आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही इतिहासाशी निगडीत असते. मात्र हे पण हे लक्षात घ्यायला हवे की इतिहास म्हणजे काही नुसत्या सनावळ्या आणि लढायांची जंत्री नाही. या इतिहासाला देखील एक इतिहास होता, तो म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा. मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला संपूर्ण मानव जातीचा इतिहास आणि संस्कृती सांगत असतो.
आपल्याला आजकालच्या शाळेमध्ये विशेषतः इयत्ता ३ री च्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन माणसाची माहिती दिलेली आढळते. मुले अभ्यासामध्ये अश्मयुग, नवअश्मयुग, ताम्रपाषाणयुग वगैरे शब्द पाठ करतात दगडाच्या कुऱ्हाडीची, रापींची, चित्रे पुस्तकात पाहतात. परंतु पुस्तकातील दगडी ह*त्यारांची केवळ चित्रे न बघता प्रत्यक्ष दगडी कुऱ्हाड जर पाहिली तर त्या शाळेतील मुलांना प्राचीन मानवी इतिहासाबद्दल माहिती समजायला फक्त मदतच होत नाही तर त्याबद्दल जिज्ञासा देखील निर्माण होते. तसेच जर या विद्यार्थ्यांना एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रात अभ्यासाला नेले तर या विद्यार्थ्यांना देखील प्राचीन मानवी वसाहतीचे पुरावे पाहायला मिळतील आणि प्राचीन मानवाच्या वस्तीची स्थाने कशी पाहतात हे कसे ओळखायचे याबाबत नक्की माहिती मिळेल.
अशाच प्राचीन मानवाच्या नदीपात्रातील वस्तींची माहिती घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील नद्यांचे महत्त्व किती आहे याबाबत जाणून घेणे फार महत्वाचे ठरेल.

महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर पहिली तर तिचे मानवाच्या संस्कृतीच्या विकासामध्ये योगदान आपल्याला दिसून येते. मानवी शरीरात जशा धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात त्याच प्रकारे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्राचे पोषण करतात. महाराष्ट्रातील नद्यांचे योगदान मानवाच्या विकासासाठी फार मोठे कारण आहे.
याच नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते.
मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते.
आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. भारतामधील नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीची उत्तम उदाहरणे म्हणजे प्राचीन सरस्वती नदीकाठी वसलेले कालीबंगन येथे ‘घग्गर’ संस्कृतीचे अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात.
आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरूरजवळ असणाऱ्या ‘इनामगाव’ येथील घोडनदीच्या काठावर झालेल्या उत्खननात ‘माळवा संस्कृती’, ‘पुर्वजोर्वे संस्कृती’ अशा ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील विविध स्तर उत्खननात सापडले. महाराष्ट्रातील प्रवरा ही एक अत्यंत महत्त्वाची नदी. याच प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये नेवासा, दायमाबाद तसेच जोर्वे येथे अश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे पुरावे उत्खननातून मिळाले. हे उत्खनन प्राचीन मानवी वसाहती महाराष्ट्रात होत्या याचे फार मोठे पुरावे उपलब्ध करून देते.

प्रवरा नदी नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. अनेक छोटीमोठी गावे या प्रवरा नदीच्या काठावर वसलेली आहेत. मुळात नगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की गोदावरीच्या खोऱ्यामधील प्रवरा नदी आणि कृष्णा खोऱ्यामध्ये असणारी सीना नदी या दोन्ही नद्या या एकाच जिल्ह्यातून वाहतात.
या नद्यांच्या काठी मानवी संस्कृती वसत गेली आणि मानवाचा विकास होत गेला हे आपल्याला या नद्यांच्या काठावर आढळणाऱ्या मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून समजते. प्रागैतिहासिक काळापासून या संपूर्ण खोऱ्यामध्ये विविध संस्कृती नांदल्या आणि विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रात उदयाला आल्या असे आपल्याला दिसते.
अश्मयुगात माणूस भटक्या अवस्थेत होता. त्या काळामध्ये माणूस पाण्याच्या आश्रयाने राहत असे आणि आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दगडांची तो ह*त्यारे करीत असे, जुनी झालेली ह*त्यारे तेथेच टाकून तो स्थलांतर करत असे. या टाकलेल्या ह*त्यारांवर पावसाळ्यात नदी आपला गाळ जो वाहून आणते त्याचा थर या ह*त्यारांवर बसायला लागला की ही ह*त्यारे नदीपात्रातील मातीमध्ये बुजून जातात. जसजसा नदीचा गाळ कालांतराने वाहून जातो किंवा नदीपात्र हे शुष्क बनते तसे ही लपली गेलेली हत्यारे आणि प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा दिसू लागतात.
प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा या बऱ्याचश्या गावांमध्ये ‘पांढरी किंवा पांढर’ या नावाने प्रसिद्ध असतात. या पांढरी बऱ्याचदा नदीपात्रालगत असतात आणि या पांढरीचा थर मात्र नेहमीच्या मातीपेक्षा खूप वेगळा असतो. या पांढरीच्या टेकडामुळे बऱ्याचदा आपल्याला प्राचीन मानवी संस्कृतीचे धागेदोरे सापडायला मदत होते.

प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी ह*त्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे.
या मातीच्या खापारांवरून आपल्याला प्राचीन मानवी वसाहतींचा काळ निश्चित करता येतो.
या विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रातील नदीकाठी नांदत होत्या, त्याचे पुरावे या महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला देतात आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या पाऊलखुणा या आपल्याला धुंडाळणे फार महत्त्वाचे ठरते, कारण यातून आपल्याला प्रागैतिहासिक मानवाची प्रगती समजते आणि नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीतून आजच्या मानवाच्या प्रगतीची झलक दिसून येते.

सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर पूर्वप्रकाशित.
संदर्भपुस्तके:-
- पुरातत्वविद्या:- श्री. शां.भा.देव,१९७९
- महाराष्ट्रातील पुरातत्व:- श्री. ह.ध. सांकलिया आणि म.श्री. माटे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९७६
छायाचित्रे:-
- महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक मानवाच्या वस्तीची स्थळे.
- डेक्कन कॉलेज फिल्ड व्हीजीट दरम्यान घेतलेली छायचित्र आहेत.
महत्वाचे:-
- सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
- कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
- सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या पाऊलखुणा ठेवाव्यात.
- धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.









