आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
===
शाळेत असताना एम कलामणी या तमिळनाडूतील तरुणाच्या मनात झाडांप्रतीची निष्ठा कायमची बसली. शाळेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यामतून त्यांनी तंजावरमध्ये एका वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. येथून सुरुवात झाली त्यांच्या वृक्षारोपणाच्या कार्याला, जे आजतागायत सुरु आहे. मागच्या २० वर्षात त्यांनी १ लाख वृक्षांची लागवड केली आहे. तंजावर, तिरुवेल्लूर, नागपट्टीनम, पेराम्बलुर आणि अरीयेलूर या भागात त्यांनी वृक्षारोपण केले आहे.
२०११ पर्यंत त्यांनी तामिळनाडूच्या विविध भागात वृक्षारोपणाचा एकट्यानेच धडाका लावला होता. २०११ साली वनमची स्थापना केल्यावर त्यांनी नवतरुणांना वृक्षारोपण कार्यक्रमात सामावून घेण्यास सुरुवात केली. वनम संस्थेत फक्त ४७ स्वयंसेवक असून त्यांनी २०१८ सालच्या गाझा वादळानंतर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. कलामणी यांनी २० हजार झाडांची लागवड केली असून, सोबतच १ लाखाच्या आसपास झाडं किनारपट्टीच्या प्रदेशात लावली आहे.
कलामणी यांनी वन्य प्राणी शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून, ते युवा क्रीडा विकास मंत्रालायचा सहाय्याने तंजावर जिल्ह्यात युथ एक्टिव्हीटी ऑर्गनायझर म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्ह्यात अनेक स्पर्धांचे आयोजन केले व तरुणांमध्ये जागृती करण्याचे कार्य हाती घेतले. २००३ साली त्यांना नागपट्टणमच्या कलेक्टर कडून युथ अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. त्यांना यानंतर ७० पुरस्कार मिळाले. त्यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम हाती घेऊन अनेक स्थानिक प्रजातीच्या वृक्षांची रक्षा केली आहे. त्यांनी वृक्षांच्या अनेक प्रजातींची लागवड केली आहे व जैवविविधता जपण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
कलामणी यांनी फक्त वृक्ष लागवड केली नाही तर त्यांनी त्या वृक्षांची काळजी देखील घेतली. कलामाणींच्या मते वृक्ष लागवड करून उपयोग नसतो, त्यांचे संवर्धन देखील महत्वाचे असते. त्यांना त्यांच्या या कार्यात बायको व आईची मोलाची साथ लाभली आहे. त्यांनी आपली नोकरी सोडून चार वर्ष वृक्षारोपणावर खर्ची केली आहेत. त्यावेळी त्यांच्या पत्नीने आपल्या घराचा सांभाळ केला. सध्या ते कापडाची थैली बनवण्याचा उद्योग करतात.
आधी त्यांनी आपला प्रवास एकट्याने सुरु केला होता. पण नंतर त्यांनी आपल्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यांचं कार्य व उद्देश बघून अनेक लोक त्यांच्या या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागले. २०११ पासून लोकांचा सहभाग वाढत गेला. आज वनम ही एक नोंदणीकृत संस्था बनली आहे. इतकं अद्वितीय कार्य करून देखील त्यांना आवश्यक ते आर्थिक पाठबळ मिळू शकलेली नाही. यामुळे कालमणी व त्यांचे मित्र हेच आपल्या साठवणुकीच्या पैशातुन ही संस्था चालवत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून वनमची माहिती मिळाल्यावर अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले, अनेक लोकांना वनमचे कार्य इतके आवडले की त्यांनी यात स्वेच्छेने सहभाग देखील नोंदवायला सुरुवात केली. हरिदास या कलामणी यांच्या एका मित्राने तामिळनाडूची संपूर्ण किनारपट्टी सायकलवर पालथी घातली आणि वनमच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळवून दिली. यामुळे असंख्य तरुण त्यांच्या कार्यात सहभागी होऊ लागले.
वनम संस्थेच्या कार्याला नवीन ओळख मिळाली ती नोव्हेंबर २०१८ मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतर, या नैसर्गिकी आपत्तीमुळे लाखाच्या संख्येने झाडं उखडून निघाले. यावेळी वृक्षारोपणाची निकड निर्माण झाली होती. यावेळी वनम संस्था मदतीला धावून आली. असंख्य मोठं मोठी वृक्षे ही या वादळामुळे उन्मळून पडली होती. रस्त्याच्या कडेला पडलेल्या झाडांना बघून कलामणी यांचे मन व्यथित झालेले होते. त्यावेळी त्यांनी ह्या वृक्षांना पुनश्च उभं करण्याचा निर्धार केला.
कलामणींच्या स्वतःच्या नर्सरीमध्ये अनेक स्वदेशी प्रजातींच्या वृक्षांची रोपं होती. सर्व वादळात नष्ट झाली. यामुळे कलामणी जरा व्यथित झाले. पण त्यांनी पुन्हा वृक्षारोपणाचा निर्धार केला. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने १७४ वृक्षांचे रोपण केले. काही काळात त्यांची वृक्षे मोठी होतील.
आज ते तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. त्यांनी १.५ लाख माडाच्या वृक्षांची लागवड देखील केली आहे.
वनम ही संस्था आपण काही स्वतःच्या फायद्यासाठी सुरु केलेली नसून, या संस्थेच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने हा सगळा प्रदेश हिरवागार करायचा आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. वनमच्या कार्याला आता अजून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून चेन्नई व तमिळनाडूच्या प्रमुख शहरातील लोकांनी या संस्थेला आर्थिक मदत देऊ केली आहे.
वनमचे कार्य हे सेल्फी घेणे वा फोटोग्राफी करणे यासाठी नसून, निसर्गाचे रक्षण हे आहे, असे मत कलामणी व्यक्त करतात. आज वनमचे कार्य हे वसुंधरेच्या रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. या कार्याचा विस्तार व्हाव हीच सदिच्छा!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.