आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मी मधुरा काळे.
मला कळत नाही लोकांना आडनावावरून जातीचं विश्लेषण करण्यात काय मजा वाटते? माझ्या बोलक्या स्वभावामुळे अन् थोडीफार सामाजिक बांधिलकीची जाण असल्याने बरेच लोक भेटतात. बऱ्याच लोकांशी संबंध येतो. विविध विषयांवर गप्पा रंगतात, चर्चा होतात, तात्विक टीपण्या,माहितीपर भाषणं, साहित्याची देवाणघेवाण आणि असिमीत शब्दांवर भाष्य होत असतं.
परवा अशाच एका चर्चेत मी बोलत होते चक्ररधर स्वामींविषयी. लिळाचरित्र, म्हाइंभट्टांचे द्रुष्टांत असे अनेक विषय निघत गेले. मधेच अडवून मला समोरची व्यक्ती म्हणाली, “तुम्ही माळी का?”
अजून एक किस्सा आठवतो. राजगड चढताना किंवा तोरण्याला डोळे भरुन पाहताना मी शिवाजी महाराजांचा पोवाडा मनसोक्त गायले तेव्हा मला सगळ्यांनी विचारलं, “तुम्ही मराठा का?”
मेसमध्ये जेवताना भगवान महावीरांविषयी बोलत होते. अहिंसा, अपरीग्रह अशा अनेक सूत्रांचा उलगडा होत होता .जेवण संपल्यावर एक मुलगी मला म्हणाली, “तू जैन का ?”
मला आधीपासुनच भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान, त्यांच्या चेहऱ्यावरील तो शांत भाव फार भावतो. बुद्धांच्या ठिकाणी मी आत्माचिंतनात रमते. काही दिवसांपूर्वी बुद्ध प्रतिमांच्या प्रदार्शनाला भेट दिली.
तेव्हा एक चित्र न्याहाळत असताना पलीकडची व्यक्ती मला म्हणाली, “तुम्ही बौद्धच ना ?”
मागच्या गणपतीला मित्राकडे मंत्र पुष्पांजली म्हटली संस्कृतमधून तेव्हा लगेच त्याच्या बाबांनी विचारलं, “तू ब्राम्हण का?”
आज परत फेसबुकवर एका जणाशी बोलताना परत तोच विषय. समोरच्याने पहिलाच प्रश्न विचारला, तुम्ही माळी का? म्हटलं नाही, “मी भारतीय आहे”. तर समोरून उपहासात्मक प्रतिक्रिया आली, “आडनाव काळे ना? म्हणुन विचारलं.”
विचित्र आहे ना?
भारत माझा देश आहे ! सारे भारतीय माझे बांधव आहेत ! पहिलीपासून ही प्रतिज्ञा आम्ही तोंडपाठ केलीये पण खरच ती आपल्याला कळली आहे का? खरच सर्व भारतीयांना आपण बांधव मानतो का? भारताचं जाऊ द्या राज्यात, जिल्ह्यात, गावात, घरात अन् महत्वाचं म्हणजे मनातच दुजाभाव असेल तिथे बंधुत्व नांदणार तरी कसं?
माणसाने कोणत्या परिवारात, कोणत्या जागी, कोणत्या जातीत जन्माला यावं हे आपल्या हातात आहे का ? मग ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीतच त्याच गोष्टींचा अवडंबर करून आपण एकाला डोक्यावर चढवतो व दुसऱ्याला पायाखाली तुडवतो. हे आपल्या मनाला तरी पटतं का? सगळंच कळतं पण ते वळवून मात्र कोणीच घेत नाही.
कोणी सैनिक शहीद झाला तर अमुक जातीचा हा सैनिक, तमुक जातीचा तो सैनिक असा भेदभाव न करता आपला देश प्रत्येकाला शासकीय इतमामात सलामी देतो!
जर देश आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण तरी या देशात राहून आपापसात भेदभाव का करायचा? आपल्या भारतीयत्वाच्या अस्तित्वापुढे जात ही फार क्षुल्लक गोष्ट आहे.
आता तुम्हीच विचार करा आपल्याला आपलं अस्तित्व क्षुल्लक ठेवायचं आहे की मोठ्ठं, अथांग अन् चिरकाल ठेवायचं आहे!
लेखिका- कु. मधुरा काळे
(अंजनगाव सुर्जी जि.अमरावती)
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. ThePostman.co.in संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही. | आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.