आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
सध्या पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धांमध्ये मनू भाकर, सरबजीत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांनी पदके मिळवली आहेत. तर २०२१ साली झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं होतं ते मीराबाई चानू या वेटलिफ्टरने. ४९ किलो वजनगटात २०२ किलो वजन उचलून मीराबाई चानू यांनी देशाला टोकियो ऑलिम्पिकमधील पहिलं सिल्व्हर मेडल मिळवून दिलं. चानू यांच्या कामगिरीमुळे वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला तब्बल २१ वर्षांनी पदक मिळालं आहे. यापूर्वी कर्णम मल्लेश्वरी यांनी २००० साली झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगचे कांस्यपदक जिंकले होते.
२०१६ मध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये वजन उचलताना हात लॉक झाल्याने सुमार परफॉर्मन्स दिलेल्या चानूचे हे ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होते. यातूनच चानूने गेल्या चार-पाच वर्षांमध्ये केलेली मेहनत, दृढनिश्चय आणि स्ट्रगल दिसून येतो.
त्यांच्या या यशाचं श्रेय चानूने आपल्या घरच्यांना, सपोर्टर्सना आणि काही ट्रक ड्रायव्हर्सना दिलं आहे. होय! ट्रक ड्रायव्हर्सना. मेडल जिंकून भारतात आल्यानंतर चानू या ट्रक ड्रायव्हर्सचा शोधही घेत होत्या.
मात्र, या ट्रक ड्रायव्हर्सनी असं काय केलं होतं, ज्यामुळे ऑलिम्पिक मेडलचं श्रेय त्यांना मिळालं? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून इतिहास रचणाऱ्या चानू यांचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी झाला. मणिपूरमधील एका छोट्याशा गावात त्या वाढल्या. मणिपूरच्या वेटलिफ्टर कुंजुरानी देवी ऑलिम्पिकमध्ये पोहोचल्या होत्या, आणि त्यांना पाहून मीराबाईंनीही वेटलिफ्टिंग करायचं ठरवलं. सहा भावंडांमध्ये सगळ्यात छोट्या असणाऱ्या मीराबाईंनी हा निर्णय घेतला तेव्हा घरुन अर्थातच त्याला थोडाफार विरोध करण्यात आला. मात्र, त्यांच्या निश्चयासमोर हा विरोध फार काळ टिकला नाही.
२००७ साली त्यांनी ट्रेनिंगला सुरुवात तर केली. मात्र, यासाठी त्यांच्याकडे लोखंडी बार्स आणि इतर साहित्य उपलब्ध नव्हते. त्यामुळे मग बांबूचा वापर करुन सराव करत. मीराबाईंच्या डाएटसाठी दररोज दूध, चिकन, अंडी अशा गोष्टींची गरज होती. त्यांची परिस्थिती म्हणावी अशी चांगली नसल्यामुळे रोज रोज हे पदार्थ आणणं देखील परवडत नसे. मात्र, अशा विपरीत परिस्थितीमधूनही चानू यांनी आपला सराव सुरूच ठेवला.
वयाच्या ११व्या वर्षीच चानू या अंडर-15 चॅम्पियन झाल्या होत्या. तर, १७व्या वर्षी त्यांनी ज्युनियर चॅम्पियन हा खिताब मिळवला होता. २०१६ मध्ये तर त्यांनी १९२ किलो वजन उचलत, आपले प्रेरणास्थान असणाऱ्या कुंजुरानी देवी यांचा तब्बल १२ वर्षे अबाधित असलेला रेकॉर्ड मोडला.
सगळं सुरळीत सुरू असताना २०१६ चे रियो ऑलिम्पिक्स सुरु झाले. या स्पर्धेमध्ये मात्र मीराबाई अतिशय खराब फॉर्ममध्ये होत्या. ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू यांना स्पर्धा पूर्णही करता आली नव्हती, इतर खेळाडूंसोबतच्या सामन्यात हरणं वेगळी गोष्ट आहे. हरल्यानंतर किमान लढा दिल्याचं समाधान तरी असतं. मात्र, स्पर्धा पूर्णही न करता येणे ही एखाद्या खेळाडूसाठी अत्यंत निराशाजनक बाब असते.
कित्येक खेळाडू अशा परिस्थितीनंतर नैैराश्यात जातात. मीराबाईंचीही परिस्थिती अशीच झाली होती. एका रात्रीत सर्व भारतीयांच्या नजरेत त्या झीरो ठरल्या होत्या. त्यामुळे पुढे नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली होती. खरंतर वेटलिफ्टिंगला रामराम ठोकण्याचाच मीराबाईंचा मानस होता. मात्र, मानसोपचार तज्ज्ञांच्या सेशन्सनंतर तिने आपला विचार बदलला. यानंतर त्यांनी पुन्हा मेहनत करण्यास सुरुवात केली.
पुढे वर्षभर मेहनत करुन त्यांनी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धेत चक्क गोल्ड मेडल जिंकत त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. या स्पर्धेवेळी ४८ किलो वजनाच्या चानू यांनी १९४ किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवले होते आणि २२ वर्षांमध्ये ही कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या. यानंतर पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही चानू चांगल्याच फॉर्ममध्ये दिसल्या. ४८ किलो वजन गटामध्ये त्यांनी गोल्ड मेडल पटकावले. यामुळे त्यांचा स्वतःवरील आत्मविश्वास दुप्पट झाला, आणि त्यांनी ऑलिम्पिकच्या दृष्टीने सराव करण्यास सुरुवात केली.
मीराबाई यांचं घर हे इम्फाळपासून सुमारे २५-३० किलोमीटर दूर आहे. ट्रेनिंग सेंटरला जाण्यासाठी त्यांना दररोज हा प्रवास करावा लागत होता. घरची परिस्थिती पाहता, दररोजचा हा खर्चही मोठा होता. त्यांचे आई-वडील त्यांना या प्रवासासाठी साधारणपणे दहा-वीस रुपये देऊ शकत होते. मात्र, ते पुरेसे नव्हते. पण मीराबाईंना त्यांच्या घरापासून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्समुळे हा खर्च करण्याची वेळच नाही आली.
मीराबाईंची आई एक चहाची टपरी चालवतात. त्यांच्या गावातून इम्फाळकडे जाणारे ट्रकवाले बऱ्याच वेळा याठिकाणी चहासाठी थांबत. हेच ट्रकवाले मीराबाई यांना इम्फाळच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत लिफ्ट देत असत. टपरीवर जरी ट्रक नाही मिळाले, तरी मार्केट यार्डातून ट्रेनिंग सेंटरच्या दिशेने जाणारे ट्रक त्यांनी पाहून ठेवले होते. दररोज त्या या ट्रक ड्रायव्हर्सना लिफ्ट मागत. केवळ सरावासाठी म्हणून त्या एकट्याही दररोज ट्रकमधून ये-जा करत.
ट्रक चालकांच्या या मदतीमुळेच आपण नियमित सराव करु शकलो. आपल्या यशामध्ये या ट्रकचालकांचाही मोठा वाटा असल्याचे चानू यांनी म्हटले आहे. चानू यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर इतरांसोबतच या ट्रक चालकांचेही आभार मानले. एवढंच नाही, तर मायदेशी परतल्यानंतर त्या या ट्रकचालकांचा शोधही घेत होत्या.
आपल्या गावात जाऊन, त्या ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर्सना शोधून त्यांनी या सर्वांना भेटवस्तू दिल्या. सुमारे १५० ट्रक चालकांना मीराबाई चानू यांनी एक-एक शर्ट, मणिपुरी दुपट्टा आणि जेवण दिले. ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासात छोटी छोटी मदत करणाऱ्या लोकांनाही चानूने श्रेय दिले, आणि त्यांना भेटून आभार मानल्याचे पाहून देशभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. डोकं आभाळाला टेकलं, तरी पाय जमिनीवर असणं काय असतं, हेच चानूने आपल्या या कृत्यातून दाखवून दिलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










