आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इतिहासात अनेक गोष्टी विचित्र आणि अनपेक्षित पद्धतीने घडलेल्या दिसतात. काही वेळा तर कैक ऐतिहासिक घटनांना चमत्कारच म्हणावे लागते. अशा अनेक घटना भारतीय इतिहासात मुघल, मराठी आणि ब्रिटिश कालावधीत घडल्या आहेत. याच घटनांपैकी एक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना आपल्यापैकी क्वचितच काही जणांना माहिती असेल.
घटनांप्रमाणेच जगात अनेक ऐतिहासिक क्रांती घडवणारी पात्रं होऊन गेली. यांच्यामध्ये नेपोलियनचं नाव इतिहासात प्रकर्षाने येतं तर दक्षिण भारतात अठराव्या शतकात उदयास आलेलं असंच व्यक्तिमत्व म्हणजे ‘टिपू सुलतान’. या दोघांचेही एकमेकांशी संबंध होते हे हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या इतिहासकारांना माहिती आहे. ब्रिटिश मात्र टिपूच्या या कारनाम्यामुळे त्याच्यावर भलतेच नाराज होते. काय होतं नेमकं हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या या लेखातून..
नेपोलियनने केवळ युरोपियन इतिहासावरच नव्हे तर युरोपपासून कित्येक मैल दूर असलेल्या भारताच्या इतिहासावरही आपल्या पराक्रमाचा आणि कर्तृत्वाचा प्रभाव टाकला. भारतात टिपू सुलतानशी त्याच्या युतीची चर्चा होती. ही बातमी ब्रिटिशांपर्यंत पोहोचली असता ब्रिटिश राज्यकर्त्यांकडून टिपूला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली, असे अनेक प्रमुख ब्रिटिश इतिहासकार सांगतात.
फ्रेंचांचे भारतीयांशी संबंध
या युतीबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला फ्रांस आणि भारतीय राज्यकर्त्यांच्या संबंधांचा आढावा घ्यावा लागेल. फ्रेंचांचा भारताशी सर्वप्रथम संबंध औरंगजेबाच्या काळात म्हणजेच सोळाव्या शतकात आला. यावेळी फ्रँकॉईस बर्नियर नावाचा फ्रेंच डॉक्टर सुमारे १२ वर्षं औरंगझेबाचा वैयक्तिक वैद्यकीय अधिकारी होता. याच माणसाने पुढे वर्णभेदाची सुरुवात केली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र फ्रेंचांनी भारताच्या राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली.
१७६३ साली पॅरिसच्या करारामुळे फ्रेंचांचे भारतातील वर्चस्व कमी झाले होते. त्यामुळे भारतात आपला पाय रोवण्याचा दृष्टीने त्यांनी ब्रिटिशांशी सत्तासंघर्षाची संधी गमावली. १७७६ साली अमेरिकन क्रांतिकारी यु*द्धाला पाठिंबा देण्यात फ्रान्स यशस्वी ठरला आणि आता त्यांना ब्रिटीशांनाही भारतातून हाकलून देण्याची इच्छा होती.
१७८२ साली ‘लुई द सिक्सटीन्थ’ने दुसऱ्या माधवराव पेशव्यांशी युती केली. ही युती फ्रेंचांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. परिणामी, फ्रेंचांनी आपले सैन्य मॉरिशसमध्ये हलवले आणि १७८३ साली भारतात फ्रेंच सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. १७८२-८३ मधील दुसर्या ब्रिटिश-म्हैसूर यु*द्धात सुफ्रेनने हैदर अलीला सैनिकी मदत पुरवली. भारत आणि सिलोनच्या किनार्यावरील रॉयल नेव्हीविरुद्धच्या पाच लढायांमध्ये सुफ्रेन सक्रियपणे सहभागी झाला.
टिपू-फ्रेंचांचे संबंध
१७८३ च्या व्हर्सायच्या तहानंतर आणि फ्रेंच समर्थन पूर्णतः संपवून टाकल्यानंतर, हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतानला, ब्रिटीशांकडून मंगळुरू परत मिळण्यात मोठे प्रयत्न करावे लागले. १७८४ साली तब्बल दहा महिन्यांच्या लढाईंनंतर त्याने मंगळुर पुन्हा मिळवले आणि १७८४ च्या शेवटी त्याने ब्रिटिशांबरोबर शांततेचा करार केला. याचवेळी त्याला फ्रेंचांचे महत्त्व पटले होते.
१७८६ साली टिपू सुलतानने कॉन्स्टँटिनोपलमार्गे फ्रान्समध्ये आपला दूत पाठवला, परंतु काही कारणाने त्याला पुन्हा बोलवावे लागले. १७८७ साली टिपूने एक नवीन दूतावास थेट पॅरिसला पाठवला, यामध्ये ३ राजदूत पॉण्डिचेरीच्या फ्रेंच व्यापारी एम. मोनेरॉन यांच्यासोबत होते. या राजदूतांनी ऑगस्ट १७८८ मध्ये व्हर्साय येथे लुई-द-सिक्सटीन्थ याची भेट घेतली. पण लंडनशी नुकत्याच शांतता प्रस्थापित झालेल्या फ्रान्सला ब्रिटिशांबरोबर पुन्हा शत्रुत्व सुरू करण्याची इच्छा नव्हती.
१७९४ साली, फ्रेंच रिपब्लिकन अधिकार्यांच्या पाठिंब्याने, टिपूने म्हैसूरच्या जेकोबिन क्लबला ‘प्रजासत्ताकाच्या कायद्यांनुसार कायदे तयार करण्यासाठी’ मदत केली. ऑक्टोबर १७९४ आणि एप्रिल १७९६ मध्ये टिपू सुलतानने पुन्हा फ्रान्सला युतीचा प्रस्ताव दिला. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे भारताला पाठिंबा देण्यात फ्रान्सला अडथळा आला, परंतु नेपोलियनच्या उदयानंतर फ्रांस आणि टिपूचे संबंध पुन्हा प्रस्थापित होऊ लागले. दरम्यान, टिपूने ऑक्टोबर १७९७ मध्ये मॉरिशसचे गव्हर्नर मालार्टिक यांच्यामार्फत पुन्हा फ्रेंचांशी युतीचा प्रस्ताव मांडला. पण मालार्टिकला मॉरिशसच्या फ्रेंच वसाहतींमधून आपले सैन्य कमी करायचे नव्हते.
पण तरीही त्याने ७ मार्च १७९८ रोजी ‘ला प्रीन्युज’ यु*द्धनौकेतून दीडशे स्वयंसेवकांचा एक गट मंगळूरला पाठवला. एप्रिल १७९८ मध्ये ‘ला प्रीन्युस’ जहाज मंगळुरूला आले. मिशेल रेमंडच्या नेतृत्वाखाली १२४ जणांच्या फ्रेंच अधिकार्यांचा एक गट निजामासाठी १४ हजाराच्या सैन्याचे नेतृत्व करत होता. परंतु ब्रिटिश हस्तक्षेपानंतर निजामाला या संघर्षात तटस्थ राहण्याची मजबुरी होती.
नेपोलियन-टिपू युती
यानंतर उदय झाला ‘नेपोलियन द ग्रेट’चा. नेपोलियनच्या इजिप्तवरील स्वारीची प्रमुख प्रेरणा म्हणजे इंग्रजांच्या विरोधात भारताशी मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करणे ही होती. नेपोलियनला मिडल ईस्टमध्ये फ्रेंचांची उपस्थिती पाहिजे होती, जेणेकरून त्याला आपले टिपूसोबत मैत्रीपूर्ण संबंध स्थापन करण्याचे ध्येय साध्य करता येईल.
‘इजिप्त जिंकल्याबरोबर, तो भारतीय राजपुत्रांशी संबंध प्रस्थापित करील आणि त्यांच्यासोबत मिळून इंग्रजांवर ह*ल्ला करील.’ असे आश्वासन नेपोलियनने फ्रेंच डिरेक्टरीला दिले होते. टॅलीरँडच्या १३ फेब्रुवारी १७९८च्या अहवालानुसार: ‘इजिप्तवर ताबा मिळवून तेथील फ्रेंच सैन्य आणि वसाहत मजबूत केल्यावर, आम्ही टिपूच्या सैन्यात सामील होण्यासाठी आणि इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी सुएझमधून १५ हजार लोकांची फौज भारतात पाठवू.’ असा नेपोलियनचा मनसुबा होता.
परंतु यादरम्यान टिपू सुलतानला युतीचा प्रस्ताव देणारी काही पत्रे ब्रिटिशांच्या हाती लागली होती. यामुळे टिपू चांगलाच अडचणीत आला होता. त्याच्यासाठी खरोखर मृत्यूदंडाची शिक्षा ब्रिटिशांनी जाहीर केली होती.
नेपोलियनचे अपयश आणि टिपूचा मृत्यू
परंतु नेपोलियन त्याच्या निर्धारित रणनीतीमध्ये अयशस्वी ठरला. १७९९ साली एकरचा वेढा आणि १८०१ साली अबूकिरची लढाई तो हरला. १७९८ मध्ये इजिप्तमधील नाईलच्या लढाईत ब्रिटिश आरमार अधिकारी होरॅशियो नेल्सनने फ्रेंच आरमार अधिकारी, फ्रँकोइस-पॉल ब्रुईज डी’आयगॅलियर्सचा पराभव केला. यानंतर १७९९ साली तीन शत्रू-सैन्यांनी एकाच वेळी म्हैसूरवर कूच केले. एक सैन्य बॉम्बे प्रेसिडेंसिमधून आले होते तर दोन सैन्य ब्रिटिशांची होती, यामधील एकामध्ये आर्थर वेलेस्लीचा समावेश होता.
चौथ्या म्हैसूर यु*द्धात या सैन्याने म्हैसूरची राजधानी श्रीरंगपट्टणाला वेढा घातला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे २६ हजार पेक्षा जास्त सैनिक होते, अंदाजे ४ हजार युरोपियन आणि उर्वरित भारतीय होते. तर टिपू सुलतानच्या सैन्याची संख्या ३० हजार होती. पण टिपूच्या मंत्र्यांनी फितुरी केली आणि यु*द्धाचा निकाल फिरला. त्यांनी ब्रिटिशांसाठी किल्ल्याच्या भिंती कमकुवत केल्या, यामुळे ब्रिटिशांना आत येणे अत्यंत सोपे झाले.
जेव्हा इंग्रजांनी शहराच्या भिंती तोडल्या, तेव्हा फ्रेंच लष्करी सल्लागारांनी टिपू सुलतानला गुप्त मार्गाने पळून जाण्यास आणि इतर किल्ल्यांवरून उर्वरित यु*द्धे लढण्यास सांगितले, परंतु त्याने नकार दिला. टिपू सुलतानला श्रीरंगपट्टण किल्ल्यावर असलेल्या होअली गेटवेवर मारण्यात आले.
फ्रांस-भारत ऐतिहासिक संबंध
टिपू नंतरही फ्रान्सचे भारताबरोबर मैत्रीपूर्ण संबंध अबाधित राहिले. टिपूनन्तर काही काळातच उत्तरेत ‘महाराजा रणजितसिंह’ नावाचा सूर्य तळपू लागला. महाराजा रणजितसिंह यांच्या सैन्यात २ हजारपेक्षा जास्त फ्रेंच सैनिक होते. त्यातील तीन जणांना सरदारपद मिळाले आणि त्यांच्यावर खालसा सैन्याच्या आधुनिकीकरणाची जबाबदारी देण्यात आली. फौज-ए-खास हा खालसा सैन्याचा भाग फ्रेंच विभाग म्हणूनही ओळखला जात होता आणि त्याच्या ध्वजामध्ये फ्रेंच तिरंगा आणि गरुडासह फ्रेंच यु*द्धचिन्ह होते.

नवी दिल्लीतील इंडिया गेट हे फ्रान्समधील पहिल्या आणि दुसऱ्या महायु*द्धातील रणांगणांतील भारतीय सैन्याच्या बलिदानाचे स्मारक आहे. तर आजही महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा फ्रान्समधील ‘सेंट ट्रोपेझ’ येथे आहे. आधुनिक भारतातही फ्रान्सशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले जातात, या संबंधांना सुमारे चारशे वर्षांचा इतिहास आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










