आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
२००७ मध्ये भर दुपारी भगवानपूर पोलीस ठाण्यातला फोन खणखणला. आपापल्या कामात व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी फोन उचलायला जाण्याअगोदरचं तो वाजायचा थांबला. सहसा एकदा फोन उचलला नाही की, दुसऱ्यांदा फोन येतचं नसे, असा ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा अनुभव होता. मात्र, तो दिवस याला अपवाद ठरला. काही क्षणातच फोन पुन्हा वाजला. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील मुशाहारी गावातून तो फोन आलेला होता. अतिशय भयानक गुन्हेगाराला पकडून ठेवल्याचा दावा गावकऱ्यांनी फोनवर केला आणि पोलिसांना लवकर येण्याची विनंती केली.
पोलिसांनी त्या गावाचा मार्ग धरला. तेव्हा त्यांना तरी कुठे माहिती होतं की, ते ज्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी जात आहेत तो एक ८ वर्षांचा मुलगा आहे! हो तो आठ वर्षांचाच मुलगा होता.
‘मुलं म्हणजे देवा घरची फुलं’, असं आपल्याकडे म्हटलं जातं. बऱ्याच अंशी ते खरंही आहे. लहान मुलं निरागस असतात. त्यांना दुनियादारीचा गंधही नसतो. काय वाईट आणि काय चांगलं हे त्यांना माहिती नसतं. लहान मुलांना पाहून कित्येकदा आपल्या मनावरचा सगळा ताणतणाव पळून जातो. मात्र, बिहारमधील अमरदीप सदा या मुलाकडं पाहिल्यानंतर, लहान मुलांविषयी असलेले हे सर्व समज कुठल्याकुठे उडून जातील. खेळण्या-बागडण्याच्या वयात अमरदीप नावाच्या या आठ वर्षाच्या मुलानं तब्बल तीन खून केले. जेव्हा त्याचे गुन्हे उघडकीस आले, तेव्हा तो जगातील सर्वात लहान ‘सिरियल किलर’ ठरला. या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. अमरदीपनं केलेल्या खूनांची माहिती ऐकून भीतीची एक थंड शिरशिरी अंगातून गेल्याशिवाय राहत नाही.
बेगुसराय जिल्ह्यातील मुशाहारी गावात अमरदीपचा जन्म झाला. त्याचं कुटुंब अतिशय गरीब होतं. अमरदीप हा त्यांचा मोठा मुलगा होता. २००७मध्ये मुशाहारी गावात राहणाऱ्या चूनचून देवीनं जवळच्या पोलीस ठाण्यात अमरदीप विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानं केलेले गुन्हे पहिल्यांदा उजेडात आले. आपल्या खुशबू नावाच्या मुलीचा अमरदीपनं खून केला असल्याचा दावा या महिलेनं केला होता. जवळच्या प्राथमिक शाळेत मुलीला खेळण्यासाठी सोडून ती नेहमीप्रमाणं आपल्या कामाला गेली होती. मात्र, जेव्हा चूनचून देवी परत आली तेव्ही तिची मुलगी गायब होती. अमरदीप आणि चूनचून देवी राहत असलेलं गाव अतिशय कमी लोकवस्तीचं आहे. त्यामुळं जर गावातून एखादं मुलं बेपत्ता होत असेल तर त्याला किंवा किडनॅपरला शोधण्यासाठी फारसा वेळ नक्कीच लागला नसता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून खुशबूच्या बेपत्ता होण्यामागे अमरदीप असल्याचा निष्कर्ष चूनचून देवीनं काढला.
जेव्हा पोलिसांनी अमरदीप आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली तेव्हा त्याच्या आई-वडिलांनी तो निर्दोष असल्याचं सांगितलं. मात्र, अमरदीपनं अगदी शांतपणे आपला गुन्हा कबुल केला. आपणचं खुशबूचा खून केल्याचं आणि तिचा मृतदेह पुरून टाकल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. त्यानं सांगितलेली ही गोष्ट ऐकून पोलिसांना मोठा धक्काच बसला कारण आठ वर्षाच्या मुलावर विश्वास ठेवणं खूप कठीण होतं. मात्र, जेव्हा अमरदीपनं खुशबूचा पुरलेला मृतदेह पोलिसांना उकरून दाखवला तेव्हा मात्र, सर्वांना दिवसा तारे दिसू लागले. त्यानं खुशबूचा खून कसा केला हे देखील सांगितलं.
पोलीस चौकशी म्हटलं की, भल्या भल्यांना घाम फुटतो. पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देता-देता सराईत गुन्हागारांचीही बोबडी वळते. मात्र, आठ वर्षांच्या अमरदीपनं एकदम शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. खुशबू ही त्याची पहिला शिकार नव्हती. तिला मारण्यापूर्वी त्यानं आणखी दोन मुलींचा खून केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातील एक त्याची स्वत:ची सख्खी बहिण होती तर दुसरी चुलत. दोघींचंही वय एक वर्षापेक्षा कमी होतं.
त्याच्या कुटुंबियांना याबाबत कल्पना होती. मात्र, त्याला वाचवण्यासाठी त्यांनी त्याच्या गुन्ह्यांची वाच्यता केली नाही, असा दावा त्याच्या चुलत्यांनी केला होता. आपले गुन्हे कबुल करताना त्याच्या चेहऱ्यावर पोलिसांना पश्चातापाचा लवलेशही दिसला नाही. उलट चौकशी सुरू असताना त्यानं पोलिसांकडे बिस्कीट आणि चिप्सची मागणी केली. बिस्कीट आणि चिप्स खात-खात त्यानं तीन खून कसे केले याचा घटनाक्रम पोलिसांना ऐकवला. सगळं सांगताना मध्येच तो हसतही होता, असं तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं होतं.
या सर्व प्रकारानं संपूर्ण पोलीस खाते गोंधळात पडलं होतं. अमरदीपची तपासणी करण्यासाठी सायकोअॅनालिस्ट (मनोविश्लेषकांना) बोलावण्यात आलं. अमरदीप एक मनोरुग्ण आहे. त्याला आपण केलेल्या वाईट गोष्टींचा पश्चात्ताप होत नाही आणि इतर लोकांच्या त्रासातून त्याला आनंद मिळतो (सेडीस्ट), असा निष्कर्ष सायकोअॅनालिस्टनं काढला. अमरदीपच्या मेंदूची रचना विचित्र पद्धतीनं झालेली असून त्याला योग्य किंव अयोग्य याचं काहीच भान नसतं. कदाचित त्याच्या या अवस्थेला काही आनुवंशिक घटकही जबाबदार असू शकतात, असंही सायकोअॅनालिस्ट म्हणाले होते.
अमरदीप अल्पवयीन असल्यामुळं त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी तो तीन वर्ष राहिल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याचं काय झालं याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.
आपल्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर अमरदीप जगातील सर्वात कमी वयाचा सीरियल किलर म्हणून ओळखला जाऊ लागला. तो वयानं लहान असूनही, त्यानं अतिशय हुशारीनं खून केले. पीडितांची उपलब्धता, सुरक्षेची कमी यांच्या आधारावर त्यानं आपले बळी ठरवले होते. त्याचे तिन्ही बळी वयानं त्याच्यापेक्षा लहान होते आणि मुली होत्या. त्यांनी प्रतिकार जरी केला तरी त्यांचा आपल्यापुढे निभाव लागणार नाही, याची त्याला पुरेपुर कल्पना होती.
सायकोअॅनालिस्टच्या मते, वयाच्या दुसऱ्या वर्षानंतर लहान मुलांमध्ये ‘सायकोपॅथिक’ गुण तयार होऊ शकतात. अशी मुलं कुणालाही कुठलीही दया-माया न दाखवता जीवे मारू शकतात. त्यामुळे लहान मुलांचं अतिशय काळजीपूर्वक संगोपन करणं गरजेचं आहे आणि हे अमरदीप सदाच्या प्रकरणानं जगाला दाखवून दिलं!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.