आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
क्रिकेट सामन्यात सध्या भारतीय संघाचीच हवा आहे. भारतीय संघातील नवे खेळाडू अनेक नवनवे विक्रम स्थापित करत आहेत. भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. एकदिवसीय सामने असोत की कसोटी सामने भारताने या खेळात आपला चांगलाच धाक बसवला आहे.
आज ज्याप्रमाणे भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आपले पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच यापूर्वीही अनेकांनी भारतीय क्रिकेट संघाचे नाव एक मजबूत संघ म्हणून पुढे यावे यासाठी दमदार खेळ केलेला आहे.
हरभजन सिंहला आपण कसे विसरू शकतो? भारतीय गोलंदाजीला हरभजन म्हणजेच भज्जीने एक नवे परिमाण प्राप्त करून दिले. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा सगळ्याच क्रिकेट प्रकारात त्याने अतुलनीय कामगिरी केली आहे. हरभजनला भारतीय संघातील एक ‘जादुई स्पिनर’ म्हटले जात असे.
पंजाबच्या एका सामान्य तरुणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव कसे कमावले जाणून घेऊया या लेखातून.
पंजाबमधील जालंधर शहरात ३ जुलै १९८० रोजी हरभजन सिंहचा जन्म झाला. त्याचे वडील व्यापारी होते.
भारतातील कुठल्याही सामान्य मुलाप्रमाणे हरभजनने देखील गल्लीतील मित्रांसोबतच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा हा खेळ फक्त आवड किंवा टाईमपास बनून न राहता त्याची जिद्द बनत गेला. क्रिकेटमध्येच करिअर करायचे या निश्चयाने त्याने क्रिकेट कोचिंगदेखील लावले. त्याचे पहिले प्रशिक्षक होते चरणजीत सिंह भुल्लर. हरभजनला क्रिकेटमध्ये तरबेज करण्यासाठी त्याच्या या प्रशिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली होती. पण, हरभजनने त्यांच्या कष्टाचे चीज केले.
त्याच्या कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती की हा क्रिकेट-विकेटचा नाद सोडून हरभजनने आपल्या पारंपारिक व्यवसायात लक्ष घालावे. पण, त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले.
खुद्द त्याच्या वडिलांचेच स्वप्न होते की, हरभजनने भारतीय संघासाठी खेळावे. हरभजनने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केलेच. आपल्या मुलाने आपले स्वप्न पूर्ण करणे हा कोणत्याही पालकांसाठी अभिमानाचा क्षण असतो. पण, दुर्दैवाने हा क्षण आणि त्याचे या क्षेत्रातील यश पाहण्याचे भाग्य मात्र त्याच्या वडिलांना लाभले नाही.
हरभजन पहिल्यांदा १६ वर्षाखालील गटात निवडला गेला. इथून सुरुवात करून त्याने भारतीय संघात सामील होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. फक्त दोनच वर्षात त्याला ही संधी मिळाली आणि हरभजन सिंहच्या वडिलांचे स्वप्न साकार झाले.
त्याने १९९८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. या पहिल्याच सामन्यात त्याने दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. विशेष म्हणजे यावेळी तो फक्त १८ वर्षांचा होता.
भारतीय संघात आपले मजबूत स्थान निर्माण व्हावे यासाठी हरभजन खूप मेहनत घेत होता. तो चांगला खेळत होता तरीही त्याला पहिल्या अकरा खेळाडूंमध्ये क्वचितच निवडले जाई. अर्थात त्याकाळी मुरली कार्तिक आणि अनिल कुंबळेसारखे दमदार गोलंदाज भारतीय क्रिकेट संघाचा भाग होते. अशा कसलेल्या जुन्या खेळाडूंसमोर शेवटी नवखा हरभजन थोडासा डावा वाटणारच. संघाची निवड करताना निवडकर्त्यांचाही कधी कधी खूप गोंधळ उडत असे.
भारतीय संघात आपली निवड होईल की नाही या विवंचनेत असणाऱ्या हरभजनच्या तणावात आणखी भर पडली ती त्याच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने. एकीकडे संघात आपले स्थान निर्माण करण्याची त्याची शिकस्त सुरू असताना त्याचा सर्वात मोठा आधार हरपला होता.
वडिलांचे छत्र हरपलेल्या हरभजनवर पाच बहिणींसह सर्व घराची जबाबदारी आली होती. खेळ, करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सर्व आघाड्या त्याने उत्तमरीत्या पार पाडल्या. त्याने आपल्या पाचही बहिणींचे लग्न करून दिले, भारतीय संघात स्थानही मिळवले.
येणाऱ्या काळासोबत हे स्थान अधिकाधिक दृढ होत गेले. “भज्जीशिवाय क्रिकेट”ची त्याच्या चाहत्यांना कल्पनाही करवत नाही. नंतरच्या त्याच्या या उज्वल कारकिर्दीचे आपण सगळेच साक्षीदार आहोत.
पण, वडिलांचे निधन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या ओझाने झुकलेल्या हरभजनने त्याकाळात क्रिकेटला रामराम करण्याचा विचार केला होता. त्याने क्रिकेटमध्ये करिअर करावे ही त्याच्या वडिलांचीच इच्छा होती. त्यामुळे त्यांचा त्याला मोठा आधार वाटत होता. तेच राहिले नाहीत, शिवाय इकडे क्रिकेटमध्ये स्थान मिळेल की नाही याचीही संदिग्धताच होती.
दुसऱ्या बाजूला कुटुंबाची चिंता छळत होती. या सगळ्या तणावजनक परिस्थितीत त्याला एखादी छोटीमोठी नोकरी करून आपले कुटुंब सांभाळावे असे वाटणे साहजिक आहे. पण, त्याला अनेकांनी क्रिकेट न सोडण्याचा सल्ला दिला. या काळात त्याला मानसिक आधाराची गरज होती. अनेकांनी त्याला समजावले की क्रिकेट हेच करिअर त्याच्यासाठी योग्य आहे. शिवाय, त्याचे मनही क्रिकेटमध्येच गुंतले असल्याने त्याने पुन्हा आपल्या मनाचा पक्का निर्धार करून कसून सराव सुरु केला. आपल्या वडिलांचे स्वप्नही साकार करायचे होते.
आपली ऑफ स्पिन बॉलिंग अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. सततच्या सरावाने त्याच्या बॉलिंगमध्ये कमालीची सुधारणा झाली. नेट्सवर बॉलिंगचा सराव केल्याने बॉलींगच्या गुगुलीने भल्याभल्या फलंदाजांनाही आपल्या जाळ्यात कसे ओढायचे हेही तो शिकला होता.
शेवटी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी हरभजनची निवड झाली. ऑस्ट्रेलियाचा संघ म्हणजे क्रिकेटमधील एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो.
२००१ साली झालेल्या बॉर्डर-गावस्कर सिरीजसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला. हरभजन सिंहसाठी हा पहिलाच सामना होता. या संपूर्ण मालिकेत हरभजनच्या बॉलिंगने अशी काही कमाल केली की, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना त्याच्या बॉलिंगला प्रत्युत्तर कसे द्यावे हेच समजत नव्हते.
या संपूर्ण मालिकेत हरभजनने ३२ विकेट घेतल्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात इतक्या विकेट घेणे म्हणजे एक ऐतिहासिक कामगिरी होती.
एकटा हरभजन या सामन्यात पूर्ण ऑस्ट्रेलियन संघावर भारी पडला होता. या मालिकेत त्याला ‘मॅन ऑफ दि सिरीज’चा किताबही मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या मिडियामध्ये जेंव्हा या सामन्याचे वृत्त देण्यात आले तेंव्हा एका निवेदकाने हरभजन या सामन्याचा टर्मिनेटर ठरल्याचे म्हटले. पुढे हरभजनला टर्मिनेटर हे टोपण नावच पडले. पण, तो डोक्यावर पगडी घालत असल्याने त्यातील टर्मिनेटचे टरबन झाले आणि तो टर्बिनेटर झाला. मैदानावरही त्याला इतर खेळाडू याच नावाने हाक मारत.
पुढच्या अनेक सामन्यात हरभजनच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. कपिल देव आणि अनिल कुंबळे यांच्या नंतर भारतीय संघातील एक उस्कृष्ट स्पिनर म्हणून हरभजनचेच नाव घेतले जाते.
त्याने १०३ कसोटी सामन्यात ४१७ विकेट घेतल्या आहेत. कमी वयात ४०० विकेट घेणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
हरभजन आणि विवाद हेही नातं तितकंच दृढ होतं. हरभजनला राग खूप येतो आणि रागाच्या भारत तो कुणाला काय बोलून जाईल याचा नेम नाही. अनेकदा मैदानावर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंवर त्याने केलेल्या तिखट आणि तिरकस टिप्पणीमुळे माध्यमांनी अनेकदा त्याला टीकेचे लक्ष्य केले.
एकदा तर त्याने आपल्याच संघातील श्रीसंतला थोबाडीत हाणली होती. यावरूनही त्याच्याविरोधात वादंग उठले होते. हरभजनचे हे कृत्य चुकीचे असल्याने मत अनेकांनी व्यक्त केले. त्याच्या या अतिरागीट स्वभावामुळेच तो अनेकदा अडचणीत आला.
पण, आपल्या करिअरसाठी त्याने केलेली धडपड, प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंब आणि करिअर यांच्यात साधलेला मेळ अशा त्याच्या अनेक गोष्टी नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील हे मात्र नक्की!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.