आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
प्राचीन भारतीय साहित्यातील वेद आणि उपनिषदांना अनन्य साधारण महत्त्व आहे. स्तोत्र, प्रार्थना, ऐतिहासिक लेखन, विज्ञानावरील शोध प्रबंध यांचा समावेश या दोन्ही साहित्यांमध्ये आढळून येतो. किमान ५ हजार वर्षे जुन्या असलेल्या या ग्रंथांमध्ये ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना असून पदार्थाचं स्वरूप, प्रतिजैविक आणि अणू-रेणूंच्या रचनांचं देखील वर्णन यांमध्ये आहे.
संस्कृत ही वेदांची भाषा म्हणून ओळखली जाते. संस्कृतमध्ये असे काही शब्द आहेत ज्यांचा अर्थ समजून भाषांतर करण्यासाठी संपूर्ण पानभर माहिती आवश्यक असते. त्यामुळं शक्यतो लोक वेदांचा अभ्यास करणं टाळतात. मात्र, निकोला टेस्लासारख्या शास्त्रज्ञानं वैदिक शब्दांचा वापर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या संशोधनामध्ये केला आणि सर्व जग आश्चर्यचकित झालं. तेव्हा पहिल्यांदा वेदांचं महत्त्व जगाच्या समोर आलं. पण, संस्कृतसारख्या कठीण परदेशी भाषेतील वैदिक संकल्पना टेस्ला कुठे आणि कसा शिकला? असा प्रश्न उभा राहतो. तर, या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ‘स्वामी विवेकानंद’!
स्वामी म्हटलं की, भगवे कपडे, गळ्यात माळा घातलेली व्यक्ती आपल्या नजरेसमोर येते. स्वामी विवेकानंद देखील भगवे कपडे घालत मात्र, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम त्यांच्या व्यक्तीमत्त्वामध्ये होता. त्यांना असलेली वेदांची समज कुठल्याही सामान्य व्यक्तीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त होती.
१८९३ साली स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे आयोजित धर्म परिषदेला उपस्थित राहून पश्चिमेचा दौरा सुरू केला. तीन वर्षांच्या काळात त्यांनी युनायटेड स्टेट्स आणि युरोपचा दौरा केला. त्यादरम्यान जगातील कैक शास्त्रज्ञ त्यांच्यापासून प्रभावित झाले होते. यामध्ये निकोला टेस्लाचा देखील समावेश होता. निकोला टेस्लाने विद्युत क्षेत्रात विशेष काम केलेलं आहे. तो स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या ‘सामख्या ब्रह्मांड’ आणि हिंदूंनी दिलेल्या चक्रांच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण ऐकून प्रभावित झाला होता.
स्वामी विवेकानंद आणि निकोला टेस्ला यांच्या भेटीमागे एक रंजक गोष्ट दडलेली आहे. दोघांची भेट घडवून आणण्यामागे अभिनेत्री सारा बर्नहार्टची भूमिका आहे. सारानं ‘इझिएल’ नावाच्या नाटकात भूमिका केली होती. ते नाटक भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित होतं. यात इझिएल नावाची वेश्या बुद्धांना भुरळ घालून ध्यानापासून विचलीत करण्याचा प्रयत्न करताना दाखवली होती.
बुद्धांनी मात्र, या प्रसंगाचा वापर जगातील मायेचा प्रभाव आणि त्याबद्दलची निरर्थकता सांगण्यासाठी केला. हे नाटक त्यावेळी अमेरिकेत भरपूर प्रसिद्ध झालं होतं. अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंद हे नाटक पाहण्यासाठी गेले होते. विवेकानंद हे धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासासाठी ओळखले जात.
विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण यांना अनेक अध्यात्मिक अनुभव आले होते. त्यांना ब्राह्मणाचा सर्वोच्च अवतार मानलं जात होतं. रामकृष्णांचं ज्ञान आणि पाश्चिमात्य जगाला जोडणारा दुवा म्हणून विवेकानंदांकडे पाहिलं जात असत. सारा बर्नहार्टला या सर्व गोष्टींची कल्पना होती. थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये काही मान्यवरांना बघितल्यानंतर तिनं लगेचचं त्यांच्याबरोबर एक भेट आयोजित केली.
नाटकानंतरच्या बैठकीला उपस्थित मान्यवरांमध्ये निकोला टेस्लाचाही समावेश होता. ३९ वर्षांच्या वयात, त्यानं एसी मोटरचा शोध लावला होता आणि इतर इलेक्ट्रिकल शोधांचे पेटंट्स मिळवले होते. सारानं आयोजित केलेल्या बैठकीत स्वामी विवेकानंद आणि टेस्ला यांची भेट झाली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांची ही पहिलीच भेट असून देखील त्यांनी अनेक गहन विषयांवर चर्चा केली. दोघांनी प्राण, आकाश आणि कल्प या वेद सिद्धांतातील तीन प्राथमिक संकल्पनांवर चर्चा केली. हे घटक ऊर्जा, ईथर(आकाश) आणि इयॉन (युग) म्हणून समजले जाऊ शकतात. संशोधनात प्राण हे ऊर्जेचे एकक, द्रव्य म्हणून अकाश, आणि काळ म्हणून कल्प ग्राह्य धरल जाऊ शकतं हे टेस्लाच्या मनात बसलं.
वैदिक धर्मातील दीर्घ परंपरेच्या कल्पना आधुनिक पाश्चात्त्य विज्ञानामध्ये लागू केल्यास नक्कीच त्याचा जगाला फायदा होऊ शकतो, असा ठाम विश्वास त्याला वाटू लागला. ही भेट विवेकानंद आणि टेस्ला दरम्यानच्या मैत्रीची सुरुवात ठरली. त्यानंतर टेस्लानं वेदांच्या अभ्यासाबाबतची आपली आवड जोपासली. वेदातील विविध संकल्पना आणि त्याचं वैज्ञानिक महत्त्व याविषयावर दोघांमध्ये पत्रव्यवहार देखील होत असे.
काही वर्षांनंतर, भौतिक घटनांचा शोध घेताना त्यांचं वर्णन करण्यासाठी टेस्लानं वैदिक संज्ञांचा (प्राण आणि आकाश) वापर देखील केला. जर विश्वाची रहस्ये शोधायची असतील तर आपण ऊर्जा(energy) आणि पदार्थ (matter) या दोन घटकांचा अभ्यास केला पाहिजे, असा विचार स्वामी विवेकानंदांनी टेस्लाला सांगितला होता. टेस्लानं त्यावर संशोधन देखील सुरू केलं होतं मात्र, ते त्याला पूर्ण करता आलं नाही. पुढे हाचं धागा घेऊन अल्बर्ट आइन्स्टाईननं संशोधन केलं.
सामान्यपणे विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांच्या विरोधी गोष्टी आहेत असं लोकांना वाटतं. त्यांच्यातील संबंध घेऊन विवेकानंदांनी लोकांची ही चुकीची धारणा दूर करण्याचा प्रयत्न केला. पाश्चिमात्त्य जग विज्ञानाचा ‘भोक्ता’ होतं आणि भारत, जपान, नेपाळ यांसारखे पूर्वेकडील देश अध्यात्मप्रेरित होते. जगाच्या या दोन टोकांना जोडण्याचा प्रयत्न स्वामीजींनी केला.
विज्ञान म्हणजे बाह्य जगातील सत्याचा शोध आहे तर अध्यात्म हा आंतरिक सत्याचा शोध आहे. मानवाला निखळ आनंद मिळवायचा असेल तर बाह्य आणि आंतरिक अशा दोन्ही प्रकारच्या सत्यांची आवश्यकता आहे, असं त्यांचं मत होतं. ही गोष्ट त्यांनी निकोला टेस्ला, सायकोलॉजिस्ट विल्यम जेम्स, जर्मन शास्त्रज्ञ हर्मन वॉन हेन्झवाल्टझ् आणि जमशेटजी टाटा यांच्या सारख्या आपापल्या क्षेत्रातील निष्णात लोकांना देखील पटवून दिली. या लोकांनी विवेकानंदांनी सांगितलेल्या गोष्टींवर काम केलं आणि आज आपण पाहतच आहोत की ते किती यशस्वी झाले होते.
आताचा आधुनिक समाज मात्र या गोष्टी समजून घेण्यात अपयशी ठरत आहे. आता फक्त विज्ञान आणि अभियांत्रिकीला प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा मिळतो. यामुळे मानवी जीवनात एक आंतरिक पोकळी निर्माण होते आहे. हेच कारण होतं की, स्वामी विवेकानंद अधात्म आणि विज्ञानाचे ‘अद्वैत’ सिद्ध करीत होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.