आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
“अहिं*सा ही प्रेमाची भाषा आहे. अहिं*सा माणसाला धैर्यवान बनवते. जगात तोपर्यंत शांतता नांदणार नाही जोपर्यंत लोक अहिं*सेच्या तत्वाचे पालन करणार नाहीत”.
हे गांधींचे शब्द आहेत. पण महात्मा गांधी नव्हे, सरहद गांधी!
सरहद गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफार खान यांनी गांधीचे अहिं*सा हे तत्व स्वतःत इतके भिनवून घेतले होते जनमानसात त्यांची प्रतिमा दुसरे गांधी अशीच झाली होती.
खान अब्दुल गफार खान यांना ‘बादशाह खान’ आणि ‘बच्चा खान’ या नावाने देखील ओळखले जात असे. सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर खोऱ्यातील उत्मानझाई येथील एका पश्तून कुटुंबात जन्मलेले गफार खान हे एक थोर स्वातंत्र्यसेनानी होते, ज्यांनी भारतातील सर्व धर्म-संप्रदायांमध्ये एकता राखण्याचा प्रयत्न केला.
अब्दुल गफार खान यांचा जन्म एका अशा प्रदेशात झाला होता जिथे नेहमीच जातीजमातीत टोळी यु*द्धे होत असत. रक्तपाताचा इतिहास असलेला हा प्रदेश आज खैबर पख्तुनख्वा म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश अफगाणिस्तानच्या सीमेलगत येतो. अशा वातावरणात वाढलेले गफार खान महात्मा गांधींचे पट्टशिष्य होते आणि त्यांच्या अहिं*सा या तत्वाचे मनापासून आचरण करत असत.
त्यांच्या अहिं*सेच्या आणि सत्याग्रहाच्या तत्वावर असणाऱ्या प्रखर निष्ठेमुळेच त्यांना लोक “सरहद गांधी” म्हणून ओळखू लागले.
अब्दुल गफार खान यांचा जन्म ६ फेब्रुवारी १८९० साली सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर खोऱ्यात झाला. त्यांचे कुटुंब एक सधन पश्तून कुटुंब होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कॉर्प्स ऑफ गाईड्समध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटीश अधिकारी आणि सैन्याची एक तुकडी होती जी पाकिस्तानच्या वायव्येकडील सीमेवर (एनडब्ल्यूएफपी – नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स) तैनात केली होती.
परंतु, गाईड्सना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वर्तुणूक पाहून त्यांनी इथे प्रवेश घेण्यास नकार दिला. याऐवजी त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्याचे ठरवले. इथे इतर पश्तून राजकीय कार्यकर्त्यांसोबत ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे ओढले गेले.
खान ज्या प्रदेशातून आले होते इथे ब्रिटीश अधिकारी प्रचंड सामाजिक-आर्थिक शोषण करत असत. या प्रदेशाला रक्तपाताचा इतिहास होता. आपसातच टोळीयु*द्धे होत होती. शिवाय, ब्रिटीश सैन्यात देखील हे लोक सामील होते तरीही ब्रिटिश अधिकारी या लोकांचे प्रचंड शोषण करत असत.
आपले समाजबांधव ज्या पद्धतीचे रानटी आयुष्य जगतात ते गफार खान यांना अजिबात पाहवत नव्हते. आपल्या पश्तून बांधवांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी खान यांनी शिक्षण केंद्रे सुरु केली.
१९१५ ते १९१८ या तीन वर्षांत ते या प्रदेशातील सुमारे ५०० गावातून फिरले. शिक्षणामुळे होणारी सामाजिक सुधारणा आणि आपल्या समुदायातील हिं*सेची संस्कृती याबाबत ते सातत्याने बोलत राहिले.
त्यांच्या या सुधारणा कार्यात ब्रिटिशांनी हरेक प्रकारे अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चालवलेल्या शाळा बंद पडल्या. शिवाय, सतत त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने अटक करून तुरुंगात टाकत असत.
१९२८ साली जेंव्हा त्यांची आणि महात्मा गांधींची पहिली भेट झाली तेव्हापासून त्यांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग अधिक वाढला. दोघांमध्येही त्यांच्या तत्वाबद्दल अपार निष्ठा होती आणि परस्परांविषयी अत्युच्च आदराची भावना होती. यामुळेच दोघांमधील संबंध आणखीन दृढ झाले.
गांधींच्या अहिं*सा आणि सत्याग्रहाच्या तत्वाने प्रेरित होऊन गफार खान यांनी “खुदाई खिदमतगार” नावाची एक स्वतंत्र चळवळ सुरु केली. खुदाई खिदमतगार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना “सुर्ख पोष” म्हटले जाई.
खान यांच्यातील अजोड चिकाटी आणि अहिं*सेच्या मार्गाशी पूर्णतः प्रमाणिक राहून काम करण्याची त्यांची हातोटी यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. एकसंघ भारत घडवण्यावरही त्यांचा अतूट विश्वास होता.
त्यांचा खुदाई खिदमतगार या संघटनेत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जमा होत होते. एकेकाळच्या लढवय्या पश्तून जमातीतील हे तरुण आज अहिं*सेच्या मार्गाने आंदोलन करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
१९३० साली गांधीनी मिठाचा सत्याग्रह केला तेंव्हा हे सारे खिदमतगार गांधींच्या सत्याग्रहात सहभागी झाले होते. ब्रिटीश सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन गफार खान यांनी केले. उत्मानझाई येथे त्यांनी केलेल्या भाषणानंतर ब्रिटीशांनी त्यांना अटक केली.
त्यांच्या अटकेनंतरही त्याच्या समर्थकांनी शांततामय मार्गाने आंदोलन सुरु केले. परंतु या आंदोलनाची देखील ब्रिटीशांनी १९१९च्या जालियानवाला बागसारखीच दुरवस्था केली.
सरहद गांधी यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी किसा ख्वानी बझार येथे समर्थकांचा जमाव मोठ्या संख्येने जमला होता. तिथे नेमके काय होणार आहे, याचा कुणालाही अंदाज नव्हता.
नि:शस्त्र खिदमतगार शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना ब्रिटीशांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. अहिं*सेच्या मार्गाने निषेध नोंदवणारे खिदमतगार स्वेच्छेने छातीवर गोळ्या झेलण्यास पुढे झाले.
अधिकाऱ्यांनी या गोळीबारात २० लोकांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद केली असली तरी प्रत्यक्षात शेकडो खिदमतगार शहीद झाले होते.
१९३० पर्यंत खुदाई खिदमतगार आणि राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी एकत्र काम केले. पण दुसऱ्या महायु*द्धात ब्रिटीशांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि खान यांच्यात मतभेद झाले. १९४२ मध्ये जेंव्हा “चले जाव” आंदोलन सुरु झाले तेंव्हा ते पुन्हा या आंदोलनात सहभागी झाले.
१९४६ मधल्या राजकीय घडामोडी आणि त्यानंतर झालेल्या भारताच्या फाळणीने गफार खान अत्यंत निराश झाले. खुदाई खिदमतगारचे नेतृत्व करताना त्यांनी एकसंघ भारताचे स्वप्न पाहिले होते, जिथे हिंदू मुस्लीम सगळेच ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन गुण्यागोविंदाने नांदतील. परंतु हे त्यांचे स्वप्न कायमचे दुभंगले.
वायव्येकडील सीमा भाग पाकिस्तानला देण्याचे मत मांडण्यात आले तेंव्हा खिदमतगारांनी याचा पूर्ण निषेध केला. परंतु, हा प्रदेश पाकिस्तानला देण्यात आला.
आपली जन्मभूमी पाकिस्तानचा भाग झाल्याचे समजल्यावर त्यांनी कॉंग्रेसच्या वरिष्ठांवर नाराजी व्यक्त केली. अत्यंत खेदाने ते म्हणाले, “तुम्ही आम्हाला लांडग्याच्या तावडीत दिले.”
पाकिस्तानची स्थापना झाल्यावर त्यांनी पाकिस्तान सरकारकडे त्याच्या वेगळ्या पख्तुनिस्तानची मागणी केली. मुस्लीम बहुल देशातील पठणांना त्यांचा वेगळा, स्वतंत्र प्रदेश हवा होता. परंतु पाकिस्तानी सरकारने खुदाई खिदमतगार हे गद्दार असल्याचे जाहीर केले. कारण त्यांना भारताप्रती सहानुभूती होती, गांधींच्या अहिं*सा आणि सत्याग्रहाच्या मार्गावर त्यांचा विश्वास होता.
गफार खान यांचे भारतीय नेत्यांशी जवळचे संबंध होते. या कारणावरून त्यांना सतत अटक केली जात असे. त्याच्या जमिनी देखील हिसकावून घेण्यात आल्या.
पश्तून लोकांना पाकिस्तानी सरकार ज्या पद्धतीने वागणूक देत आहे त्याचा निषेध केल्याबद्दल कित्येक वर्षे खान यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. १९४८ ते १९५४, १९५८, १९६४ आणि शेवटी १९७३ या दरम्यान त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. या सततच्या तुरुंगवासामुळे त्यांचे आरोग्य सातत्याने ढासळत गेले.
१९६४ पासून ते अफगाणिस्तानमध्ये जाऊन अज्ञातवासात राहिले. १९७३ साली भुट्टो सरकारने त्यांना पुन्हा अटक केली.
खान पाकिस्तानचे नागरिक असून देखील भारतीय नेत्यांनी आणि जनतेने त्यांना प्रचंड आदर आणि प्रेम दिले. १९८७ साली त्यांना भारत सरकारच्या वतीने भारतरत्न प्रदान करण्यात आला.
फाळणीदरम्यान त्यांनी कित्येक हिंदू आणि शीख कुटुंबांचे प्राण वाचवले. त्यांनी पाकिस्तानमध्ये जीनांचा निषेध केला तसाच, २० वर्षानंतर भारतात जेंव्हा अल्पसंख्य समुदायावर ह*ल्ले करण्यात आले तेव्हा त्यांनी भारत सरकारचा देखील निषेध केला.
दुबळ्या लोकांप्रती त्यांना असणारी कणव, शस्त्राच्या वापराबाबतची साशंकता, दोन्हीकडील सत्ताधीशांविरोधात खुलेआम बोलण्याचे धाडस, सत्ताधीश आणि नागरिक दोहोंमध्ये समन्वय साधण्याची कला, या साऱ्या गुणांमुळे भारतीय उपखंडात त्यांच्याकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जात होते.
२२ जानेवारी १९८८ रोजी पेशावर येथे त्यांच्या मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन लाखाहून अधिक लोक जमा झाले होते. यात अफगाणिस्तानचे अध्यक्ष मोहम्मद नजिबुल्लाह आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी देखील होते.
अफगाणिस्तान सरकारने त्याच्या अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या लोकांना व्हिसा माफ केला. त्या एकाच दिवशी हजारो नागरिक कुठल्याही बंधनाशिवाय सीमा पार करत होते. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सोव्हिएत-अफगाण यु*द्धाला स्वल्पविराम देत यादिवशी यु*द्धबंदी घोषित करण्यात आली, जेणेकरून पेशावर आणि जलालाबाद येथे ये-जा करणाऱ्या शोकाकुल नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये.
खऱ्या अर्थाने ते सरहद गांधी ही त्यांची बिरुदावली त्याच्या मृत्यू पश्चातही सार्थ ठरली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे स्वप्न बघणाऱ्या या अवलियाने स्वप्नभंगाचे दु:ख उराशी बाळगत अखेरचा श्वास घेतला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.