्यात ज्युरींची भूमिका निर्णायक होती.
फिर्यादीच्या बाजूने साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली असूनसुद्धा आणि त्या बाजूने सबळ पुरावे उपलब्ध असूनदेखील, ज्युरींनी नानावटीच्या बाजूने निकाल दिला.
मुंबई सत्र न्यायालयाने अर्थातच हा निकाल फेटाळून लावला आणि उच्च न्यायालयात त्याची पुन्हा एकदा सुनावणी झाली. या खटल्याच्या निमित्ताने, सरकारने न्यायदानातील ज्युरींचा सहभाग कायमचा रद्दबातल ठरवला.
हे प्रकरण अतिशय स्पष्ट होते, म्हणूनच जेव्हा हा खटला उच्च न्यायालयात गेला, तेव्हा नानावटीच्या बाजूने असलेल्या तीव्र लोकभावनादेखील त्याला मदत करू शकल्या नाहीत. त्याची बाजू कमकुवत तर होतीच, शिवाय त्याच्या बाजूने कोणतेही ठोस पुरावे नव्हते. याउलट फिर्यादींच्या बाजूने मजबूत पुरावे व साक्षीदार होते. सरतेशेवटी, हत्येच्या गुन्ह्यासाठी नानावटीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जनतेने मोर्चे काढले, कारण त्यांना हा निर्णय खूप कठोर वाटला. ब्लिट्झने नानावटीला जनतेचा पाठींबा मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न चालूच ठेवले आणि माफीची मागणी केली. तीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर, प्रेम आहुजाच्या बहीणीला, नानावटीला क्षमा करण्यासाठी राजी केले गेले आणि त्याच्या माफीस मान्यता मिळाली.
आणि फिर्यादीचे प्रतिनिधित्व करणारा वकील कोण होता हे तुम्हाला माहीत आहे का? श्री. राम जेठमलानी यांनी केले. या प्रकरणात त्यांना राष्ट्रीय ख्याती मिळाली व त्यानंतर त्यांची व्यावसायिक भरभराट झाली. या घटनेनंतर नानावटी आणि त्यांचे कुटुंब कॅनडात स्थायिक झाले. २००३ साली नानावटी यांचे निधन होईपर्यंत हे जोडपे एकत्र होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved