आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
हैदराबादच्या निझामांनी थोडे थोडके नाही तर, तब्बल २२४ वर्ष हैदराबादवर राज्य केलं होतं. या निझामांचा उल्लेख केल्याशिवाय हैदराबादचा इतिहास अपूर्ण आहे. हैदराबादवर राज्य केलेल्या या सात निझामांना “आसफजाह” म्हणून ओळखलं जातं.
१७२४ ते १९४८ या काळात हैदराबादने सांस्कृतिक तसेच आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात वाढ बघितली. निझामाच्या दरबारी अनेक मोठमोठे कलाकार, तत्त्वज्ञ, विविध विषयांचे अभ्यासक होते. शेवटचा निझाम, जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता.
“निझामांचं शहर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजवटीची सुरुवात कशी झाली हे आज आपण जाणून घेऊयात..
निझाम-उल-मुल्क, आसफजाह पहिला, हैदराबादचा पहिला निझाम होता. याचं मूळ नाव “मीर कमरुद्दीन” होतं.
मीर कमरुद्दीन वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या वडिलांसोबत औरंगजेबाच्या दरबारी गेला होता. तेव्हाच औरंगजेबाने त्याच्या वडिलांना सांगितलं, तुमचा मुलगा मोठा भाग्यवान आहे. त्याने लहानपणीच आपल्या वडिलांकडून शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलं. वडिलांसोबत काही लढाया लढून आपली चुणूक दाखवून दिली.
लवकरच तो औरंगजेबाच्या खास माणसांपैकी एक बनला.
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्याने अदोनीचा किल्ला काबीज करत औरंगजेबाची वाहवा मिळवली. या विजयाने खुश होऊन औरंगझेबाने त्याला “चिन किलिच खान” हा किताब बहाल केला.
एवढंच नाही तर, आधी विजापूर मग माळवा आणि नंतर संपूर्ण दख्खनचा कारभार त्याच्याकडे सोपवला.
त्याने देखील औरंगजेब असेपर्यंत इमानदारीने दख्खनचा कारभार सांभाळला. पण, १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल साम्राज्य मोडकळीला येऊ लागले. तरीही याने ‘फारूख्सियार’च्या काळातही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. फारूख्सियारने त्याला ‘निझाम-उल-मुल्क’चा किताब बहाल केला आणि थोड्याच दिवसांनी सय्यद बंधूंनी फारूख्सियारची हत्या केली.
निझामाने सय्यद बंधूंचा काटा काढण्याची योजना बनवली. यात यशस्वी झाल्यानंतर त्याने मोहम्मद शाहला बादशहा म्हणून जाहीर केले आणि स्वतः त्याचा दिवाण बनून कारभार बघू लागला. पण, याच्या कालावधीत मुघल साम्राज्य उतरणीला लागलं. सगळाच सावळागोंधळ सुरु होता. अशा परिस्थितीत निझामाने कारभार सुरळीत करण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण त्याने दिलेल्या सगळ्याच सूचनांना कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली.
निझामाने दख्खनवर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली. सरतेशेवटी १७२२ साली त्याने स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची घोषणा करत मुघल साम्राज्याविरुद्ध बंड पुकारलं.
निझामाच्या या पवित्र्याने सगळीकडे एकच खळबळ माजली. बादशाहने आपला एक सुभेदार मुबारिज खान याला त्याचा बंदोबस्त करण्यास पाठवलं. इकडे निझामानेपण आपलं सैन्य गोळा केलं आणि मराठ्यांच्या मदतीने मुबारिज खानाच्या सैन्याची दाणादाण उडवली. एवढंच नाही तर, त्याचं शीर कापून दिल्लीला पाठवलं.
एकाच यु*द्धात त्याने सगळ्यांना आपल्या ताकदीचा अंदाज करून दिला.
अर्थात, त्याने वेळोवेळी दिल्लीची मदतच केली. पुढे त्याला मोहम्मद शाहने ‘आसफजाह’ हा किताब बहाल केला. आणि अशाप्रकारे आसफजाही राजवंशाची सुरुवात झाली. सर्वप्रथम निझामाने आपली राजधानी औरंगाबादवरून हैदराबादला हलवली.
हैदराबादला जाऊन आपल्या राज्याची घडी व्यवस्थित लावल्यानंतर राज्याचा विस्तार करण्यास सुरवात केली. त्याने सर्वांत आधी निशाणा साधला तो मराठ्यांच्या साम्राज्यावर. थोरले बाजीराव पेशवे दख्खनच्या मोहिमेवर असताना संधी साधून त्याने पुण्यावर ह*ल्ला केला. हे लक्षात आल्यावर बाजीराव तडक पुण्याच्या दिशेने निघाले, जिथे हा निझाम ठाण मांडून बसला होता.
पण बाजीराव प्रचंड चलाख. त्यांनी सरळ पुण्याला जाण्याऐवजी खानदेश आणि बुऱ्हानपूर या निझामाच्या सुभ्यांची लूटमार करण्यास सुरुवात केली. साहजिकच निझामाने आपलं अर्धं सैन्य परिस्थिती नियंत्रणासाठी पाठवून दिलं. उरलेलं अर्ध सैन्य घेऊन तो स्वतः पालखेडच्या मैदानात उतरला.
सैन्य अर्ध झाल्याने निझामाची शक्ती कमी झाली. याचा फायदा घेऊन बाजीरावाने निझामाला चारही बाजूंनी घेरलं आणि त्याला तह करायला भाग पाडलं.
१७३८ साली जेव्हा नादीरशहाने दिल्ली हस्तगत करण्यासाठी अफगाणिस्तानातून पंजाबची वाट धरली तेव्हा बादशहाने निझामाची मदत मागितली. पण, निझाम आणि मुघल सैन्य दोघांना मिळूनही नादीरशहाला हरवण्यात यश मिळाले नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










