आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
‘प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत एक असा दिवस येतो, ज्या दिवशी तुमचा खेळ खुलून पूर्णपणे बाहेर पडतो. तो दिवस फक्त तुमचा असतो, निर्मात्यानं तो दिवस तुमच्या हवाली केलेला असतो. तुम्ही काहीही करा, त्या दिवशी तुमच्या हातून चुका सुद्धा होऊ शकत नाहीत. कदाचित, तो दिवस आणि डाव देखील फक्त माझ्यासाठीच बनलेला होता.’ भारताचा पहिला वर्ल्डकप विजेता कर्णधार कपिल देव यांची ही प्रतिक्रिया आहे. माणसाचा नम्रपणा तर पाहा, नाबाद १७५ धावा करून, संघाला वर्ल्डकपच्या शर्यतीत टिकवून ठेवण्याचं ‘हर्क्युलियन टास्क’ पूर्ण केल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ कुठल्याही अपेक्षेविना वर्ल्डकप खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी भारतीय संघाची अवस्था फारशी चांगली नव्हती. वर्ल्डकपपूर्वी भारतानं पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका गमावली होती. याची किंमत सुनील गावसकरला मोजावी लागली आणि ऐन वर्ल्डकप तोंडावर कर्णधारपद सोडावं लागलं.
क्रिकेट मंडळानं कपिल देव नावाच्या तरुणावर विश्वास दाखवत कर्णधारपदाची धुरा त्याच्या हातात सोपवली. त्यावेळी कपिल फक्त २४ वर्षांचे होते. साखळी सामन्यांमध्ये फक्त दोन सामने भारतीय संघानं जिंकले होते. एकूणचं भारतीय संघानं आपली मान खाली घातली होती आणि क्रिकेट रसिकांनी संघाकडून कुठलीही अपेक्षा करणं सोडून दिलं होतं.
पण, तो कपिल देवच होता ज्यानं भारताची मान पुन्हा उंचावण्याचं काम केलं. साखळी सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध, १७५ धावा फटकावून भारताला भरभक्कम आधार दिला होता. टुनब्रिज वेल्सच्या मैदानावर आपल्या सहकाऱ्यांनी माना टाकल्यानंतर कपिल एकटा खंबीरपणे मैदानावर लढला होता.
नाणेफेक झाली होती. ती जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय कर्णधार कपिल देवनं घेतला होता. कर्णधार म्हणून सुरुवातीचे सोपस्कार पार पाडून कपिल देव शॉवर घेण्यासाठी गेला. कारण, तो मधल्या फळीत खेळण्यासाठी उतरत असे. त्यामुळं खेळपट्टीवर पाय ठेवण्यापूर्वी थोडा वेळ निवांत होण्यासाठी तो बाथरूममध्ये जाऊन बसला. कदाचित त्याला खात्री होती, सलामीवीर निदान सुरुवातीचे काही तास तरी मोर्चा सांभाळतील. इकडं मैदानावर चित्र मात्र काहीस वेगळचं होतं. भारताचे दोन्ही सलामीवर सुनील गावसकर आणि के श्रीकांत भोपळाही न फोडता माघारी गेले होते.
असं सांगितलं जातं की, कुणीतरी कपिलच्या बाथरुमवर थाप मारून त्याला ही बातमी दिली. याचा अर्थ होता, त्याला लवकर बाहेर यावं लागणार होतं. जोपर्यंत कपिल आपली आवराआवर करून बाथरूममधून बाहेर पडतो, तोपर्यंत तर आणखी एक विकेट गेली होती. थोड्याच वेळात भारताचा चौथा गडी देखील धारातीर्थी पडला होता. आपला पहिला वर्ल्डकप खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघासमोर भारतानं सपशेल शरणागती पत्करली होती. विशेष म्हणजे त्यावेळी भारतानं दोन अंकी संख्या देखील गाठली नव्हती.
त्यानंतर कपिल देवला मैदानात उतरावं लागलं. मैदानावर येऊन कपिल जरा स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असतानाचं आणखी एक विकेट गेली. त्यावेळी भारताची अवस्था ५ बाद १७ अशी होती. इकडे भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढावली होती आणि तिकडे आयोजकांच्या समोर नवीनचं अडचण उभी राहिली होती.
त्यांनी तीन वेळच्या जेवणाची मोठ्या प्रमाणात तयारी करून ठेवली होती. भारताची अवस्था पाहता सामना दुपारपर्यंतच संपला तर, शिल्लक राहिलेल्या जेवणाचं करायचं काय? असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र, कपिल देवनं त्यांच्या जेवणाची देखील काळजी घेतली!
रॉजर बिन्नी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्यानं काळी काळ कपिलच्या साथीनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला. बिन्ननं २२ धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर आलेला रवी शास्त्री देखील अवघी एक धाव करून माघारी गेला. त्यावेळी भारतानं सात गड्यांच्या बदल्यात ७८ धाव्या केल्या होत्या.
त्यानंतर आलेल्या सईद किरमानी आणि मदनलाल यांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली. आपण फक्त विकेट वाचवायची आहे बाकी जे करायचं ते कॅप्टन करेल. तेव्हा एकदिवसीय सामने ६० ओव्हर्सचे होते. ३५ ओव्हर्स खेळ झाल्यानंतर लंच ब्रेक घेण्यात आला. जेवणाच्या टेबलवर कपिलशी बोलण्याचं कुणाचंही धाडस झालं नव्हतं, असं आता माजी खेळाडू सांगतात.
लंचनंतर कपिलनं मदनलाल आणि किरमानीच्या साथीनं भारताला २६६ पर्यंत नेऊन पोहचवलं. कपिल देवनं नाबाद १७५ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. नंतर गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळं भारतानं तो सामना ३१ धावांनी जिंकला.
दुर्दैवानं या ऐतिहासिक खेळीचं चित्रकरण झालं नव्हतं. आयोजकांचे सर्व उपकरण वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महत्त्वाचा सामना शूट करण्यासाठी पाठवण्यात आली होती तर बीबीसीचे कर्मचारी देखील त्या दिवशी संपावर होते. ऑन पेपर विचार केला तर ५ बाद १७ या धावसंख्येवरून एखादा संघ ८ बाद २६६ पर्यंत पोहचू शकतो आणि सामनाही जिंकू शकतो, हे त्यावेळी अशक्य वाटतं होतं. मात्र, भारताच्या फक्त २४ वर्षीय कर्णधारानं ही गोष्ट साध्य करून दाखवली होती.
त्यादिवशी कपिल देवनं अनेक गोष्टी वाचवल्या होत्या. भारताचा मान-सन्मान, वर्ल्डकपमधील संघाचं स्थान आणि आयोजकांचं जेवण सुद्धा! त्यादिवशीच्या १७५ धावांच्या खेळीमुळं भारताचं वर्ल्डकपमधील आव्हान टिकून राहिलं आणि त्यामुळेचं भारतानं आपला पहिला-वहिला विश्वचषक जिंकला होता.
मोठ्या उत्साहानं धावत येऊन भयंकर आऊटस्विंगर्स टाकण्यासाठी कपिल देव ओळखले जात. जितकी प्रभावी त्यांची गोलंदाजी होती तितकीच धार त्यांच्या फलंदाजीमध्येही होती. एक आक्रमक लोअर-मिडल ऑर्डर फलंदाज म्हणून त्यांचं आजही नाव घेतलं जातं. त्यांच्या फटक्यांमध्ये कमालीची ताकद असे.
कपिल बॅटनं देखील नरसंहार करू शकत होते, असं कमेंटेटर्स गमतीनं म्हणत. मैदानावर कायम आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देणारं नेतृत्व त्यांनी केलं.
कपिल आपल्या काळातील सर्वात चपळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होते. कदाचित तो भारतीय ड्रेसिंग रूममधील सर्वात शिस्तप्रिय आणि वक्तशीर माणूस होता. शारीरीक अडचणींचं कारण देऊन ते एकदाही कसोटी क्रिकेटमधून बाहेर बसलेले नाहीत.
जागतिक क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव एकमेव खेळाडू आहे ज्यानं ४०० विकेट्स आणि कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजार पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. याचं सर्व गोष्टी त्यांना एक महान अष्टपैलू खेळाडू म्हणण्यास आपल्याला भाग पाडतात.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.