आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतातील नवाब घराण्यातील मन्सूर अली खान पतौडी म्हणजेच, सैफचे वडील आणि तैमुरचे आजोबा कधीकाळी क्रिकेटस्टार होते हे तर तुम्हाला ऐकून माहिती असेलच. पण त्यांचेही वडील म्हणजे सैफचे आजोबा आणि तैमुरचे पणजोबा नवाब इफ्तिखार अली पतौडी देखील क्रिकेटर होते. जे कधीकाळी इंग्लंडकडून खेळायचे. नवाब इफ्तिखार अलीदेखील त्याकाळातील नावाजलेले क्रिकेटपटू होते.
इफ्तिखार अली नवाब असल्याने घरात भरपूर समृद्धी, ऐशोआराम, आणि बडेजाव होता. त्यांच्या आजूबाजूला नेहमीच नोकरांचा ताफा होता. १५० खोल्यांची भली मोठी हवेली त्यांना वारशात मिळाली होती. पण मन्सूर अली खान ११ वर्षांचे असतानाच त्यांचे वडील इफ्तिखार अलींचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर मन्सूर अली इंग्लंडला निघून गेले. वडिलांकडून जसा नवाबी थाट मिळाला होता तसेच क्रिकेटचा वारसाही मिळाला होता कारण त्याकाळी क्रिकेट हा फक्त श्रीमंत व्यक्तींचा खेळ होता. २०व्या वर्षापासूनच मन्सूर अली देखील क्रिकेट खेळू लागले.
पण नवाब असो की आणखी कोणी दैवाचे फासे उलटे पडले की, तेंव्हा कुणाचेच काही चालत नाही.
मन्सूर अली एकदा इंग्लंडमधील मित्रांसमवेत गाडीतून फेरफटका मारायला गेले. रस्त्यावरून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांच्या गाडीला टक्कर दिली. गाडीचा वेग इतका बेफाम होता की नवाबाची गाडी पूर्ण फुटली आणि गाडीचा काच नवाबाच्या डोळ्यात घुसला.
तातडीने त्यांना दवाखान्यात नेले गेले. त्यांची अवस्था पाहून डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. पण, दुर्दैवाने त्यांचा एक डोळा कायमचा अधू झाला होता. एका डोळ्याने अंध झाल्याने मन्सूर आता क्रिकेट कधीच खेळणार नाहीत असा त्यांच्या मित्रांचा समज होता.
पण पतौडींनी डोळा गमावला होता, जिद्द नाही!
डोळ्याच्या ऑपरेशन नंतर आत ते आठ महिने ते बिछान्यावर पडूनच होते. पण, तब्येत सुरळीत झाल्यावर त्यांनी पुन्हा बॅट हातात घेतली. क्रिकेटचा सराव सुरु ठेवला. अवघ्या सहाच महिन्यांनतर त्यांना इंग्लंड विरुद्ध कसोटी सामान्यासाठी खेळायचे होते. या सामन्यात त्यांनी अशी काही कामगिरी केली सगळे अवाक् झाले.
एका डोळ्याने दिसत नसतानाही या सामन्यात त्यांनी १०३ धावा काढल्या. पहिल्याच सामन्यात शतक पूर्ण.
२१व्या वर्षी त्यांना भारतीय संघाचे कॅप्टनपद देण्यात आले. भारताचे ते सर्वात तरुण कॅप्टन! एका डोळ्याने दिसत असूनही त्यांना बॉलचा वेग अचून कळत असे. बॉलला कुठे टप्पा द्यायचा हेही त्यांना ठावूक असे. त्यांच्या खेळातील हे अजबगजब कौशल्यामागचे रहस्य होते, सततचा सराव आणि अतूट आत्मविश्वास.
१९६८ सालच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील त्यांची खेळी पाहून त्यांना टायगर पतौडी म्हटले जाऊ लागले. एकूण ५७ सामने खेळलेल्या पतौडींनी ४० सामन्यामध्ये भारताचे नेतृत्व केले. १९६१ पासून १९७५ पर्यंत त्यांनी मैदान गाजवले. या प्रवासात त्यांच्या नावावर एकूण २७९० धावा जमा आहेत. १९७५ साली त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकला.
क्रिकेटच्या टायगरच्या मनात भरली ती बंगाली टायग्रेस शर्मिला टगोर. सुरुवातीला तर या बंगाली रस्गुल्ल्याला नवाबी बिर्याणीचा गंधही नको होता. पण, धावांचा पाठलाग करणाऱ्या नवाबांना आपल्या प्रियेचा पाठलाग करणे काय मोठी गोष्ट होती.
शर्मिलाला पटवण्यासाठी ते नेहमी काही ना काही क्लृप्त्या करत असत, आणि शर्मिला भाव खात असे. शेवटी तीसुद्धा सिनेसृष्टीची क्वीन होती.
पण, पतौडींच्या बॉलिंगवर शेवटी शर्मिलाची विकेट पडलीच आणि १९६९ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले.
आशिक आपल्या प्रेयसीसाठी काही करू शकतो, असे म्हटले जाते. शर्मिलाला पटवण्यासाठी नावाबांनी सुद्धा अशीच एक विचित्र विनोदी आणि भन्नाट गोष्ट केली होती. त्याकाळी प्रेयसीला महागतील महाग वस्तू भेट देण्याची प्रथा होती.
म्हणून नवाब साहेबांनी शर्मिलाला फ्रीज भेट दिला. तेही एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सात फ्रीज त्यांनी तिला त्यांच्या प्रेमाची भेट म्हणून पाठवले होते. त्यांची मुलगी सोहा अली खानने एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.
१९७५ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी राजकारणातही उतरण्याचा प्रयत्न केला होता. पण, राजकारणाच्या मैदानात काही ते टिकू शकले नाहीत. पहिल्याच निवडणुकीत हरल्यानंतर त्यांनी पुन्हा कधी राजकारणाचा विचारही केला नाही.
नवाब साहेबांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटशिवायही हॉकी, सॉकर, बॅडमिंटन या सगळ्या खेळात ते पारंगत होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरही काही काळ ते नियुक्त सदस्य होते. पण, या मंडळाने त्यांचे मानधनच दिले नसल्याची त्यांची तक्रार होती. शेवटी ते या मंडळातूनही बाजूला झाले.
नवाबांचा संसारही सुखाचा झाला. त्यांना एकूण तीन मुले, सैफ, सोहा आणि सबा. सैफ आणि सोहा आईच्या मार्गाने चित्रपट क्षेत्रात गेले. तर सबा दागिन्यांचा व्यवसाय करते. सोहाला चित्रपट क्षेत्रात तितकीशी प्रसिद्धी मिळाली नसली तरी सैफ मात्र इथे चांगला स्थिरावला.
२२ सप्टेंबर २०११ साली नवाब मन्सूर अली खान यांनी शेवटचा श्वास घेतला.
एक डोळा कायमचा गमावला असला तरी फक्त जिद्दीच्या जोरावर एखादी व्यक्ती किती यश मिळवू शकते, हे टायगर पतौडींच्या जीवनाकडे पाहिल्यावर लक्षात येईल. काही झाले तरी व्यक्तीने आपला आत्मविश्वास आणि जिद्द गमावता कामा नये. या दोन गोष्टी ज्याच्याजवळ असतात त्याला यश हमखास मिळतंच.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.