आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भविष्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. कुतूहल असते. आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे? विशेषत: धनलाभ वगैरे काही होणार का? आयुष्य आहे असेच राहणार की बदलणार? अशा कितीतरी शंका मनात काहूर माजवत असतात. म्हणूनच आजच्या विज्ञान युगातही भविष्यवेत्ते आणि ज्योतिष्याचार्यांचा व्यवसाय अगदी जोरात सुरु आहे.
त्यातही आजूबाजूचे वातावरण जितके अस्थिर, अनिश्चित होत जाईल तितकी भविष्याबद्दलची धास्ती वाढत जाते. सामान्य माणसाला स्वतःच्या भविष्याची चिंता भेडसावतेय आणि शास्त्रज्ञांना, संशोधकांना पृथ्वीच्या भविष्याची चिंता भेडसावतेय. काही शतकांनी ही पृथ्वी कशी असेल? इथे काय घडेल? काय नाही? याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तर सर्वांनाच आहे. जगाच्या पाठीवर असेही काही भविष्यवेत्ते होऊन गेले ज्यांनी जगावर परिणाम घडवून आणणाऱ्या मोठ्या घटनांबद्दल आधीच चेतावणी दिली होती.
अशाच भविष्यवेत्त्यांच्या यादीतील एक नाव आहे, बाबा वेंगा! तिचं पूर्ण नाव व्हांगेलीया दिमित्रीव!
३१ जानेवारी १९११ रोजी बल्गेरियातील कोझूह डोंगर रांगांतील रुप्टे या गावात तिचा जन्म झाला. ती एक अंध: वैद्य होती. जी वनौषधींचा वापर करून इतरांच्या आजारावर उपचार करायची. पण, लोकांना असे वाटे की तिच्याकडे काहीतरी अलौकिक शक्ती आहे. तिने सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरते याचाही लोकांना अनुभव येऊ लागला.
तिने केलेली ८५% भाकिते खरी ठरली. म्हणूनच तिचे नाव बाबा वेंगा असे पडले. बाबा म्हणजे ‘वृद्ध स्त्री’ आणि वेंगा हे वेंगेलियाचे छोटे रूप.
तिचे वडील पहिल्या महायु*द्धाच्या काळात बल्जेरियन सैन्यात होते. ती लहान असतानाच तिची आई वारली. वेंगा लहानपणापासूनच तल्लख बुद्धीची होती. गावातील एका वैद्याच्या सान्निध्यातच ती लहानाची मोठी झाली. म्हणूनच तिला लहानपणापासूनच जडीबुटींचे ज्ञान मिळाले.
एकदा, तिच्या गावात आलेल्या एक मोठ्या वादळात ती अडकली आणि या वादळाच्या तडाख्यातच तिला तिचे डोळे कायमचे गमावावे लागले.
ती अंधांच्या शाळेत शिकली. पण, तिला लिहिण्यावाचण्यात रस नव्हता. तिला पियानो वाजवण्यात जास्त रस होता.
त्यातच तिला अचानकच प्युरीसीचा (फुफ्फुसाचा आजार) त्रास सुरु झाला. डॉक्टरांच्या मते ती काही दिवसांचीच पाहुणी होती. पण, बाबा ८५ वर्षांचे आयुष्य जगली. याकाळात तिने अनेक लहानमोठ्या घटनांचे भाकीत केले होते.
सोव्हिएत युनियनचा पाडाव होऊन तिचे विभाजन होईल, चेर्नोबिल दुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख, इतकेच ९/११च्या पेंटॅगॉनवरील ह*ल्ल्याचेही तिने भाकीत केले होते. अजून पुढच्या काळातील काही महत्वपूर्ण घटनांचे भाकीतही तिने मृत्युपूर्वी केले आहे.
तिने केलेली जी भाकिते खरी ठरली त्यामध्ये दुसरे महायुद्ध, १९६८ साली प्राग येथील सोव्हिएतचा हल्ला, स्टालिनचा मृत्यू, बोरिस येल्टसीनचा विजय, जपानच्या फुकुशिमा अणुप्रकल्पाला झालेली दुर्घटना, अशा कितीतरी घटनांचा समावेश करता येईल. शिवाय तिने येत्या सहस्त्रकात काय घटना घडतील याचेही भाकीत केले आहे.
२०२३ साली पृथ्वीची कक्षा रुंदावेल, असे भाकीत तिने केले आहे. २०२५ साली युरोप नष्ट होऊन त्याठिकाणी वाळवंट निर्माण होईल असेही तिने भाकीत केले आहे. २०२८ पर्यंत कोणालाच खायला अन्नाची कमतरता भासणार नाही आणि एक नवा उर्जेचा स्त्रोत विकसित करण्यात मानवाला यश येईल असे तिचे भाकीत आहे.
२०३३ पर्यंत उत्तर धृवावरील बर्फ वितळेल आणि समुद्रातील पाण्याची पातळी वाढेल. २०४६ पर्यंत क्लोनिंग करण्याचे तंत्र सार्वत्रिक होईल. २०७६ साली जगावर पुन्हा कम्युनिस्टांची सत्ता येईल असे तिचे भाकीत सांगते.
मानवाच्या सध्याच्या वंशात उत्क्रांती होत जाईल आणि माणसाचा एक नवा वंश जन्माला येईल. शिवाय, माणूस एका नव्या धर्माला जन्म देईल असेही ती म्हणते.
तिने सांगितलेली ही भाकिते म्हणजे, विज्ञानाने पाहिलेली स्वप्ने पूर्ण होण्याचे संकेतच आहेत. कदाचित येत्या सहस्त्रकात विज्ञानाची झेप फार पुढे गेलेली असेल. हेच या भाकीतांकडे पाहून वाटते.
उत्क्रांतीच्या टप्प्यात फक्त माणूसच नाही तर प्राण्यांमध्येही बदल होतील. २१५४ मध्ये प्राणी देखील अर्धमानव होतील असे ती म्हणते. २१७० मध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडेल असे भाकीत तिने केले आहे. २३०४ पर्यंत चंद्राबाबतचे कोडे सुटलेले असेल आणि त्यानंतर मानव चंद्रावर वस्ती करेल असे ती म्हणते. २४८० साली पृथ्वीवर अंधाराचे साम्राज्य पसरेल, सूर्य थंड झालेला असेल, असेही तिचे भाकीत सांगते.
तिने केलेल्या भाकितानुसार ३००५ मध्ये मंगळावर यु*द्ध होईल आणि ३७९७ मध्ये पृथ्वी नष्ट होईल. ५०७९ मध्ये म्हणजे आणखी तीन हजार वर्षांनी हे संपूर्ण विश्वच नष्ट होईल असे तिचे भाकीत सांगते. तिच्या या भाकीतांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले.
बाबा वेंगा म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्त्व होते आणि तिच्यातील या अलौकिक सामर्थ्यामुळे अनेकजण तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. तिच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेली. तिने केलेल्या भाकितांचेही संग्रहण करून ठेवण्यात आले आहे.
तिच्या मते कोणीतरी अदृश्य शक्ती तिला हे भाकीत सांगण्यात सहाय्य करते. तिची भाषा काहीशी गूढ असल्याने ती इतरांना फारशी कळत नसे. तिला ही भाकिते कशी सुचतात, कुठून याबद्दलचे संकेत मिळतात, याबद्दलही ती फार काही सांगू शकली नाही. पण, तिच्या भाकितांना खरे होताना पाहिल्यावर लोकांना तिच्याबद्दल अधिक आकर्षण वाटू लागले.
स्वतःच्या मृत्यूचेही तिने भाकीत केले होते. तिला कधी मृत्यू येईल याची तारीख, वार तिने सांगितली होती. विशेष म्हणजे, तिचे हे भाकीत खरे ठरले. तिने सांगितलेल्या दिवशीच म्हणजे, ११ ऑगस्ट, १९९६ रोजी तिचा मृत्यू झाला.
तिने केलेल्या भाकितांचा काळ खूपच पुढचा आहे. पण, या सहस्त्रकानंतरचा काळ संपूर्ण मानव जातीसाठी अधिकच खडतर आणि तितकाच रोचक आहे. विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने कितीही प्रगती केली तर निसर्गाच्या रुद्ररुपासमोर तो टिकू शकत नाहीच, हेच ही भाकिते अधोरेखित करतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.