आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
रस्त्यावरून वाऱ्याच्या वेगाने बाईक्स पळवण्याची हौस खूप जुनी आहे. आज त्याला ‘धूम स्टाईल’ हे नाव दिलं जात असलं तरी, ही क्रेझ धूमच्याही फारफार आधीची आहे. भारताच्या खेड्यापाड्यातील खडकाळ रस्त्यावरूनही पळतील अशा बाईक्सनी एकेकाळी तरुणांच्याच काय सर्ववयोगटातील बाईक रायडर्सच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. रस्ता कच्चा असो की पक्का या गाडीला काहीही फरक पडत नसे. म्हैस विकत घेताना जसा दुध किती देते? हा प्रश्न अपरिहार्य अगदी तसेच गाडी म्हटले की मायलेज किती देते? हा प्रश्न येतोच. या गाडीचे मायलेजदेखील त्यावेळच्या इतर गाड्यांच्या तुलनेत अधिकच होते. दुर्दैवाने ही गाडी आज इतिहासजमा झाली असली तरी, एकेकाळी भारतीयांच्या स्वप्नांत रंग आणि वेग भरण्याचे काम या बाईकने केले.
रॉयल एन्फिल्डच्या जमान्यात या गाडीने मध्यमवर्गीय लोकांनाही स्वतःची स्वप्ने असतात आणि ती साकार करता येतात हे दाखवून दिले. अर्थात आम्ही इथे कुठल्या गाडीची चर्चा करत आहोत ते तर तुम्हाला कळलेच असेल.
राजदूत ३५०.
आजही जर तुम्ही या गाडीची सैर केली तर तुम्हाला समजेल की, या गाडीला सुपर बाईक का म्हटले गेले. या गाडीला रॅपिड मशीन म्हणूनही ओळखले जात होते.
एस्कॉर्टस कंपनीने एका पॉलिश कंपनीशी करार करुन भारतात राजदूतची निर्मिती केली. तो काळ होता १९६२ चा. सुरुवातीला तर या गाडीला मार्केटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्यात खूप कष्ट घ्यावे लागले.
पण, ऋषी कपूर आणि डिंपल कपाडियाच्या ‘बॉबी’मध्ये ही गाडी दर्शन आली आणि त्यानंतर सगळ्यांना हीच गाडी घ्यायची होती.
ऋषी कपूर गाडीवरून डिंपलसोबत फिरता फिरता गुलाबी आयुष्याची स्वप्नं बघत होता. बस्स, अगदी अशीच स्वप्न या गाडीवर बसून मध्यमवर्गीय बघू लागले. आजपर्यंत मार्केटमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या या गाडीचे दिवसही बॉबीने बदलून टाकले. या चित्रपटानंतर राजदूतचा खप निश्चितच वाढला होता. इतकेच या गाडीचे नावच ‘बॉबी राजदूत’ असे पडले.
चित्रपटामुळे या बाईकला लोकप्रियता मिळाली. थोडाबहुत खप वाढला पण, तरीही ती काही नंबर वन ठरली नाही. काळ बदलत होता त्यामुळे काळानुरूप ग्राहकांच्या इच्छा, स्वप्ने आणि महत्वाचे म्हणजे गरजा देखील बदलत होत्या.
१९८३ मध्ये एस्कॉर्ट ग्रुपने यामाहासोबत करार केला. मग यामाहा आणि एस्कॉर्ट यांनी मिळून राजदूतचे मॉडीफिकेशन केले. यावेळी राजदूतसोबत ३५० सीसीचे इंजिन देण्यात आले. या गाडीचे नवे रूप मजबूत तर होतेच शिवाय, ही गाडी वेगवान आणि वजनाने हलकी होती. मग मात्र या गाडीला नंबर एकची पसंती मिळू लागली. खेडे असो की शहर रस्त्यावरुन राजदूतचाच रुबाब होता. या गाडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिला पेट्रोल कमी लागायचे त्यामुळे तर बाईक रायडर्ससाठी ही गाडी म्हणजे राजदूत नाही तर देवदूतच वाटू लागली. इतकी सगळी वैशिष्ट्ये एकाच गाडीत मिळाल्यावर आणखी काय पाहिजे?
राजदूत ३५० चे फीचर्स खूपच खास होते. याला सहा गिअर होते आणि जास्तीत जास्त १५० किमी प्रती तास असा तिचा वेग होता. इतक्या वेगाने धावणारी गाडी म्हणजे तरुणांसाठी जीव की प्राणच! ही स्पोर्ट्स बाईक नव्हती पण त्याकाळी तरी भारतात याहून अधिक वेगाने धावू शकेल अशी बाइकच नव्हती. आणि मग राजदूतची लोकप्रियता अशी काही वाढली की, यापुढे इतर बाईक फिक्या पडल्या.
लोकप्रियता आणि खप दोन्हींच्या बाबतीत राजदूतने बुलेटलाही मागे सोडले. राजदूतसाठी हा काळ म्हणजे अगदी सोन्याचा काळ होता.
खेड्यापाड्यातील कच्च्या रस्त्यावरही ही बाईक धूमधडाका पळत होती. म्हणून सरकारने देखील कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना हीच गाडी घेऊन दिली. कारण, ते जेंव्हा दूरदूरच्या शेतांचे सर्वेक्षण करतील तेंव्हा प्रवास करण्यासाठी हीच गाडी सुलभ ठरेल. अधिकाऱ्यांची ही फटफट शेतकऱ्यांना ही आवडू लागली. मग दुध विक्री असो की भाजी विक्री दूरदूरपर्यंत जाऊन आपला माल खपवणे शेतकऱ्यांनाही शक्य झाले. यासाठी शेतकऱ्यांनी देखील राजदूतलाच पसंती दिली. ज्या दुर्गम रस्त्यावरून पळताना इतर बाइक नांगी टाकत तिथे राजदूत मात्र धुरळा उडवत पळत होती. तेही भरपूर अवजड सामानासह!
१९८० ते ९० पर्यंत तरी राजदूतला टक्कर देणारी एकही बाईक बाजारपेठेत नव्हती. या काळात राजदूतने खूप पैसा कमावला. त्यापेक्षाही जास्त लोकप्रियता कमावली. परंतु वाढत्या आधुनिकीकरणाच्या काळात ऑटोमोबाइलच्या क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान रुजू होत होते. राजदूतने या बदलत्या तंत्रज्ञानानाकडे कानाडोळा केला आणि इथेच मार खाल्ला. १९९० नंतरचे जग वेगाने बदलत होते. या वेगाशी जुळवून घेणे राजदूतला जमले नाही. नवे तंत्रज्ञान आणि नवनवी वैशिष्ट्ये असणाऱ्या गाड्यांच्या कितीतरी आधुनिक व्हरायटीज बाजारात दाखल होत होत्या आणि राजदूतचे या बदलत्या काळाकडे अजिबात लक्षच नव्हते.
काळ पुढे सरकत राहिला आणि गाडी मागे पडत गेली. बाजारातील नव्या बाईक्सनी राजदूतला मात दिली. शिवाय, याचा उत्पादन खर्च वाढत होता त्यामुळे याच्या किमती देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या. याचे स्पेअरपार्ट बदलून घेणे ही तर त्याहून मोठी डोकेदुखी. या गाडीचे पार्ट्स खूपच महाग होते.
हळूहळू या गाडीचे उत्पादन कमी होत गेले. याची विक्री मंदावली त्यामुळे उत्पादन कमी करणे भागच होते. लोकांकडे आता भरपूर नवे पर्याय उपलब्ध झाले होते. त्यामुळे या जुनाट वाटणाऱ्या गाडीला विकत घेण्याची इच्छा कुणालाच नव्हती. नव्या पिढीच्या आकांक्षा आणि स्वप्ने बदलली होती. राजदूतची क्रेझ आता मागे पडली होती. शेवटी १९९१ मध्ये हिचे उत्पादन पूर्णतः थांबवण्यात आले.
आज ही बाईक फारशी कुणाकडे दिसत नाही. ज्यांना बाईक कलेक्शनचा छंद आहे, अशा हौशी लोकांकडे फार तर ही गाडी पाहायला मिळेल. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार धोनी यानेही या बाईकच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. म्हणूनच त्याने जुन्या बाजारातून ही गाडी मागेल त्या किमतीला खरेदी केली.
आज ही बाईक इतिहास जमा झाली असली तरी, या बाईकवरुन आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणारी पिढी अजून इतिहास जमा झालेली नाही. ज्यांनी ज्यांनी आपल्या स्वप्न पूर्तीसाठी या बाईकचा आधार घेतला होता अशा सर्वांच्या मनात आजही या बाईकला वरचे स्थान आहे आणि असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.