आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गोष्टी वेळेनुसार कालबाह्य होतात. त्यातील काही गोष्टी लक्षात राहतात त्यांच्या विशेषतेसाठी तर काही लक्षात राहतात त्या काळाच्या विशेषतेमुळे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात अशा भरपुर उत्पादनांनी आपली ओळख निर्माण केली.
भारतातील पहिल्या म्हणून या गोष्टी आता कायम लक्षात राहतील. अशीच एक भारतातील पहिल्या गोष्टींमध्ये गणली जाणारी गोष्ट म्हणजे एचएमटी या कंपनीचे मनगटी घड्याळ.
या घड्याळीचे अनावरण केले ते तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी. ‘देश की धडकन’ म्हणून ओळखली जाणारी ही घड्याळ त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजली. आज आपण याच घड्याळीचा इतिहास जाणून घेणार आहोत.
८०-९०च्या दशकात जन्मलेल्या भारतीय तरुणांसाठी एचएमटी म्हणजे अतिशय ओळखीचे नाव आहे. घड्याळ म्हटले की एचएमटी हे समीकरण भारतात ७०च्या दशकात सुरु झाले. एचएमटी घड्याळ घालणे त्यावेळी अतिशय मानाची गोष्ट होती. यश, संपत्ती आणि राष्ट्रीय स्वाभिमान या गोष्टी त्यावेळी या घड्याळातून झळकत असत.
भारतातील सगळ्यांत आधीच्या माहितीपटात समावेश असलेल्या माहितीपटाचे नाव आहे “टाईम इज एचएमटी टाईम.”
पुढे एचएमटी घड्याळाचे महत्त्व वाढतच गेले. यामागे सगळ्यात मोठा हात होता तो कुशल जाहिराती आणि वेळेनुसार घड्याळीत केले गेलेले बदल. जाहीरातींमधून केले गेलेले तत्कालीन भारताचे सामाजिक आणि सांस्कृतिक दर्शन लोकांच्या मनावर प्रभाव पाडण्यास यशस्वी झाले होते.
एचएमटीच्या टीव्हीवरील जाहीरातीत वापरण्यात येत असलेले वाक्य होते- “ये आज अपना, ये कल अपना, हर पल अपना, ये लोग अपने, ये देश अपना, धडकन अपना.” सगळ्या भारतीयांना उद्देशून बनवल्या गेलेल्या या जाहीरातीत गरीब, श्रीमंत, जात-धर्म या सगळ्या भेदभावास मुठमाती देण्याची ताकद त्यावेळी होती.
भारतीय विविधतेतील एकता दर्शवणारी ही जाहिरात त्यावेळी एचएमटीचा खप वाढवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली. ७०-८०च्या दशकात एचएमटी घड्याळ म्हणजे प्रत्येकासाठी गरजेची असलेली वस्तू झाली होती.
१९९०च्या दशकापर्यंत घड्याळ क्षेत्रात एचएमटीच्या नावाचा दबदबा राहिला. सगळ्यांना परवडणारे दर असल्याने एचएमटी घड्याळीचे ग्राहक सर्वस्तरीय होते.
‘हिंदूस्तान मशिन टुल्स’ या कंपनीने या घड्याळांची निर्मिती केली.
या कंपनीची सुरुवात झाली ती १९५३मध्ये. सुरुवातीला यंत्र उत्पादन क्षेत्रात काम करत असलेली ही कंपनी छपाई यंत्र, शेतातील यंत्रे तयार करत असे. १९६१ मध्ये सिटीझन वॉच कंपनी या जपानी कंपनीबरोबर घड्याळ निर्मिती सुरु करण्यात आली.
१९८५मध्ये त्यांनी सौर घड्याळी निर्माण करण्यास सुरुवात केली. घड्याळीची रचना खडतर वापरासाठी होती. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या भारतीयांसाठी दणकट अशा घड्याळीची गरज होती.
एक वेळ दिसायला आकर्षक नसली तरी चालेल परंतु घड्याळ मजबूत असावी हे एचएमटीच्या निर्मात्यांनी हेरले होते.
एचएमटी भारतीयांमध्ये प्रसिध्द होण्याचे आणखी एक आणि अतिशय महत्त्वपुर्ण कारण म्हणजे जाहिराती होत्या. वेगवेगळ्या वयातील लोकांना उद्देशून बनवल्या गेलेल्या या जाहीराती लोकांच्या मनात घर करुन राहिल्या. ‘देश की धडकन’ ही पंचलाईनसुद्धा भारतीयांच्या पसंतीस पडलं.
शिवाय “तुमच्याकडे इच्छा असेल तर आमच्याकडे वेळ आहे”, “देशाची वेळ ठेवणारे” असे काही मजेशीर आणि आठवणीत राहणारे वाक्य त्यावेळी एचएमटीशी संबंधीत होते. एचएमटीच्या जाहिरातींमध्ये सकारात्मकता आणि आशा असायची असे काही जाहिरात तज्ञ सांगतात.
२०००मध्ये एचएमटीच्या घड्याळीच्या व्यवसायाची पुनर्रचना करण्यात आली. जागतिकीकरण आणि आधुनिकतेच्या काळात दणकट घड्याळीवरुन लोकांची पसंत आकर्षकतेकडे आली. या बदलानुसार एचएमटीला बदल करता आला नाही.
क्वार्ट्ज़च्या घड्याळी बाजारात आल्या. टाटा समुहाने सुरु केलेली टायटन ही कंपनी आपल्या आकर्षक घड्याळींच्या जोरावर बाजारात धुमाकुळ घालू लागली. इथेच एचएमटी मागे पडली. टायटनने आकर्षकतेकडे जास्ती लक्ष दिले. त्यामुळे टायटनच्या यशात वाढच होत गेली.
टायटननंतरही एचएमटी भारतातील एक महत्त्वाची घड्याळ कंपनी म्हणून काम करत राहिली परंतु वेळेनुसार त्याची प्रसिद्धी आणि महत्त्व कमी होत गेले. शेवटी २०१४ मध्ये भारत सरकारने तिला बंद करण्याचा निर्णय घेतला.
एचमटीचा इतिहास आणि महत्त्व दोन्ही जपण्यासाठी एचएमटीने आता संग्रहालय बनवले आहे. बंगलोरला असलेल्या या संग्रहालयात एचएमटीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहिती देण्यात आली आहे. वेगवेगळे घड्याळींचे मॉडेल इथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.