आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
त्याला बालपणापासून हॉकी खेळायची आवड होती, सेंटर हाफ पोझिशन त्याच्या जमेची बाजू होती. त्यावेळी त्या मुलाला वाटले देखील होते की भविष्यात तो भारताचा एक सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून नावलौकिक मिळवेल. पण, एक दिवस असे काही घडले की, त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या मुलाला त्याच्या हॉकी कोचने सेंटर हाफवरून राईट हाफवर आणून उभे केले. त्या मुलाला ते आवडले नाही आणि त्याने यामुळे चक्क हॉकी खेळणे बंद केले.
हातातील हॉकी स्टिक खाली ठेवल्यानंतर त्याने क्रिकेटची बॅट हाती घेतली आणि हॉकीपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या मुलाने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये १०,५८५ आणि कसोटी क्रिकेटमध्ये १०,८२३ धावा केल्या.
तो ज्यावेळी निवृत्त झाला त्यावेळी संपूर्ण जगात त्याला भारतीय क्रिकेट संघाची ‘द वॉल’ अर्थात ‘भरभक्कम भिंत’ म्हणून नावलौकिक मिळाला होता. त्या मुलाचे नाव होते ‘राहुल द्रविड’.
भारतीय संघाचा माजी कर्णधार असलेल्या राहुल द्रविडच्या नावावर अनेक रेकॉर्डस् आहेत. त्याने अनेक सामन्यांत अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने संकटात सापडलेल्या टीम इंडियाला विजयश्री तर मिळवून दिलीच, पण अनेक ऐतिहासिक कसोटी सामन्यांत नेत्रदीपक अशी कामगिरी देखील केली आहे.
राहुल द्रविडने आजवर अनेक सामन्यांत अफाट कामगिरी केली असली तरी त्याने २००३ साली ऑस्ट्रेलियाविरोधात ॲडलेडच्या कसोटी सामन्यात केलेली कामगिरी चिरकाल स्मरणात राहील अशी आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड येथील ओव्हल स्टेडियममध्ये १२ डिसेंबर २००३ रोजी सुरु असलेल्या मालिकेचा हा दुसरा कसोटी सामना होता. ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह वॉ यांनी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताकडे कुरळ्या केसांचा एक अप्रतिम गोलंदाज होता, ज्याला लोक भारताचा वसीम आक्रम म्हणून देखील ओळखायचे, त्या गोलंदाजाचे नाव होते ‘इरफान पठाण’.
इरफान पठाण एक उत्तम गोलंदाज असला तरी ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याचा अनुभव त्याच्याजवळ नव्हता. ऑस्ट्रेलियन टीमचे दोन सलामीवीर जस्टिन लेंगर आणि मॅथ्यू हेडन मैदानावर उतरले. मॅथ्यू हेडन त्याच्या आक्र*मक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. हेडनला आउट करणे हे भारतीय गोलंदाजांसमोरील सर्वांत मोठे आव्हान होते. पण इरफान पठाणने हे अग्निदिव्य पार पाडले. त्याने हेडनला आपल्या स्विंग गोलंदाजीच्या बळावर पार्थिव पटेलच्या हातात कॅच देऊन बाद केले.
२२ धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला झटका लागला. १२ धावा करून मॅथ्यू हेडन तंबूत परतला.
यावेळी भारतीय संघाच्या कर्णधाराला वाटले की त्यांनी ऑस्ट्रेलियाशी सुरु असलेल्या झुंजीत अर्धी बाजी मारली आहे. पण अजून त्यांना रिकी पॉंटिंगला सामोरे जायचे होते. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येणारा रिकी पॉंटिंग हा एक अप्रतिम फलंदाज होता.
ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट पडल्यावर रिकी पॉंटिंग मैदानावर उतरला. त्याने बघता बघता भारतीय गोलंदाजांची हवा काढत तब्बल २४२ धावा केल्या. रिकी पॉंटिंगच्या या अजरामर कामगिरीनंतरच त्याला “स्टीव्ह वॉ”नंतर ऑस्ट्रेलियन टीमचा पुढचा कर्णधार म्हणून पसंती मिळाली होती.
भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने सर्वप्रकारे प्रयत्न करून देखील भारताच्या मार्गातील रिकी पॉंटिंग नावाचा अडसर बाजूला सारता येत नव्हता. अगदी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरसारख्य्या दिग्गज फलंदाजांनीसुद्धा गोलंदाजी केली होती.
ऑस्ट्रेलियन संघाने ७ बाद ५५० धावांचा डोंगर रचला होता. गांगुली पॉंटिंगला त्रिशतक पूर्ण होऊ देण्याच्या आधी तंबूत परत पाठवण्यासाठी आतुर होते. यावेळी गांगुलीने संपूर्ण विचार करून सर्वाधिक भरवशाच्या अनिल कुंबळेच्या हातात बॉल दिला. कुंबळेवर अपेक्षांचे ओझे होते. पण कुंबळे देखील कमी नव्हता, त्याने अपेक्षा सार्थ ठरवल्या आणि पॉंटिंगला राहुल द्रविडच्या हातात झेल देऊन बाद केले.
पॉंटिंग तंबूत परतला आणि ऑस्ट्रेलियन संघाचा डाव कोसळला. ५५६ धावा करून ऑस्ट्रेलियन संघ तंबूत परतला.
५५६ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाची अक्षरश: वाट लागली. भारताचे सलामीवीर फार स्वस्तात तंबूत परतले. भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये एकच शांतता पसरली. भारतीय फलंदाजांच्या विकेट पडताना बघून सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. हा सामना हातचा जातो की काय, अशी भीती सर्वांना वाटत होती.
टीम इंडियाचे मुख्य फलंदाज, सचिन तेंडुलकर १ रन बनवून तर कर्णधार सौरव गांगुली २ रन करून तंबूत परतला होता. यानंतर खेळपट्टीवर आला राहुल द्रविड. त्याच्या साथीला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण होता. त्या दोघांनी ठरवले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सामना ऑस्ट्रेलियाच्या तावडीत जाऊ द्यायचा नाही. दोघांनी खेळायला सुरुवात केली. एक एक करत ते धावा जोडत होते.
दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर टिकून होते म्हणून धावांचा आकडा देखील वाढत चालला होता. राहुल द्रविडने हळूहळू आपले अर्धशतक आणि नंतर आपले शतक पूर्ण केले. इतक्यावरच तो थांबला नाही त्याने दीडशे रन्स पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने देखील दीडशे धावांचा टप्पा गाठत होता. पण सर्वकाही सुरळीत चालू असताना व्ही व्ही एस लक्ष्मणला १४८ धावांवर बिचेल या गोलंदाजाने आपल्या फास्ट बॉलच्या बळावर तंबूत रवाना केले.
दोघांनी ३०३ धावांची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी केली होती. लक्ष्मण परतला तरी द्रविड अजूनही टिकून होता, त्याने २०० धावांचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियन संघाला एव्हाना लक्षात आले होते की त्यांचा सामना भारतीय संघाशी नाही तर, राहुल द्रविड नावाच्या अजस्त्र भिंतीशी आहे. त्यांनी भेदक मारा केला पण द्रविड टिकून राहिला.
त्याने २४२ धावा केल्या आणि शेवटच्या विकेटवर आउट झाला. एकूण ५२३ धावा करून भारतीय संघ पराभूत झालेला असला तरी या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचे मोठी लीड घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाले होते. त्यांना फक्त ३३ धावांची लीड मिळाली होती.
दुसऱ्या फेरीत १९६ धावांवर ऑस्ट्रेलियन संघ गारद झाला आणि त्यांनी भारतीय संघाला २२९ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाची अवस्था १४७ वर ३ बाद असताना राहुल द्रविड खेळपट्टीवर टिकून होते. त्याने सामन्याची कमान हाती घेतली आणि १७० चेंडूत ७२ धावांची अजरामर कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारताला या सामन्यात विजयश्री संपादन करता आली होती. भारतीय संघाचा हा विजय अभूतपूर्व होता. राहुल द्रविड या सामन्यात एकटा लढला होता. त्याच्या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघासाठी अनेक सामन्यांत अत्यंत अद्वितीय कामगिरी केली होती. त्याच्या या कामगिरीमुळे तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










