आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
इतिहासातील एखाद्या भक्कम नेतृत्वामुळे इतिहासाला कलाटणी मिळत असते. मग ते नेतृत्व एखादी स्त्री भूषवत असो किंवा पुरुष. त्यांची राज्यकारभाराविषयीची धोरणेच त्यांची कारकिर्दीचं मूल्यमापन करत असतात.
भारताच्या इतिहासात वेळोवेळी अनेक स्त्रियांनी आपले नेतृत्वगुण सिद्ध करून दाखवले आहेत. राणी लक्ष्मीबाई ,महाराणी ताराबाई अशी बरीच मोठी यादी सांगता येईल. यातच एक महत्वाचं नाव म्हणजे अहमदनगरची ‘चांदबीबी’. चांदबिबीचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आणि तिने आपल्या मुलुखासाठी काय योगदान दिलं ही कहानी खरोखरच प्रेरणादायी आहे!
भारताच्या या विरांगनेने आपलं सामर्थ्य दाखवत एक आदर्श उदाहरण प्रस्थापित केलं आहे. चांदबिबीचा जन्म कधी झाला याबाबत काही ठोस पुरावा नाही, पण असे मानले जाते की साधारणतः पंधराव्या शतकाच्या आसपास चांदबिबीचा जन्म झाला असावा. चांदीचे वडील हुसेन निजाम शहा अहमदनगरचे शासक होते. तर आई खुजा हुमायु ही तेथील महाराणी होती.
हुसेन निजामशहा हे पराक्रमी योद्धा होते ,तर त्यांची राणी खुजा हुमायु ही अतिशय देखणी स्त्री होती. चांदबिबीने त्या दोघांचेही गुण जन्मतःच आत्मसात केले होते. राज्यकारभाराचे धडे गिरवत चांदबिबी लहानाची मोठी झाली आणि वयाच्या 14 व्या वर्षी तिचा विजापूरचा सुलतान आदिलशहा याच्याबरोबर विवाह झाला. तेव्हा मुलींची लग्न लवकर होत.
चांदबिबी लहानपणापासूनच खूप समजदार होती. त्यामुळे लग्नानंतर तिला जास्त अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तिने तिच्या सासरी लवकरच सर्वांना आपलंसं केलं. माहेरी राज्यकारभाराचे धडे गिरवले असल्यामुळे विजापुरातही आदिलशहाला राज्यकारभारात मदत करू लागली. तिचे वैवाहिक जीवन सुखमय होते. पती आदिलशहाचेसुद्धा तिला संपूर्ण सहकार्य मिळत होते. तिला स्वतःचे मूलबाळ नव्हते त्यामुळे ती प्रजेवर आपल्या मुलांप्रमाणेच प्रेम करीत असे. सर्व सुख पायावर लोळण घेत असताना एवढी एकच खंत तिला होती. त्यामुळे त्यांनी एक मुलाला दत्तक घेतले. आता त्यांचे कुटुंब पूर्ण झाले होते पण तिचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दुर्दैवाने आदिलशहाचा एक दिवस अचानक मृत्यू झाला आणि चांदबीबीला अकाली वैधव्य आले.
अतिशय कोवळ्या वयात नवऱ्याचा मृत्यू सहन करणं कोणालाही सोपं नाही. चांदीवर या गोष्टीचा खोल परिणाम झाला. शिवाय तिच्यावर तिच्या पतीच्या साम्राज्याची जबाबदारीसुद्धा होती. आदिलशहाच्या निधनाला थोडे दिवस होताच, त्याच्या गादीवर बसण्यासाठी सरदारांमधे संघर्ष सुरू झाला. चांदबिबीला स्वतःचे अपत्य नसल्यामुळे इतर लोक राजगादीवर आपला हक्क सांगू लागले.
यथावकाश अली आदीलशहा प्रथम यांचा भाचा इब्राहिम आदिलशहा याला विजापूरच्या राजगादीवर बसवण्यात आले. तो अल्पवयीन असला तरीही त्याच्या कुशलतेवर कुणालाही शंका नव्हती. अगदी चांदबिबीला देखील त्याच्यावर पुर्ण विश्वास होता. कदाचित याच कारणामुळे तिने इब्राहीमला गादीवर बसवून विजापूरचा राज्यकारभार सुरू केला. पण दरबारातील काही सरदारांना तिची राज्यकारभारातील लुडबुड आवडली नाही. कारण ती एक विधवा असून तिने अबलेसारखे जीवन जगावं असं त्यांचं मत होतं. त्या लोकांनी चांदबिबी विरोधी मोर्चेबांधणी सुरू केली. या संघर्षाला चांदबिबीने शौर्याने तोंड दिले.
यादरम्यान मुघलांनी अहमदनगरच्या राज्यावर हल्ला केला होता. त्यांनी अहमदनगरच्या निजामाची हत्या केली. चांदबिबीला अहमदनगर विषयी विशेष प्रेम होते. तिला तिथली चिंता वाटू लागली त्यामुळे ती विजापुरहून अहमदनगरला मदतीसाठी पोहोचली. तिथे पोहोचताच तिला खबर मिळाली की दिल्लीचा राजा शहजादा मुराद आपले सैन्य घेऊन नगर वर चाल करून येत आहे. अशा परिस्थितीत चांदबीबी ने आपली बुद्धी आणि शौर्य पुन्हा एकदा सिद्ध केले. तिने मुघलांशी धैर्याने लढा दिला.
मुघलांना प्रत्युत्तर देण्यासाठी चांदबिबीने खास रणनीती तयार केली. आणि मुघलांना धूळ चारली. त्यावेळी तिने अहमदनगरचा किल्ला मुघलांपासून वाचवला तर खरा, पण मुघलांशी कायमचे वैर मात्र ओढवून घेतले. त्यामुळे त्यानंतरसुद्धा मुघल शांत बसले नाहीत. काही दिवसानंतर शहा मुरादने चांदबिबीकडे एक दूत पाठवला, आणि तिने माघार घ्यावी असा आदेश पाठवला.
पण शेवटी जेव्हा शहा मुरादला कळले की चांदबिबी मागे हटणार नाही, तेव्हा त्याने त्याच्या पुढील हालचाली सुरू केल्या. यावेळी चांदबिबीची दूरदृष्टी कामात आली. शाह मुरादच्या हलचाली पाहताच तिने आपला भाचा इब्राहीम आदिलशहा आणि गोवळकोंड्याचा शासक महम्मद कुली कुतुबशाह यांच्याकडे मदत मागितली. त्यामुळे मुघल सेनेला तोंड देता येणार होते.
योजनेनुसार इब्राहिम खानने आपला मित्र सोहेल खानाबरोबर 25000 सैनिकांचे एक दल तयार केले. शिवाय नळदुर्ग येथील येक्लास खानाच्या सैन्याबरोबर हात मिळवणी केली. या व्यतिरिक्त गोवळकोंडामधूनसुद्धा सहा हजार लोकांना युद्धासाठी सज्ज केले गेले. अशाप्रकारे चांदबिबीकडे सैन्याची भक्कम फळी तयार झाली. आणि ती मुघलांना तोंड देण्यास सज्ज झाली. सगळं नियोजनाप्रमाणे घडत होतं पण तेवढ्यात तिचा विश्वासू सरदार मोहम्मद खान मोगलांना जाऊन मिळाला. त्याने फितुरी केल्यामुळे चांदबिबीचे सैन्य कमी पडू लागले. असं असतानाही सोहेल खान मात्र पूर्ण ताकदीनिशी मुघलांशी लढा देत राहीला. शेवटी मात्र त्यालाही हार पत्करावी लागली. असामान्य शौर्य गाजवूनसुद्धा सोहेल खान चांदबिबीला विजय मिळवून देऊ शकला नाही.
चांदबिबी युद्ध हरली असली तरीही तिने किल्ला वाचवण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवले. तिने मुघलांशी डावपेचाने बोलणी सुरू केली. पण शेवटी त्याचाही काही उपयोग झाला नाही. आणि अहमदनगरचा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे आपल्या लोकांसाठी चांदबिबी लढत राहिली, आणि शेवटी त्यांच्याच विश्वासघातामुळे तिला पराभव पत्करावा लागला. तिच्या सेनेतील काही शिपाई शत्रूच्या गटात सामील झाले आणि शेवटी त्यांनीच चांदबिबीची निर्घुण हत्या केली.
चांदबिबीला कपटाने मारले गेले असले तरीही भारताच्या इतिहासातील धैर्यशील महिलांपैकी एक चांदबिबी होती यात काहीच शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved