आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कोरानाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प होतं. अर्थातच याचा परिणाम चित्रपट सृष्टीवरही झाला आणि टीव्ही सृष्टीवरही. टीव्हीवरील डेलीसोपच्या निर्मितीला ब्रेक मिळाल्याने आणि लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केल्याने मनोरंजनाचं काय हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे बऱ्याच टीव्ही चॅनेल्सवर जुन्याच मालिकांचे रिपीट टेलिकास्ट दाखवण्यात आले.
यात दूरदर्शननेही ८० आणि ९०च्या दशकातील जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. जागतिकीकरणाचे युग अवतरण्याआधी या मालिकांनी देशातील लोकांसाठी मनोरंजनाचा एक निखळ खजानाच उघडला होता. या दशकातील जीवनशैली आजच्या इतकी वेगवान नव्हती.
त्याकाळात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून या मालिकांचा आस्वाद घेत असे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचीच या मालिकांसोबत एक वेगळी नाळ जोडली गेली होती. दूरदर्शनने दर्शकांसाठी पुन्हा एकदा तो जमाना अनुभवण्याची सोय करून दिली.
रामायण, महाभारत, कृष्णा यांसारखे एपिक शो पुन्हा एकदा प्रसारित होऊ लागले. या एकेक मालिका पाहून लोकांना याच काळातील आणखीही काही मालिकांची आठवण होत गेली ज्यांनी त्याकाळी छोट्या पडद्यावर धूम माजवली होती. दर्शकांच्या अग्राहाखातीर दूरदर्शनने पुन्हा एकदा त्या मालिकांचे प्रसारण सुरु केले.
दर्शकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा सुरु करण्यात आलेली अशीच एक मालिका म्हणजे ‘ये जो है जिंदगी’. कुंदन शाह, मंजुल सिन्हा आणि रामन कुमार यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. हिंदी लेखक शरद जोशी यांच्या कथेवर ही मलिका बेतली होती.
प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या मालिका पुन्हा सुरु करण्याची विनंती केल्यानंतर जुन्या काळातील या मालिकांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. खरंतर, खाजगी चॅनेल्सच्या भाऊगर्दीत दूरदर्शनकडील प्रेक्षकांचा ओघ काहीसा आटलाच होता. खाजगी चॅनेल्सच्या आगमनापूर्वी भारतात दूरदर्शनने प्रेक्षकांसाठी अनेक दर्जेदार कार्यक्रम आणले होते.
पण, खाजगी चॅनेल्सची संख्या वाढत गेली तशी, हळूहळू दूरदर्शनची क्रेझ कमी होत गेली.
आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा दूरदर्शनचे रेटिंग्ज मोठ्या प्रमाणात वाढले. यासाठी या जुन्या मालिकांचाच हातभार मोठा आहे. अनेकांसाठी या मालिका म्हणजे बालपणीच्या आठवणी जागवणाऱ्या ठरल्या.
आजच्या धावपळीत हरवलेला तो निवांतपणा पुन्हा एकदा अनुभवता आला आणि विशेष म्हणजे या मालिकांनी घडवलेली ही पिढी बालपणीच्या काळातील निरागस आठवणींच्या रेशमी दुलईत हरवून गेली.
‘ये जो है जिंदगी’ ही मालिका तर त्याकाळी खूपच गाजली होती. १९८४ साली आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या प्रेमाला पात्र ठरत लोकप्रियतेचे शिखर गाठले. शरद जोशी यांच्या कथेवर आधारित या मालिकेचे दिग्दर्शन कुंदन शहा मंजुल सिन्हा आणि रमण कुमार यांनी केले होते. तिघेही एफटीआयआयचे माजी विद्यार्थी.
मध्यमवर्गीय वर्मा कुटुंबियांत घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना अगदी विनोदी अंगाने या मालिकेत दाखवण्यात आल्या होत्या.
रणजीत वर्मा हा सामान्य नोकरदार नवरा, नोकरी करणारी त्याची पत्नी रेणू वर्मा आणि तिचा चिडखोर, बेरोजगार भाऊ राजा, हे तिघे वर्मा कुटुंबातील मुख्य सदस्य.
शफी इनामदार यांनी रणजीत वर्मा यांची भुमका साकारली होती. रेणू वर्मा यांची भूमिका साकारली होती स्वरूप संपत यांनी आणि राजाच्या भूमिकेत होते राकेश बेदी.
या मालिकेचे खरे स्टार अभिनेते होते, सतीश शहा, जे प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळी भूमिका साकारायचे.
“ही मालिका पाहताना आम्हाला आमच्या बालपणीचे दिवस आठवले. या मालिकेत प्रसंगोत्पात जे विनोद दाखवले जात होते, ते अगदी चपखल सूट होत होते. या मालिकेतील पात्रे अगदी खरीखुरी वाटत जणू काही हे माझे शेजारीच आहेत”, अशा अनेक आठवणी लोकांनी सांगितल्या. लोकांच्या या आठवणी ताज्या करण्यात या मालिकांचा आणि दूरदर्शनचा वाटा मोठा आहे.
या मालिकेत काम करणारे सगळे कलाकार हे रंगभूमीवरचे ख्यातनाम कलाकार होते. यातील सतीश शहांचे पात्र अधिक लोकप्रिय होते. प्रत्येक एपिसोडमध्ये ते कोणती भूमिका साकारणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असायची. प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांनी वेगळी भूमिका साकारली तरी प्रत्येक पात्र ते इतक्या खुमासदारपणे रंगवत की विविधता असूनही त्यांची प्रत्येक भूमिका अस्सल वाटत असे.
प्रत्येक एपिसोडमधल्या भूमिकेत वैविध्य असूनही त्यांनी प्रत्येक भूमिका प्रामाणिकपणे आणि सहजतेने करायचा प्रयत्न केला. इतर पात्रांपेक्षा सतीश शहा यांचे पात्र अधिक लक्षवेधी ठरत असे.
त्यांना कधी हॉंगकॉंगहून आलेला सिंधी तर कधी उल्हासनगरच्या सिंधीची भूमिका वठवली. दोन्ही सिंधीच असले तरी दोन्ही सिंधींमध्ये जमीन अस्मानचा फरक असे. पण, हा फरक निभावून नेताना होणारी कसरत सतीश शहा लीलया पेलत असत.
या मालिकेत वर्मा कुटुंबियांचे काही शेजारी देखील होते. या सहाय्यक भूमिका करणाऱ्या फरीदा जलाल, टिकू तल्सानिया आणि अवतार गिल या कलाकारांनी देखील मजा आणली. या सगळ्या पात्रांच्या माध्यमातून भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवले जात होते.
एका एपिसोडमध्ये वर्मा कुटुंबियांच्या शेजाऱ्यांकडे काही तमिळ पाहुणे येतात, त्यांच्या स्वागतासाठी वर्मा कुटुंबीय आपल्या घराची दाक्षिणात्य पद्धतीने सजावट करतात. असा सौहार्दही या मालिकेतून दाखवण्यात आला.
आठवड्यातून एकदा तोही दर शुक्रवारी प्रसारित होणारा हा कार्यक्रम परदेशस्थित भारतीयांमध्ये तर फारच लोकप्रिय होता. परदेशी भारतीयांमध्ये तर हा कार्यक्रम इतका लोकप्रिय होता की, प्रीमियम किंमतीत ॲडव्हान्समध्ये लोक कार्यक्रमाच्या कॅसेट्स घेऊन जात. या कार्यक्रमाच्या कॅसेट्स दुकानात आल्यात असे समजताच अगदी भराभरा त्यांची विक्री होत असे.
याच कार्यक्रमात कलाकार म्हणून काम करणाऱ्या स्वरूप संपत यांची एक बहिण ब्रिटनमध्ये राहायला होती, ती तर आतुरतेने कधी एकदा या कार्यक्रमाच्या कॅसेट्स येतात याचीच वाट पाहत असे. कॅसेट्स दुकानात आल्याचे समजताच लोक अक्षरश: यावर तुटून पडत.
विनोदी मालिका बनवण्याचा तो पहिलाच अनुभव होता. भारतात बनवली गेलेली ती पहिली विनोदी मालिका असेल. त्यामुळे ही मालिका दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकांसाठीसुद्धा या मालिकेचे काम करत असताना खूप काही शिकायला मिळाले.
“हे काम आव्हानात्मक होतंच पण जेव्हा एपिसोड पूर्ण होऊन प्रेक्षकांचा त्याला उदंड प्रतिसाद बघून आपण केलेल्या कामाचे समाधान मिळायचं,” असे रमण कुमार सांगतात. या मालिकेला इतका मोठा प्रतिसाद मिळेल याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, असेही ते म्हणतात.
या मालिकेत दाखवण्यात आलेली मध्यमवर्गीय संवेदनशीलता हाच मालिका हिट होण्यामागचा खरा फॉर्मुला होता. यातील साधी सरळ पात्रे आणि त्यांचे साधे सरळ राहणीमान यामुळे कोणालाही त्यांच्याशी सहजतेने जुळवून घेता येत होते.
घरातील एकच ट्रिंगट्रिंग वाजणारा टेलिफोन, कोणतीही खरेदी करताना २ रुपये कसे वाचतील यासाठी चालणारी धडपड, आणि घरातील साखर संपली म्हणून मागायला येणारे शेजारी, अगदी आपल्या रोजच्या जगण्यातीलच या घटना पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना आपलीच कथा विनोदी अंगाने बघत आहोत असे जाणवायचे.
म्हणूनच या मालिकेचे प्रेक्षकांच्या मनावरील गारुड आजही कायम आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.